अध्यात्म विराम १४९
सर्वसामान्य मानवी मनाचा हा गुणधर्म आहे की, एखाद्याचे ऋण असतील आणि त्यावर आपल्या जीवनाचा डोलारा उभा असतो, त्या ऋणकर्त्याचे ऋण आपण सहसा विसरत नाही. कृतज्ञ माणसाचं ते लक्षण आहे. आयुष्यात कितीही वर गेला तरीही, कोणताही माणूस, आयुष्यातील अश्या मदतीचे ऋण विसरत नाही, ज्याच्या आधारावर आपण पुढे जातो. आता या आपल्या कृतज्ञता पूर्ण स्वभावाच्या पार्श्वभूमीवर आपणच स्वतः बद्दल हा विचार करावा की, आपल्याला हा देह,मुळात हे श्वासाचं गणितं पुरवून, ज्याने आपल्याला या पृथ्वीतला वर पाठवलं आहे, त्याचे ऋण आपण कधीतरी फेडू शकतो का. तर नाही.
बरं तो ईश्वर आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, अश्या अनंत प्रकारचे उपकार करून, आपलं जीवन समृद्ध करतो. पण तरीही जर काही न्यून असेल तर ते आपल्या कर्मातुन आलेलं न्यून आहे. असं असताना सुद्धा आपण, आपल्या कर्माच्या भोगांचा हिस्सा, ज्याचे आपल्यावर आधीच ऋण आहेत, अश्या ईश्वराच्या नावावर टाकून, आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करतो.
ईश्वराला सुद्धा हे पाहून खेद वाटतं असेल की, करणार माणसं स्वतः, उपभोग सुख आलं की, आपल्याकडे त्यांचं श्रेय घेऊन मोकळे होतात. पण भोग वा दुःख आलं की, माझ्याकडे अंगुलीनिर्देश करून मोकळे होतात. किती हास्यास्पद आहे.म्हणूनच या ऋण कर्त्या ईश्वराला, दिवसा तून एकदा जरी, त्याच्या उपकारचं श्रेय दिलं तर, नक्कीच त्याचा लाभ आपल्यालाच मिळेल. कारण ईश्वरच एक वैशिष्ट्य आहे की तो कोणतेही उपकार बाकी ठेवत नाही. सर्वाची, त्या त्या व्यक्तीला सव्याज परतफेड करून मोकळा होतो.
आपल्याच कृतज्ञता पूर्वक उच्चारलेल्या काही अक्षरांचा, भावनांचा, अगणित रुपात, परतावा आपल्यालाच प्राप्त होतो, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच माणसाला फक्त मनातल्या मनात ईश्वराच्या अनंत उपकाराबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे. ईश्वर इतका दयाळू व कृपाळू आहे की, तो आपल्या मनातील भाव जाणून, त्याचा स्वीकार करतोच करतो. या व्यतिरिक्त दुसरा मार्ग म्हणजे, त्याच्या नावाचा पुनरुच्चार करून,त्या द्वारे त्याचे आपल्या वरील अनंत ऋण व्यक्त करायचे. हे ऋण फक्त याचं जन्मातीलच बसून,ते मागील अनंत जन्मातील असू शकतात.
म्हणून त्याला सतत स्मरत गेल्यास, या अनंत रुणा तील काही कमी होण्यास मदत मिळते. त्याला आपल्यारख्या भक्तांची जरूर असतेच. अजून एक लाभ म्हणजे प्रत्येक श्वासा गणिक, तो आपल्यासोबत आहे, याचा आपल्याला प्रत्यय येतो. दूसरा लाभ म्हणजे, स्मरणाच्या मार्गाने मरणाच्या दारापर्यंत गेल्यास, पुढील जन्माची, संचिताच्यां वहनाची जबाबदारी त्या ईश्वराकडे जाते. कारण अंते मती सा गती, या न्यायाने अंत समयी, जी बुद्धी होईल, किंवा जे प्रत्यक्ष कल्पनेत, ओठांवर व मनात असेल, त्यानुसार आपल्याला पुढील जन्माची प्राप्ती होते.
विषय मोठा आहे, त्यामुळे उद्याच्या भागात प्पुढे सुरू ठेवू.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment