Skip to main content

अध्यात्म विराम ८६

अध्यात्म विराम ८६

देह आणि रूप अनेक, परंतु अंतरी तत्व एकच, असं सद्गुरू तत्वाचं स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप यातील भेद समजून मग पुढे जाऊ. रूप म्हणजे जे सर्वात प्रथम डोळे अर्थात चर्म चक्षूना समोर दिसत आणि एखाद्या व्यक्तीची देहरूप प्रतिमा जी आपल्यात नजरेस येते, ते. पण स्वरूप म्हणजे अंतरी त्या व्यक्तीचं खरं व्यक्तित्व, मन बुद्धी या पलीकडे जे आत्मतत्त्व आहे, त्याचे प्रकट किंवा अप्रकट रूप.म्हणजे बाह्यांगी प्रकट दिसतं ते रूप आणि जे अंतरी अप्रकट आहे ते स्वरूप. मुळातच स्व या शब्दात त्याचा अर्थबोध होतो. 

स्वरूप या शब्दातील हा स्व म्हणजे अहं रुपातील स्व असेल किंवा आत्मतत्त्व जागृत होऊन, आत्मज्ञान झाल्या नंतर शून्यात सापडलेलं गहन परब्रम्ह प्राप्ती पश्चात आलेलं आत्ममग्न आत्म स्वरूप असेल. म्हणजे स्वरूप आणि रूप यातील भेद हा भौतिक जगतातील, ग, अहं या अवगुणांपासून ते निर्गुण परब्रम्ह प्राप्तीच्या आनंदात रत असलेलं आत्मरुप असेल, इतकी विशाल खोलीतील असू शकतं. 

एखादी व्यक्ती आपण बाह्यांगी पाहून, त्या व्यक्तीबद्दल, जे मत तयार करतो किंवा धारणा धरतो, ते मुख्यतः रुपा बद्दल असतं किंवा असू शकतं. पण त्या व्यक्तीला पूर्ण जाणल्यावर, त्याच्या वर्तन व वागणूक यांचा अनुभव घेतल्यावर जे मत बनवलं जातं ते त्याच्या स्वरुपाबद्दल असतं.याचं दीर्घ विवेचन करायचं कारण म्हणजे, सद्गुरू तत्व हे असच अप्रकट स्वरूपात विहरणारं आणि योग्य वेळी व योग्य काळी आपलं स्वरूप प्रकट करून, या जगतातील, ज्या जनांची ज्ञानप्राप्तीची व भोग समाप्तीची वेळ होत आली असेल, त्यानुसार कार्य करत राहतं.

यातील मुख्य मुद्दा किंवा खरी गुह्यता ही आहे की, यांना देहरुपात किंवा बाह्यरुपात न पाहता, त्यांच्यातील सद्गुरू स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या सद्गुरू स्वरूपात असणाऱ्या आणि देहरुपात प्रकट होऊन, आता आपलं देह रूप सोडून गेलेल्या अनेक सद्गुरू तत्वांच्या चैतन्य शक्ती व ऊर्जा यांची अनुभूती व प्रचिती अजूनही अनेकांना येते. पण या तत्त्वांचा देहारुपात येऊन जाण्याच्या मागील मुख्य उद्देश आपण जाणून घेतला पाहिजे.तरच त्यांचा देहात येण्याचा उद्देश सफल झाला किंवा होईल असं म्हणता येईल.

त्यांना देहात येण्याची प्रेरणा ही ईश्वराकडूनच दिली जाते. म्हणजे ज्या ज्यावेळी ईश्वराला या भुलोकी अनेकांचा उद्धार करून, त्यांना मुक्ती व मोक्ष मार्गाला लावायचं असेल किंवा त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार,त्यांना आत्म ज्ञान देऊन, जगताबाहेर जाण्याचा मार्ग दाखवण्याची आवश्यकता असेल, तेंव्हा व त्या त्यावेळी, ईश्वरी प्रेरणेने, सद्गुरू स्वरूपातील चैतन्य तत्व देह धारणा करून, या जगतात आपला काही काळ व्यतीत करून, सामान्य जनांना, भोगापासून मुक्तीचा व ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवून, त्यांना जन्म मरण फेऱ्यातून, मुक्त होण्याच्या मार्गावर अग्रेषित करून, आपला देह सोडून, पुन्हा अंतरात चैतन्य स्वरूपात विहार करतात. 

यावर अजूनही दीर्घ विवेचन अपेक्षित आहे, म्हणून हाच विषय उद्या पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत आपण त्या ईश्वराला स्मरत आपला मुक्तीच्या मार्गाला प्रशस्त करण्याच्या कार्यात काही पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...