अध्यात्म विराम ९२ सख्य आणि भक्ती हे बऱ्याच प्रमाणात समान आहेत. सख्य म्हटलं की, सखा हा नेहमी बरोबरीचा असतो. एकमेकांच्या मनात, समान पातळीवरील भाव आणि भावना असतात. एकमेकांविषयी जिव्हाळा, स्नेह आणि ममत्व समान असतं. अनेकदा आपल्याला अश्या मत्रीच्या गोष्टी वाचायला मिळतात ज्यामधे, ये ह्रदयीचे ते हृदयी, न सांगताही कळले, असं घडतं. बरं असं घडणं, हा निव्वळ योगायोग नसतो, तर तो समान पातळीवरील, विचारांची, मनाची समसमान आंदोलनं, समान स्पंदनं आणि समान लहरींचं प्रसारित होणं, या गोष्टी सहजी घडतात. लहरींचं प्रसारित होणंच नव्हे तर, त्या लहरींचं दुसऱ्याच्या मनाने ऐकून, समान साद देणं, हेदेखील सहजी घडतं. म्हणजेच कोणतीही गोष्ट मुद्दाम कळवावी लागत नाही, एकमेकांना. सर्व काही आलबेल असेल असं नक्कीच नाही. पण काहीही गैर घडल्यास आपला सखा समजून आणि सांभाळून घेईल, हा विश्वास दृढ असतो किंवा असावा. किंबहुना विश्वासाच्या एका अदृश्य धाग्याने, हे सख्यत्वाचे संबंध, दृढ केलेले असतात. हा धागा खूप कोमल, पण त्या दोन्ही हृदयातील भावनांनी बांधलेला आणि मजबूत असतो. सख्य खरं आणि मनातून असेल तर, प्रत्यक्ष बोलण्या शिवाय संवाद, प्रत...