अध्यात्म विराम १३१
अनेकवेळा मन अनेक कारणांनी, बोथट, कठोर किंवा रुक्ष होतं किंवा होऊ शकतं. असा प्रत्यय आल्यानंतर, आपण त्या मनाला, थोडावेळ, निश्चिंत किंवा शांत बसायला लावावं. जेणेकरून, त्याला आपल्यातील रुक्षतेची प्रचिती येईल. या प्रचीतीचा अनुभव अनेक प्रकारांनी मनाला येऊ शकतो. आपण बरेचवेळा चित्रपटात पाहतो की, एखादी अती तापट, कोपिष्ट व्यक्ती, एकतर तितक्याच तापट, रागीट व्यक्तीच्या सान्निध्यात आली असता, विचारी होते आणि काही क्षणात त्या व्यक्तीच्या स्वभावात अमुलाग्र बदल होतो किंवा होऊ शकतो.
या मागे मानसशास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहे. दोन समान आणि अविनाशी व एकाच दिशेने आलेल्या शक्तींचा संघर्ष झाला की, त्या घर्षणातून नक्कीच काही उत्तम उत्पन्न होतं, हा निसर्गनियम आहे. उदाहरणार्थ एकाच दिशेने आलेले दोन ढग, जेंव्हा एकमेकांवर आदळतात, तेंव्हा त्यातून पाऊस आणि वीज निर्माण होते, हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. त्याप्रमाणे मन जेंव्हा अतिरागीट वा अतीचंचल असतं, तेंव्हा त्याला एकतर अतिविचाराने किंवा एकदम शांत करून, नियंत्रणात आणता येतं.
म्हणून आपल्या हातात जे आहे, ते म्हणजे ज्या क्षणी राग, क्रोध अती येईल किंवा सीमेवर असेल, त्या क्षणी त्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे धावत्या धबधब्याला अचानक रोकण्यात आलं तर, त्यातील पाणी आणि त्याचा वेग व शक्ती याना खीळ बसतो. पण ती शक्ती वाया जात नाही तर ती नियंत्रित करता येऊन, त्याचा सदुपयोग करता येतो. त्याप्रमाणे अश्या अवखळ, वांड, अतीशीघ्रकोपी मनाला, आपण त्या क्षणी शांत करून, त्याला आपल्या पद्धतीने कार्याला लावू शकतो.
मनाला शांत करून त्याला, कोणत्या कार्याला लावायच, हे सुद्धा मनात योजलेले असणे किंवा ज्ञात असणे महत्वाचं आहे. म्हणजे त्या शांत मनाला त्वरित उत्तम कार्यार्थ जुंपता येऊ शकतं. म्हणून ही योजना सुद्धा तयार असावी. त्या मनाला शांत करून आपण त्याला उत्तम अश्या ईश्वरी नामाच्या मार्गाला लावू शकतो. अती कोपी मन शांत केल्यानंतर, त्याला त्याचं शांत अवस्थेत, नाम, नाद, ध्वनी, धून, स्वर यांच्या नादात गुंतवू शकतो.
थोडक्यात मन चंचल असो, रागीट असो व सामान्य असो, त्याला शांत बसण्याची सवय लावण्यासाठी आपण डोळे मिटून, ध्यान धरून किंवा मनात कल्पना योजून, एखादी मूर्ती वा एखादा नाद यांच्यामधे गुंतवून, त्याला त्याची आवड निर्माण करू शकतो. हे काम कोणतीही जोर जबरदस्ती करून साधणार नाही. यासाठी आपल्या मनाला एका विचाराने भारून टाकता आले पाहिजे. तो विचार आतून आला पाहिजे.
कारण मन हे बाहेरून आलेल्या विचारांना पटकन स्वीकारत नाही. म्हणून त्या विचारांची सुरुवात आतूनच व्हावी. तो विचार म्हणजे मी जे मनाला शांत करणार आहे, ते माझ्याच हिताचे आहे. हा विचार मनात खोलवर रुजला पाहिजे. म्हणजेच या विचाराची पक्की मशागत मनात झाली पाहिजे. पण हे कसं शक्य आहे, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत ईश्वराच्या नामात किंवा नादात मनाला डुंबवून काढण्याचा प्रयत्न करावा.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment