अध्यात्म विराम १९
श्रवण आणि त्या संदर्भात शुद्धता, यांचा विचार करण्या आधी, ईश्वराला मनाची व त्यायोगे आत्म्याचीच शुद्धता का अपेक्षित आहे यासाठी एक उदाहरण घेऊ. असं समजा की, एखाद्या घरात दहा व्यक्ती राहतात. रोज सकाळी उठून शुचिर्भूत होऊन, धुतवस्त्र परिधान करून, पूजापाठ करण्याचा सर्वांचा संकल्प आहे.
त्यानुसार सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर स्नान करणाऱ्या व्यक्तीला नवव्या क्रमांकावर स्नान करणारी व्यक्ती आंघोळीची तयारी व वस्त्र इत्यादी पुरवते. म्हणजे दहावी व्यक्ती पूर्ण शुद्ध स्वरूपात स्नानगृहाबाहेर येते. येताना आपली वस्त्रे स्वतः धुवून, वाळत घालते. म्हणजे दुसऱ्या दिवशी शुध्द आणि सात्विक वस्त्रे परिधान करता येतील. याच क्रमाने दहा ते दोन पर्यंत सर्व व्यक्ती शुचिर्भूत होऊन, शुद्ध होतात.
आता या उदाहरणावरून एक लक्षात येईल की दहा ते दोन या व्यक्तींना आधीची व्यक्ती स्नाना पश्चात, धुतवस्त्रे स्वतः देत असल्यामुळे, सदरील पुढची प्रत्येक व्यक्ती, पूर्ण शुचिर्भूत होते असं गृहीत धरूया. पण पहिल्या व्यक्तीचं काय. त्या पहिल्या व्यक्तीने स्वतः जर स्नाना आधी, स्वतः सर्व वस्त्र घेतली असतील तर, तो पूर्ण शुद्ध वा शुचिर्भूत नव्हता असेच म्हणता येईल.
हे उदाहरण आहे. पण आता ह्या दहा व्यक्ती, म्हणजे आपले मागील दहा जन्म जन्मातील मन उतरत्या क्रमाने आहे असे समजा. म्हणजे दहावी व्यक्ती हा वास्तविक पहिला जन्म पूर्ण शुद्ध आणि शुचिर्भूत आत्मस्वरूप. पण जसजसा जन्म पुढे पुढे जाईल, त्यावेळी लक्षात येईल की, ही मनाची शुद्धता गडद होत जाईल. याच क्रमाने आपला सद्य जन्म हा, ती पहिली व्यक्ती आहे.
आता यातून ध्यानात घ्यायचं सार हे आहे की, पुढील जन्मासाठी आपल्या मनाची शुद्धता आहे त्याहून, गडद किंवा धूसर वा अशुद्ध करणं किंवा आहे ती अशुद्धता कमी करून, पुढच्या जन्मासाठी आत्म्यासह मनोमय कोष पाठवणं आपल्याच हाती आहे. यासाठी ईश्वर निर्मित प्रथम भक्तिमार्ग श्रवण कसा काय उपयोगी येऊ शकतो, याचा आता विचार करूया.
गर्भात ऐकलेले विचार श्रवण प्रक्रियेने शुद्ध स्वरूपातील, विकार रहित मनातून आत्म्यावर कोरले जातात. मग यावर देहातील, विकार व विचार यांच्या जागृती नंतर आणि त्या विकार व विचार यांच्या गुणधर्म व शुद्धी अशुद्धी यानुसार बदल होत जातो. त्यानुसार नराचा नारायण वा नराचा पशू होतो. ही सर्व मनावरील संस्कारांची प्रक्रिया आहे.
मनावरील ही विविध आच्छादने, मनातील मूळ शुद्ध स्वरूपाला पूर्ण झाकोळून टाकते. यात श्रवण प्रक्रियेचा किती व कसा सहभाग आहे, यावर पुढील सर्व ठरणार आहे. म्हणून त्याचा सखोल अभ्यास, उद्याच्या भागात करूया. कारण जितके खोल जाऊ, तितकाच शुद्ध ज्ञान प्राप्त होईल आणि विचार निरभ्र होतील.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment