अध्यात्म विराम ७१
कालच्या विषयात पुढे जाताना एक लक्षात घ्या की, कर्म आणि कर्मफल हा या भौतिक विश्वाचा आधार आहे. म्हणजे कर्म करणे आणि त्याचं फल प्राप्त झालं की, त्याचा भोग किंवा उपभोग घेणे, हे एकच मानवाच्या हातात आहे. हा नियम, अगतिकता, अपरिहार्यता, पराधीनता या पैकी जे म्हणाल ते आहे. पण आहे हे मात्र नक्की. या बाहेर कोणालाही जाता येत नाही. अगदी ईश्वरसुद्धा, या नियमातून वर्ज्य होऊ शकत नाही किंवा स्वतःला वर्ज्य करत नाही. मग या सर्व सत्याच्या पार्श्व भूमीवर भक्तीच्या नऊ मार्गातील दास्य भक्ती काय महत्व दर्शवते, यावर जरा विचार करूया.
एखादं उदाहरण घेऊया, म्हणजे हा मुद्दा समजून घ्यायला मदत होईल. असं बघा, एखादा अनेक वर्ष सेवानिष्ठ असलेला सेवक आणि त्याचा स्वामी आहे.त्या सेवकाला आणि त्याच्या कुटुंबाला या स्वामी शिवाय कोणताही दुसरा आधार माहीत नाही. समजा त्या सेवकाच्या आयुष्यात काही अडचण आली किंवा एखादं कार्य उभं राहिलं, तर त्याला खात्री आहे की, त्याचा स्वामी त्याला, त्या अडचणीतून बाहेर काढेल किंवा काही सहाय्य जरूर करेल. या एका ठाम विश्वासावर तो आहे. त्याच्या या विश्वासा प्रमाणे त्याचा स्वामी त्याला सहाय्य करेल का, का करेल यावर जरा चिंतन करूया.
त्याला येणारी अडचण, हा त्याच्याच पूर्वकर्माचा भाग झाला. याची स्वामीवरील निष्ठा, त्यांच्या सेवेतील त्यांचा प्रामाणिकपणा व त्याची वर्षांची मेहनत हे देखील त्याच्याच स्वामिनिष्ठ कर्माचाच भाग आहे. त्यामुळे, त्याच्या या सेवेला, वृत्तीला, चिकाटीला कर्मरुप फल प्राप्ती होणार, हे नक्की. म्हणजे येणारी अडचण वा समस्या हे देखील त्याचंच कर्म आहे. मग त्याचं फल त्याला, त्याच्या अडचणीतून मार्गरुप उत्तरातून नक्की प्राप्त होईल.
पण ते फल, त्याच्या अडचणीच्या काळात त्याला प्राप्त होईल का, हे त्याच्या सेवेतील स्वामिनिष्ठा, प्रामाणिक पणा, चिकाटी सेवाभाव या गुणांवर अवलंबून आहे. म्हणजे यातून आपल्याला, आपल्या विषया संदर्भात, जे चिंतन प्राप्त झालं, याचा जरा विचार करूया. तो स्वामी म्हणजे जगताचा स्वामी अर्थात ईश्वर आणि त्या स्वामींचा तो सेवक म्हणजे त्याला सर्वस्व मानून, त्याची सेवा करणारे भक्तगण आहेत. म्हणजे त्या ईश्वराची चाकरी हे आपलं भक्तीरुप अध्यात्मिक कर्म आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला कर्माच्या दोन संज्ञा मिळाल्या.
एक भौतिक कर्म आणि दुसरं अध्यात्मिक कर्म. कर्मांची अशी विभागणी करता येते का. हा एक प्रश्न मनात येतो. पण याचं उत्तर अनेक ठिकाणाहून आपल्या मिळू शकतं. पण त्यातील सर्वात मुख्य धागा हा श्रीमद्भगवतगीता या मधे नवव्या अध्यायातील बाविसाव्या श्लोकात, स्वतः भगवंत सांगतात त्याप्रमाणे आपल्याला सापडतो. भगवंत वचन देतात की,जे जन,माझं अनन्य भावाने चिंतन करतील,माझी उपासना करतील, अश्या, माझ्याशी नित्य संयुक्त असलेल्या माझ्या उपासकांचं योग क्षेम मी वाहीन. श्लोक खालील प्रमाणे आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
आता या श्लोकाच्या चिंतनातून, आपल्याला दास्यत्व या भक्ती मार्गाच्या मर्माचं किती नवनीत हाती लागतं, याचा विचार व चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत आपण त्या विश्वात्मक शक्तीच्या चिंतनात, त्याच्याशी निष्ठ राहण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment