अध्यात्म विराम २५
श्रवणात आलेल्या सर्वच ध्वनीच्या लहरी कानावाटे मेंदू पर्यंत घेऊन जाणं, हे देह आणि देहातील यंत्रणा यांचं कामच आहे. पण त्यातील सर्वांना प्रतिसाद देणं, हे एका ठराविक काळापर्यंत आपल्या देहाच्या नित्य कर्माचा भाग असतो. जसं एखादं लहान मूल,कानावर आलेल्या प्रत्येक सादाला प्रतिसाद देतं. कारण ते अज्ञानी असतं आणि ज्ञान ग्रहण प्रक्रियेत असल्यामुळे, ते प्रत्येक आवाजाला प्रतिसाद देणार, हे नैसर्गिक आहे.
परंतु जसजसं ते मूल मोठं होत जातं, तसतसं त्याला कळत जातं की, कोणता आवाज आला की काय प्रतिसाद द्यायचा. सर्वात प्रथम कोणतंही मुल आपल्या आईच्या आवाजाला, ओळखून, त्याला सर्वात आधी प्रतिसाद देतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ज्ञानाने, त्या मुलाला, एक पूर्ण माणूस होईपर्यंत, किती कधी, का, कसा प्रतिसाद द्यायचा, हे समजतं.
म्हणजे जाणीवा जसजश्या जागृत होतात, उमलत जातात किंवा व्याप्त होतात, त्याप्रमाणे माणूस त्या त्या सादाला प्रतिसाद देतो.यात शांत राहून,मूकपणे न दिलेला प्रतिसाद हा सुद्धा प्रतिसाद आहे, हे ध्यानात असू द्या. हा साद प्रतिसाद खेळ माणूस अज्ञानी ते ज्ञानी व प्रगल्भ या सर्व पायऱ्यांवर वेगवेगळा असतो.
उथळ प्रतिसाद ते विचारपूर्वक व विवेकाने दिलेला किंवा शांत राहून, न दिलेला प्रतिसाद या अनेक पातळीवर तो असू शकतो. पण या पायऱ्या ज्ञानाने चढाव्या लागतात. म्हणजे ज्ञान माणसाला त्याचा प्रतिसाद मोजका, नियंत्रित आवश्यकतेनुसार देण्यास, शिकवतं. म्हणजेच श्रवणात कानामार्गे ऐकण्यात आलेल्या प्रत्येक ध्वनीचा वेध घेऊन, त्याला प्रतिसाद देण्यापासून, तो प्रतिसाद न देण्यासाठी कानावर आलेल्या ध्वनीला ऐकून न ऐकल्या सारखं करणं, हे देखील मनुष्य साधू शकतो.
सांसारिक, व्यावहारिक पातळीवर या सर्व गोष्टी घडत असतात आणि घडत राहणार. यातील ज्ञान म्हणजे सांसारिक, प्रापंचिक व व्यावहारिक पातळीवरील ज्ञान असं आपण गृहीत धरलं, तरीही याचा पारमार्थिक बाबींसाठी उपयोग कश्याप्रकारे होऊ शकतो, हे आपण पुढील भागात पाहूया.
आपण सध्या श्रवण या पहिल्या भक्तीमार्गाचा सखोल अभ्यास करत आहोत.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment