अध्यात्म विराम ७५
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
अनन्य असा भाव मनात जागृत होण्यासाठी, जीवनातून मनाने निवृत्त होऊन, आत्मज्ञान प्राप्तीसाठी सिद्ध व्हावं लागतं, हा खूप मोठा गुह्य भाग आपण गेल्या काही भागा तील चिंतनातून जाणला. म्हणजे माझा,अर्थात या देहाचा व बुद्धीचा नव्हे तर, मन व आत्मा यांचा एकमेव आधार ईश्वर हाच आहे. तो एकच असा आहे, जो एकदा बोट धरल्या नंतर, कधीही आपलं बोट, हात आणि साथ सोडणार नाही.
पण ही अनन्यता सर्वसाधारण नसावी, तर आत्मयोग सिद्धी साधण्याची असावी. आधार हवा असेल तर, तो जगातून देह धारण शृंखला भेदण्यासाठी आणि आत्म तेजाला स्वप्रकशित करून, संपूर्ण शुद्ध स्वरूपातील आत्मप्रकाश रूप तेजाप्रत नेऊन, समिल्लित करण्या साठी असावा. ही अनन्यता मला या जगतात कोणी नाही, या भावनेने असावी. हा भाव एकवार धरला की तो कायमस्वरूपी दृढ असावा. त्यात क्षणमात्र व तिळमात्र बदल होता काम नये.
या अनन्य भावाला एकदा मनात दृढ केले की, याच भावात त्या ईश्वराची उपासना करावी, हा गुह्य मंत्र या श्लोकात पुढे भगवंत सांगतात. आता उपासना म्हणजे काय, हा एक गहन प्रश्न उभा राहतो. पण त्याआधी हे लक्षात घ्या की, या गुह्याचा स्पष्ट शब्दात भेद ईश्वराने केलेला आहे.अनन्य होऊन, माझं चिंतन करत जे माझीच उपासना करतात असा, एक आत्मप्रकाशपर संदेश भगवंतांनी यात दिलेला आहे. म्हणजे माझी उपासना कशी करावी, तर ती चिंतनातून करावी, हा मार्ग स्वतः ईश्वराने समस्त जगतातील, सामान्य जनांना आखून दिलेला आहे, असा बोध यातून प्राप्त होतो.
पण हे चिंतन कसं असावं याचा बोध घेण्याचा प्रयत्न करूया. चिंतय या शब्दाचा अर्थ मनात व बुद्धीने विचार करणे, चित्तात अंततः एकच विचार धारण करून, त्या गोष्टीचा ध्यास घेणे आणि त्यासाठी ध्यान धरणे. ध्यान हे देहाने, एका जागी बसून करण्याचे कार्य आहे, असा एक सार्वत्रिक समज आपण करून घेतलेला आहे. यामधे एक मुख्य गोष्ट जी ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे, चित्त स्थिर करणे,यासाठी देहाची स्थिरता करावी,अशी प्राथमिक स्थिती ध्यान योग साधण्याची इच्छा धरणाऱ्यां साठी योजण्यात आलेली आहे. ही एक प्राथमिक अवस्था आहे.
लक्षात घ्या की, आपण मुळाक्षारं,शब्द, आकडे, प्राथमिक एक दोन इयत्ता पर्यंत शिकतो. पण एकदा तो अभ्यास साधल्या नंतर पुन्हा त्या प्रकारे, त्या शब्दांचा घोटून अभ्यास करत नाही. कारण तो तसा करावा लागत नाही. त्याचप्रमाणे, देह स्थिर ठेवून ध्यान धारणेचा अभ्यास ही प्राथमिक स्थिती झाली. एकवार ते साधता येणं साधलं की, ते साध्य न समजता, साधन समजावं. म्हणजे त्या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच देहाच्या कोणत्याही स्थितीत, अवस्थेत, कोणत्याही स्थळी मनाला तसं ध्यान साधता येण्याचा अभ्यास घडवावा किंवा करावा म्हणजे मन नित्य ध्यानात राहील.
हे ध्यान धारता येणं म्हणजे चिंतन साधणं. कारण ध्यान व चिंतन हे अंती,त्या स्वयं प्रकाशित आत्मा तेजाप्रत जाण्या साठी आहे. पण ईश्वराला या श्लोकात अभिप्रेत चिंतन हे नित्य, अखंड आणि चित्त शुद्ध स्वरूपात करणं अपेक्षित आहे. कारण अज्ञान युक्त, अशुद्ध चित्त, शुद्ध स्वरूपातील ईश्वराच्या चिंतनी रंगू शकत नाही. कारण त्या अशुद्धतेत विकार आणि विषय वास करतात. जिथे विषय आणि विकार आहेत, तिथे ईश्वर साधनेची, प्राप्तीची आवड, बुद्धी आणि वृत्ती होऊ शकत नाही आणि झालीच तर ती चिरकाल टिकू शकत नाही, हे निश्चित.
या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याच्या प्रयत्नात आपण गढून गेलेले आहोत. विषय आणि गुह्यार्थ मोठा असल्या मुळे, पुढील भागात, हाच विषय पुढे नेऊया, तो पर्यंत या चिंतनाचं चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment