अध्यात्म विराम १५२
मनातील ईश्वरी भक्तीचा भाव स्मरणातून सुरू होतो. स्मरणातून, उच्चारण, त्यातून श्रुती श्रवण, त्याची आवर्तनं, आवर्तनातून अर्चन, अर्चनातून अर्पण, अर्पणा तून शरण, शरणातून दास्यत्व, दस्यत्वातून सख्य असा हा भक्तीचा मनोमय प्रवास, देहाकडून अंतरात्मा आणि त्यातून परमात्मा या स्थानी समाप्त होतो. आता यातील एकेक मुद्द्यावर विचार करूया. एक गोष्ट ध्यानात असूद्या की, ईश्वर देह आणि देहाची स्थिती याबद्दल अनभिज्ञ असतो. किंबहुना कोणाही प्राण्याबद्दल ईश्वर देही न पाहता, मनाच्या स्थितीला पाहतो आणि त्यातून प्राण्याची परीक्षा करतो.
अर्थातच मानवाच्या देहात मनाची स्थापना करून, बुद्धीच्या माध्यमातून त्याला उच्च अधिष्ठान दिलेलं असल्यामुळे, मुख्यत्वे हे सर्व मानवाच्या मनाबाबत आपण बोलत आहोत हे गृहीत धरावं. आपण देहाने केलेले कोणतेही उपचार ईश्वराकडे पोचत नाहीत. कारण ते देहाचे उपचार आहेत आणि मनाचा त्यात सहभाग नसेल तर, ते केवळ एक कर्म आहे. अर्थात त्या कर्माच जे फल, उपाचारपूर्वक प्राप्त होणं गरजेचं आहे, ते नक्की मिळेल. पण कोणत्याही स्वरूपाचं ईश्वरी आराधन हे मनाने आणि मुखतः आत्म्याने घडलेलं असेल तर ते पूर्ण फलदायी होतं.
याबाबत. कोणतीही संदिग्धता बाळगायची जरुरी नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे देहाची उपलब्धता ईश्वराने, त्याचे स्मरण, पूजन, अर्चन, चिंतन भजन या माध्यमातून, प्रत्येक भक्ती मानवाने करावी, यासाठी करून दिलेली आहे. त्यामुळे देह हा निव्वळ एक माध्यम आहे. पण साधन हे मन आणि अंतरात्मा आहे, हे पक्क ध्यानात राहुद्या. त्यामुळे मनाला पूर्ण एकाग्र करूनच कोणतंही ईश्वरी कार्य करावं, याचसाठी प्रथम श्रवण भक्तीचा उगम झाला. कारण गर्भात असताना आणि जन्मानंतर श्रवण माध्यमातून बुद्धिद्वारे साद, ध्वनी मनाच्या सभागृहात पोचतात. ते तिथे नोंदले जातात.
त्या साद ध्वनी याना मन हे, देह बुद्धी व वाचा या माध्यमाने प्रतिसाद देतं. त्यामुळे श्रवण, ग्रहण या क्रिया आणि कर्म हा प्रतिक्रिया, असा खेळ विधात्याने घडवून आणला आहे. यामधे मनाचा सहभाग ज्या ज्या ठिकाणी असेल, त्या त्या गोष्टी जीवाला बद्ध करतात. देहाने केलेलं सर्व देह भोगतो आणि भोगणार. पण त्यात मनाचा असलेला सहभाग जीवाला भोग आणि त्याच दुःख या भावना भोगायला भाग पाडतो. म्हणजे आपण जे भोग देहाने भोगतो, ते ते सर्व आपण देहाने केलेल्या कर्माचं फल आपल्या समोर आलेलं आहे.
पण त्यातून मनाला होणाऱ्या वेदना, दाह, त्रास हा आपल्याला त्यापुढील कर्मात बद्ध करतो. म्हणूनच संत सज्जन, शास्त्र इत्यादींनी वेळोवेळी सांगितल आहे की, देहाच्या कोणत्याही भोग वा उपभोग स्थितीत मनाला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यातून येणारी बद्धता, प्राप्त होणार नाही. म्हणजे एकप्रकारे आपल्याला समीकरण प्राप्त झालं की, सांसारिक व प्रापंचिक गोष्टीत मन हे उदासीन किंवा तटस्थ असावं आणि अध्यात्मिक गोष्टीत मनाचा पूर्ण सहभाग असावा, देहाची कोणतीही स्थिती असो.
याचाच अर्थ भोग आणि उपभोग दोन्ही काळात, मनाला त्यातून मुक्त करावं आणि निरिच्छ भावनेने त्याचा उपभोग घ्यावा किंवा दाह सहन करावा. कसं ते ध्यानात धरा. कायम हे मनात असूद्या की मी भाड्याच्या घरात रहात आहे. अर्थातच आत्मा मनाच्या सहाय्याने, तात्पुरत्या प्राप्त देहात रहात असून, त्याचं कायम स्वरूपी घर हे ईश्वराचं हृदय स्थान आहे. त्यामुळे आपला मूळ उद्देश ध्यानात राहील आणि भोग सहन करताना आणि उपभोग घेताना साहजिक तटस्थता येईल.
याचं मुद्द्याला धरून, उद्या पुढे चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment