अध्यात्म विराम १२८
हे विश्व, लहरी, त्यांचं चुंबकीय बल व त्या बलाचा प्रभाव, यावर चालतं. ज्या लहरींची क्षमता जास्त, त्या लहरी, इतर लहरींवर प्रभाव टाकून, त्या लहरींना निष्प्रभ करतात. म्हणूनच शारीरिक क्षमता ही मानसिक क्षमतेच्या व्यस्त प्रमाणात असली तरीही, त्या लहरीच्या प्रभावाने, विश्वात अनेक गोष्टी शक्य होतात. एका विशिष्ट क्षमतेच्या पुढे, मानसिक किंवा इच्छाशक्तीच्या बलाला कार्याला लावून, आपला हेतू साध्य करून घेता येतो. याचही काही शास्त्र किंवा विज्ञान आहे. कोणतंही बल कार्य करण्या आधी किंवा apply होण्याआधी, जितकं शांत आणि स्थिर असेल, तितकंच प्रभावी आणि अनेक पटींनी मारा करतं.
विज्ञानात याचं गोष्टीचा आधार घेऊन, अनेक गोष्टी साध्य केल्या किंवा करून घेतल्या जातात.आपल्या अध्यात्मिक कार्यात व मार्गात, जितकं प्रगल्भ व संयत मन, शांत असतं, तितकंच किंवा त्याहून कितीतरी पट त्याची कार्य शक्ती असते. कार्यशक्ती म्हणजे त्या उपकरणातील शक्ती व ऊर्जा यांच्या एकत्रित कार्याचा प्रभाव.
म्हणूनच एखादी व्यक्ती शांत, अर्थात आतून पूर्ण शांत असते व संयत असते, तेंव्हा तिचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच फार न बोलणाऱ्या किंवा फार व्यक्त न होणाऱ्या व्यक्ती, जास्त धोकादायक वाटतात किंवा असू शकतात. याचं कारण त्यांनी यांच्या मनाच्या शक्ती व ऊर्जा याना संयतपणे, साठवून ठेवलेलं असल्यामुळे, ती ऊर्जा व शक्ती कमी वेळेत व कमी श्रमात, आपला अत्याधिक कार्यप्रभाव दाखवते.
याचं मूळ कारण म्हणजे compressed air is more powerful than free flowing air. अर्थात नियंत्रित ऊर्जा ही जास्त संहारक असू शकते.म्हणूनच अती चपळ, अती शीघ्र कोपी, व अती बोलणारी व्यक्ती ही फार गांभीर्याने घेतली जात नाही. याला एक कारण म्हणजे आपल्या मनाची क्रयशक्ती ही वारंवार वापरली गेल्यास, त्यातील बलाचा, ऊर्जेचा ऱ्हास होतो आणि त्याची क्षमता कार्यहीन किंवा क्षीण होते.
म्हणूनच आपल्या संस्कृतीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण पडली आहे. आता हा संयम, शांतता मिळणार कशी किंवा ती कोठून आणायची हा एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. पण याच उत्तर आहे की, ती आतच आहे व बाहेर कुठेही शोधायची जरुरी नाही. मनाला नाम वा तत्सम माध्यमाने हळूहळू संयत करत नेणे.
कारण जेवढं जिभेला, जिभेच्या माध्यमातून, गळ्याला व त्याद्वारे फुफुस्स यांना कमी श्रम व कमी ताण पडतील, तेवढी हृदयाची शक्ती कमी खर्च होऊन, मस्तिष्क अर्थात मेंदूला, रक्त पुरवठा सुरळीत होतो. या सर्वासाठी देह, जिव्हा, बुद्धी व मन याना शांत बसण्याची किंवा संयत वर्तन करण्याची सवय जडवून घ्यावी लागेल. कारण वाचा, बुद्धी व मन हे जितके शांत होतील, तितकंच आपलं हे मन अंतर्मुख होतं, अर्थात आत जाण्यास सुरुवात करत.
आता हे कसं शक्य आहे, यावर उद्याच्या भागात विचार करूया. तरच या शांत मनाला आत आत नेऊन, जाणिवांना प्रगल्भता प्राप्त करून देता येईल.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment