अध्यात्म विराम ६०
आपण देवाला हात जोडून वंदन करतो, त्या क्षणासाठी आपण आणि या ब्रम्हांडाचा नायक, ईश्वर, यांच्या मधे कोणतीही दुसरी शक्ती येऊ शकत नाही. मन बुध्दी देह यांना क्षणासाठी पूर्ण शांतता, मिळण्याचं ठिकाण आणि क्षण फक्त आणि फक्त तोच असतो. पण यामधे सर्वात अडचण कसली येत असेल तर ती आपल्याच मनाची. मुळात हे मन, त्या वंदन क्षणी, पूर्ण स्थिर होऊन, त्या श्री चरणांवर लीन व शरणागत झालं तरच, वंदन हे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातं.
मुळात वंदन हा एक उपचार वा आचार नसून, ते भगवंत आणि भक्त यांचं मनोमिलन आहे. ही एकच वेळ व एकच स्थळ असं आहे, जिथे निर्गुण निराकार ब्रम्ह आणि निर्गुण निराकार मन यांचं अद्भुत मिलन होतं किंवा होऊ शकतं. पण त्यासाठी या भक्त व भगवंत मिलनाच्या अलौकिक दिव्य क्षणी, त्या अलौकिक कार्याचं महत्व आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे.
या वंदन क्षणाला निर्गुण निराकार ब्रम्ह स्वरूप ईश्वर व त्याचं अंशात्मक प्रातिनिधिक रूप असलेलं आत्मस्वरूप तत्व, यांनी एकमेकांसमोर येण्याचा हा क्षण आहे. याच क्षणाला साक्षी ठेवून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की, "देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या".
त्याचा भावार्थ, आज या निमित्ताने जाणून घेऊया. क्षण भर म्हणजे हाच तो क्षण, ज्यावेळी देहातील अंतरात्मा मनाच्या माध्यमातून, चराचरात व्याप्त पण निर्गुण रुपात अप्रकट असलेल्या ईश्वराला शरण जाऊन, लीन भावात वंदन करतो. आत्मतत्त्व निर्गुण, निराकार कारण त्याला आकार, ऊकार काही नाही. विदेही असताना, त्याला व्यक्तता सुद्धा नाही. सारी व्यक्तता ही देहात आल्यानंतरच शक्य आहे.
मन हे सुद्धा देहातील एक इंद्रिय असूनही, आकार, रूप, नसल्यामुळे देहाशिवाय अव्यक्त आहे. म्हणजे आत्मा आणि मन हे दोन्ही, एखाद्या देहात नसतील तरच व्यक्त , अन्यथा अव्यक्त. म्हणजेच यांच्या व्यक्तते साठी, देहाची साथ आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, यांच्या एकतानते साठी, देहाचं या दोन्हींशी तादात्म्य किंवा एकरूप होणं अत्यंत महत्वाचं आहे.
हे तादात्म्य साधण्यासाठी, त्या एका क्षणाला,या तिन्हीना, एकरूप होणं आवश्यक आहे. ही एकरूपता किंवा एकात्मता साधल्यानंतर, त्या निर्गुण निराकार परब्रम्ह परम तत्वाला, मन व आत्मा यांना भेटवत आहोत हा विचार मनात दृढ करावा आणि ही भेटीची दिव्य अनुभूती, मन आत्म्याला प्राप्त करून देत आहे, ही कल्पना, मनात रुजवून मगच, त्या क्षणी नमन व वंदन केलं पाहिजे. तरच माऊली म्हणतात त्याप्रमाणे, हा योग, नित्य साधून येईल.
याच्या इतर अनेक बाजूंचा व भावांचा सर्वंकष विचार उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment