अध्यात्म विराम ११
आता यातील, अर्थात चार आणि पाच या टप्प्यांवर, जीवाला विशेष सहाय्य लागतं. यात महत्वाचं तत्व किंवा शब्द ध्यानात ठेवा, तो म्हणजे, हे सहाय्य आत्म्याला द्यावं लागतं किंवा गरजेचं असतं. देहधारी कोणीही असो आणि कोणत्याही ठिकाणी असो, हे विशेष सहाय्य, त्याच्या प्रारब्ध योगानुसार, त्याला प्राप्त होतं. कदाचित, या टप्प्यावर येण्याचं हे प्रारब्ध, त्याच्या कर्माच्या फल स्वरूपात प्राप्त होतं.
आता पहिल्या तीन टप्प्यातील जीवांना, देह, देहाचे उपचार, देहाच्या उपाध्या यांच्या व्यापात आणि व्यवहारात जीवनाकडे, आत्मचिंतन करायला, समय आणि संधी मिळत नाही. परंतु, पहिल्या दोन टप्प्यातील जीव, मानव योनीतील जीवन कमी प्रमाणात जगतात.
मुख्यत्वे, प्राणी योनीतील, राहिलेले भोग भोगण्याचं जीवन जगणं, हेच यांचं मुख्य प्राप्त संचित असतं. यातून प्राप्त व्यस्त जीवनातून, स्व, स्वार्थ, स्वहित, मोह माया, यांच्या प्रभावात जगण्याची कसरत करणं, हा एकच उपाय शिल्लक उरतो. इतर अनेक गोष्टी, जसं सत्कर्म, सत्कार्य, शुभ इच्छा इत्यादींसाठी, उसंत मिळवणं, हे यांच्यासाठी एक दिव्यत्व असतं.
त्यामुळे यातून, आत्मशुद्धी, चित्तशुद्धी, आत्मोद्धार, आत्मौंन्नती या प्रकारच्या मार्गाचा विचार करण्याची फुरसत वा उसंत मिळण्याचा किंवा तसा विचारही मनात येण्याचा प्रश्नच, उद्भवत नाही. परंतु यांच्यासाठी परम दयाळू ईश्वराने, या लोकांनी, पायरीच्या वरच्या टप्प्यावर, जावं, या सदीच्छेने,सर्वात सहज सुलभ श्रवण रूप असा भक्तिमार्ग, निर्माण करून, असे अनेकानेक जनसामान्य, पुढे जात राहतील, याची योजना केली आहे.
या भक्ती मार्गाचं वैशिष्ट्य हे आहे की, परमेश्वर संकीर्तन, नाम, महती, कथा, पुराणं, वेद यांचं मात्र श्रवण केल्याने, अनेक जन्माच्या पापांचं क्षालन, अर्थात परिमार्जन होऊन जीव, पुढील जन्मात, उन्नत अश्या पुढील मार्गाकडे गमन करतो.
या प्राप्त नरदेहाचं जे साध्य आहे, त्या साध्याकडे, ध्येयाकडे, मार्गक्रमण, करण्याचा हक्क आणि अधिकार, जो प्रत्येक जीवाला आहे, तो साधण्यासाठी, परमेश्वर निर्मित नवविधा भक्तितील या पहिल्या मार्गाबद्दल, उद्याच्या भागात विस्ताराने चिंतन करूया. तोपर्यंत शक्य त्या उपायाने, ईश्वर चिंतन करत राहण्याचा आपला प्रयत्न पुढे सुरूच राहील, हे पाहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment