अध्यात्म विराम १२४
कालच्या भागावरून आता विचार करा की, आपल्याला आपल्या आत असलेलं आत्मरूप लोणी जाणवत नाही. पण सद्गुरू माउलींना साधकांच्या देहात असलेलं आत्म रूप लोणी बाहेर काढून, ते ईश्वरापर्यंत नेण्याची जबाब दारी असते. आता विचार करा, जिथे आपल्याला देहाच्या जाणीवा अप्रगत असल्यामुळे, आपल्या आतील आत्मा जाणवत नाही, तिथे सद्गुरू माऊलींना सर्व साधकांच्या आत्मतत्वाची जाणीव असते. म्हणजे त्यांच्या जाणीवा किती प्रगल्भ आणि उच्च पातळीच्या असतील.
हेच तीन चार भाग आधी लिहून, मी या ठिकाणी आलो. मधल्या काही लेखात, त्याचा विस्ताराने उहापोह केला, तो यासाठी. आता वाचकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल की, दुधातून लोणी काढण्याच्या प्रक्रिये इतकीच किंबहुना त्याहून क्लिष्ट आणि त्रासदायक प्रक्रिया, आत्मा तत्वाला जागृत करण्याची आहे.
अश्या विषम आणि व्यस्त परिणाम असलेल्या लढाईत, जिथे त्या लढाईतील मुख्य सहभागी जीव असलेला साधक, या सर्व प्रक्रिये बाबत अनभिज्ञ असताना आणि त्याच्या देहाच्या जाणीवा अतितीव्र असताना, त्यापासून दूर नेऊन,परावृत्त करून,भक्तीमार्गावर अग्रेशित करायचं, हे त्या सद्गुरूसाठी किती कठीण कार्य असेल, याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.
म्हणूनच आपण साधक म्हणून सेवा करताना, पाहिजे ते इच्छा केले ते सर्वच्या सर्व आपल्याला, त्यांच्या शक्ती मधील भाग असूनसुद्धा, ते न देण्यासाठी, सद्गुरूंना त्यांच्या स्वतःच्या करूणेवर, मायेवर, प्रेमावर नियंत्रण ठेवावे लागत, अंकुष ठेवावा लागतो. त्यांना सर्व दिसतं, कळतं. पण कुठे भक्ताला, साधकाला भोगातून, त्या भोगांच्या आचेतून, जाणं अत्यंत गरजेचं आहे, हे त्यांना माहीत असतं. नव्हे त्यांचं त्या आचेतुन परिपक्व होत असलेलं, साधकांच्या आत्मरूप तत्वावर लक्ष असतं.
नव्हे त्यांना तिथेच लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच कधीकधी त्यांना साधकांचा देह जळत असताना, त्रास, भोग या भावातून मन होरपळत असताना, शांत स्तब्ध बसावं लागतं. कारण त्या देहातील आत्म्याच्या पूर्वकर्मातील बीजं, नष्ट झाल्याशिवाय शुद्ध स्वरूपातील, मन आणि त्यापेक्षा शुद्ध सात्विक स्वरूपातील आत्मज्योत फुलणार नाही हे ज्ञात असतं.
कारण आज कदाचित एखाद्या वेळी सहाय्य केलं तरी, पुन्हा कधीतरी तो भोग, ते दुःख, तो त्रास साधकांना भोगावा लागणार असतोच. परंतु मोक्ष मुक्तीच्या वाटेवर चुकीच्या वेळी, अश्या भोगांच्या येण्याने, प्रगतीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो किंवा प्रगतीपथावर असलेला जीव अधोगतीला जाण्याचा धोका असतो.
म्हणूनच असे भोग योग्य वेळी संपून गेलेले जास्त श्रेयस्कर असतं. त्याशिवाय जाणिवांच्याजागृती, प्रगती व प्रगल्भता त्या मनाला आणि त्या माध्यमातून जीवाला प्राप्त होणार नाही, हे तेच जाणत असतात. हाच विषय उद्याच्या भागात पुढे नेऊया. तोपर्यंत साधन सुरूच ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment