Skip to main content

अध्यात्म विराम ७५

अध्यात्म विराम ७५
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।

अनन्य असा भाव मनात जागृत होण्यासाठी, जीवनातून मनाने निवृत्त होऊन, आत्मज्ञान प्राप्तीसाठी सिद्ध व्हावं लागतं, हा खूप मोठा गुह्य भाग आपण गेल्या काही भागा तील चिंतनातून जाणला. म्हणजे माझा,अर्थात या देहाचा व बुद्धीचा नव्हे तर, मन व आत्मा यांचा एकमेव आधार ईश्वर हाच आहे. तो एकच असा आहे, जो एकदा बोट धरल्या नंतर, कधीही आपलं बोट, हात आणि साथ सोडणार नाही. 

पण ही अनन्यता सर्वसाधारण नसावी, तर आत्मयोग सिद्धी साधण्याची असावी. आधार हवा असेल तर, तो जगातून देह धारण शृंखला भेदण्यासाठी आणि आत्म तेजाला स्वप्रकशित करून, संपूर्ण शुद्ध स्वरूपातील आत्मप्रकाश रूप तेजाप्रत नेऊन, समिल्लित करण्या साठी असावा. ही अनन्यता मला या जगतात कोणी नाही, या भावनेने असावी. हा भाव एकवार धरला की तो कायमस्वरूपी दृढ असावा. त्यात क्षणमात्र व तिळमात्र बदल होता काम नये. 

या अनन्य भावाला एकदा मनात दृढ केले की, याच भावात त्या ईश्वराची उपासना करावी, हा गुह्य मंत्र या श्लोकात पुढे भगवंत सांगतात. आता उपासना म्हणजे काय, हा एक गहन प्रश्न उभा राहतो. पण त्याआधी हे लक्षात घ्या की, या गुह्याचा स्पष्ट शब्दात भेद ईश्वराने केलेला आहे.अनन्य होऊन, माझं चिंतन करत जे माझीच उपासना करतात असा, एक आत्मप्रकाशपर संदेश भगवंतांनी यात दिलेला आहे. म्हणजे माझी उपासना कशी करावी, तर ती चिंतनातून करावी, हा मार्ग स्वतः ईश्वराने समस्त जगतातील, सामान्य जनांना आखून दिलेला आहे, असा बोध यातून प्राप्त होतो. 

पण हे चिंतन कसं असावं याचा बोध घेण्याचा प्रयत्न करूया. चिंतय या शब्दाचा अर्थ मनात व बुद्धीने विचार करणे, चित्तात अंततः एकच विचार धारण करून, त्या गोष्टीचा ध्यास घेणे आणि त्यासाठी ध्यान धरणे. ध्यान हे देहाने, एका जागी बसून करण्याचे कार्य आहे, असा एक सार्वत्रिक समज आपण करून घेतलेला आहे. यामधे एक मुख्य गोष्ट जी ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे, चित्त स्थिर करणे,यासाठी देहाची स्थिरता करावी,अशी प्राथमिक स्थिती ध्यान योग साधण्याची इच्छा धरणाऱ्यां साठी योजण्यात आलेली आहे. ही एक प्राथमिक अवस्था आहे. 

लक्षात घ्या की, आपण मुळाक्षारं,शब्द, आकडे, प्राथमिक एक दोन इयत्ता पर्यंत शिकतो. पण एकदा तो अभ्यास साधल्या नंतर पुन्हा त्या प्रकारे, त्या शब्दांचा घोटून अभ्यास करत नाही. कारण तो तसा करावा लागत नाही. त्याचप्रमाणे, देह स्थिर ठेवून ध्यान धारणेचा अभ्यास ही प्राथमिक स्थिती झाली. एकवार ते साधता येणं साधलं की, ते साध्य न समजता, साधन समजावं. म्हणजे त्या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच देहाच्या कोणत्याही स्थितीत, अवस्थेत, कोणत्याही स्थळी मनाला तसं ध्यान साधता येण्याचा अभ्यास घडवावा किंवा करावा म्हणजे मन नित्य ध्यानात राहील. 

हे ध्यान धारता येणं म्हणजे चिंतन साधणं. कारण ध्यान व चिंतन हे अंती,त्या स्वयं प्रकाशित आत्मा तेजाप्रत जाण्या साठी आहे. पण ईश्वराला या श्लोकात अभिप्रेत चिंतन हे नित्य, अखंड आणि चित्त शुद्ध स्वरूपात करणं अपेक्षित आहे. कारण अज्ञान युक्त, अशुद्ध चित्त, शुद्ध स्वरूपातील ईश्वराच्या चिंतनी रंगू शकत नाही. कारण त्या अशुद्धतेत विकार आणि विषय वास करतात. जिथे विषय आणि विकार आहेत, तिथे ईश्वर साधनेची, प्राप्तीची आवड, बुद्धी आणि वृत्ती होऊ शकत नाही आणि झालीच तर ती चिरकाल टिकू शकत नाही, हे निश्चित. 

या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याच्या प्रयत्नात आपण गढून गेलेले आहोत. विषय आणि गुह्यार्थ मोठा असल्या मुळे, पुढील भागात, हाच विषय पुढे नेऊया, तो पर्यंत या चिंतनाचं चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...