Skip to main content

अध्यात्म विराम १०

अध्यात्म विराम १०
  
सातव्या प्रकारातील आत्मे, प्रगतीच्या पुढल्या टप्प्यात असतात. त्यांना देहाचं सुख, समाधान यांचा मोह व आवश्यकता नसते. हे जीव जन्मतः अतिप्रगत असल्या कारणाने, जगातील बऱ्याच ऐहिक सुखाच्या मोहाच्या पलीकडे असतात. त्यांना लोभ, मोह, मद, क्रोध इत्यादी अनेक रिपुंचा स्पर्श होत नाही किंवा होऊ शकत नाही. जीवनातील बऱ्याच, विशेषतः, देहाच्या वा ऐहिक सुखाच्या बाबत हे उदासीन असतात. 

अश्या गोष्टींकडे यांची नजर सहसा जात नाही. गेलीच तरी, त्यांचं आकर्षण यांना क्षणिक मोहू शकत नाही. चवथ्या प्रकारातील व थोड्या प्रमाणात पाचव्या प्रकारातील व्यक्ती, किनाऱ्यावर किंवा ज्याला आपण म्हणुया, बॉर्डरवर असतात. त्यांना काही क्षण वा काही वेळा आकर्षण, मोह, यांचा वारा लागू शकतो. पण ते साधना, ईश्वरी व सद्गुरू कृपा यांच्यामुळे, स्वतःला सावरण्या इतके सक्षम होतात. किंबहुना तोच त्यांच्या शिकण्याचा किंवा प्रगतीचा मुख्य भाग असतो.

चवथी व पाचवी पायरी यशस्वीपणे पार पाडलेले जीव, सहाव्या टप्प्यात आल्यानंतर, अनेक बंधनातून किंवा षड रीपुंच्या आकर्षणातून पार झालेले असल्यामुळे, वैराग्य वृत्ती, विरक्त भाव हे यांचं जन्मतः श्रद्धास्थान असतं. आतापर्यंतचे सहाही पायऱ्यातील आत्मे, हे आपल्या आत्ममार्गातील प्रगतीच्या टप्प्यावर कमी अधिक प्रमाणात पुढे मागे असतात. 

यातील पाचव्या पायरीपर्यंत असलेले जीव, आपल्या पूर्व किंवा वर्तमान कर्मानुसार, थोडे फार पुढे मागे होत असतात. विशेषतः चार पायरीपर्यंत मानव हा, देहाचे कर्मभोग, मोह, लोभ, माया यांच्या प्रभावाखाली, आपल्या प्रगतीत कधी कधी, मागे जाऊन, पुन्हा भोग ग्रस्त होऊन, भोग भोगून, त्यातून घडणाऱ्या परीक्षेत अडकून, सुटत, अडकत, पुढे पुढे जात असतो. 

आता यातील मुख्य याचं ठिकाणी, अर्थात चार आणि पाच या टप्प्यांवर, जीवाला विशेष सहाय्य लागतं. यात महत्वाचं तत्व किंवा शब्द ध्यानात ठेवा, तो म्हणजे, आत्म्याला हे सहाय्य लागतं. देहधारी कोणीही असो आणि कोणत्याही ठिकाणी असो, हे विशेष सहाय्य, त्याच्या प्रारब्ध योगानुसार, त्याला प्राप्त होतं. 

यावर अजून विस्ताराने, पुढील लेखात चर्चा करूया. तोपर्यंत, आपण मानव देहात आल्याबद्दल आणि इच्छित मार्गाचा अवलंब करण्याची सुलभता व व्यवस्था, या देहात ईश्वराने निर्माण करून दिल्याबद्दल, त्याचे ऋण व्यक्त करून, त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...