अध्यात्म विराम १४३
कर्ममार्ग आचरतांना, आपल्या कर्माच्या फलातून आपलं जीवन नित्य, अविरत आणि प्रवाही होऊन, पुढे जात असतं. जगात साधारण तीन, चार प्रकारची लोकं असतात.एक आलेलं जीवन निमूटपणे जगून, कोणतीही तक्रार न करता, आपल्याला मिळालेलं आयुष्य जगून, हे जग सोडून निघून जातात. एक प्रकारे निरिच्छ म्हणता येईल, अशी ही माणसं. दुसरा प्रकार म्हणजे, कष्ट, दुःख, भोग या प्रत्येक वेळी, तक्रार करून, सुख आलं की, आपल्या कर्माच्या फलाची प्राप्ती, असं म्हणून आपल्या चांगल्या दिवसांचं, आपल्या कर्मांना श्रेय देऊन, जगणारे जीव.
याना आपल्या उत्तम काळात देव, दैव आठवत नाही, किंवा आठवावस वाटतं नाही. पण भोगांच्या काळात यांना आपला देव आपल्यालाच कसा त्रास देतो, याची सतत बोचणी किंवा सल सतावत असते. म्हणजे सुखात आपल्या कर्माने आपल्याला प्राप्ती होत आहे, हा नाण्याच्या एका बाजूचा न्याय वा तत्व, आपल्या भोग व दुःख या काळात लागू होतं, ही नाण्याची दुसरी बाजू त्यांना जाणवत नाही, किंवा मंजूर नसते, असच म्हणावं लागेल. म्हणून याना कायम देव यांनाच दुःखात लोटतो, या गोष्टीचा त्रास, मनाला सतत टोचत असतो.
तिसऱ्या प्रकारात, कर्म आणि त्याचं फल हेच श्रेष्ठ आहे आणि माझे भोग आणि सुख दोन्ही माझ्याच कर्माचं फल रूप आहे, हे त्यांना माहीत असत आणि त्यांच्या मनाची धारणा, त्यानुसार तयार झालेली असते. हे सर्व प्रसंगात, सुखात, दुःखात कायम जमिनीवर असतात. यांची कर्मा वर श्रद्धा आणि विश्वास दृढ असतो. त्यामुळे हातून चुकीचं कर्म घडणार नाही, याची काळजी याना घ्यावीशी वाटते. पण हे लोक पडत्या काळात कधीही देव दैव यांना नावही ठेवत नाहीत आणि दोषही देत नाहीत.
चौथा प्रकार म्हणजे हे लोक कर्मनिष्ट असतातच, आपल्या कर्माची फल रूप निष्पत्ती आहे, हे माहीत असतं. त्यांचा त्यावर ठाम विश्वास असतोच. पण या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे, याचा शोध त्यांच्या मनात सतत चालू असतो. त्यासाठी आवश्यक ज्ञानप्राप्ती, करून घेण्याचा यांचा सतत प्रयत्न असतो. आपलं आयुष्य हे फक्त या कर्मफल स्वरूपात जगण्यात, याना स्वारस्य नसतं. तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न व त्यासाठीचा पाठपुरावा, करत राहण्यासाठीच हे जीवन आहे, याची जाण त्यांना असते.
या सर्वांच्या वर असलेले लोक म्हणजे पाचव्या प्रकारात कर्म मार्गी राहूनही, अध्यात्मिक वाटचाल करण्यात. अग्रेसर असलेले आणि आयुष्यातील कोणत्याही सुख व दुःख याचा, आपल्या मानसिक स्थितीत, विचारात आणि चिंतनात कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देत नाहीत. याना जीवनात आल्याचं उद्देश माहीत असतं. सद्गुरू व ईश्वर कृपेने यांच्या कर्म फल आलेखात सुधारणा होत असते.याना आत्मतत्वाचा साक्षात्कार किंवा जाणीव झालेली असते. या जागृतीचा परिणाम, नित्य त्यांच्या, जगण्यात, विचारात आणि वागण्यात दिसून येतो.
या पुढील प्रकारच्या लोकांचा विचार आणि त्यातून आपल्यासाठी काय शिकणं आवश्यक आहे, याचा विचार आपण उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment