अध्यात्म विराम १४१
खरंतर विश्वाची निर्मिती करताना विश्वाच्या पालक असलेल्या ईश्वराला, सांसारिक, प्रापंचिक आणि अध्यात्मिक, या भिन्नते बाबत कल्पना नसेल, हे म्हणणं धाडसाचं आहे. कारण त्रिकाल ज्ञानी ईश्वराला कल्पांता पर्यंत काय काय होणार याची पूर्ण कल्पना असणार. मग या दोन्हींमध्ये सांगड घालून, दोन्ही मार्गाने इश्वरापर्यत जाण्यासाठी एक मुख्य रस्ता जो यामधे आखून दिलेला आहे, तो म्हणजे,भक्तिमार्ग. पण कर्माची सीमा पार केल्याशिवाय हे शक्य आहे का. तर नाही. कारण जोपर्यंत कर्म आहेत, तोपर्यंत फलरुपात भोग व उपभोग आहेतच. पण हे भोग आणि उपभोग आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात किंवा करू शकतात.
कारण कर्महिन कोणीही राहू शकत नाही. पण मग उपाय काय. कारण मन हे असं इंद्रिय आहे, ज्याला गतिमानता आणि चंचलता दोन्ही अवगुण प्रदान केले आहेत आणि जाणिवांच्या कोणत्या केंद्रातून, कोणता विचार येईल, हे ईश्वराला सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे ते मन, सतत प्रत्येक गोष्टीचा विचार करत राहणार. सुख आलं की हरखून जाणार आणि दुःख आलं की,हिरमुसणार. म्हणजे प्रत्येक क्षण कोणत्यातरी विचारात देह, बुद्धी वाचा व सर्वेंद्रिय यांना कार्याला लावून, आपल्या इच्छा, वासना आणि आकांक्षा याना चालना देत राहणार.
प्रत्येक कर्मात आपला नित्य सहभाग देऊन, त्या कर्माची फलश्रुती समोर आल्यावर, बरोबर उलट विचार योजून, पुन्हा देह, बुद्धी वाचा व सर्वेंद्रिय यांची दिशाभूल करणार. पण यातून मार्ग काय. हा प्रश्न येतोच. तो मार्ग सुद्धा ईश्वराने सांगितला आहे. त्यानुसार याचं मनाला सत्याची जाणीव करून दिल्यास, त्याचा कर्म करताना आणि फल भोगतांना होणारा खटाटोप कमी किंवा बंद होऊ शकतो. मनाला याची जाणिव करून देऊन, त्याला कर्मात आणि फलात असलेला सहभाग सोडून द्यायला सांगता येईल.
मुळात आपल्या मनात ही गोष्ट ठसवून घेतली पाहिजे की, तुझ्या कर्मातच तुझी गती आहे. म्हणजे तुझच कर्म तुला उपयोगी येईल किंवा खड्ड्यात घालेल. अर्थातच तुझ्या वाट्याला जे चांगलं किंवा वाईट, सुख दुःख, लाभ हानी, येईल, ते सर्व तूच कधीतरी स्वतःसाठी रचून ठेवलं आहेस. तुला जे जे करण्याची बुध्दी मना कडून प्रेरणा चेतना मिळते, ते सर्वच तुला भोगरुपात कधीतरी भोगायच आहे. म्हणजे चांगले दिवस आले की, आपण केलेल्या चांगल्या कर्माचं रूप समोर येऊन उभे आहे, हे नक्की आपण समजतो.
त्याचप्रमाणे ज्यावेळी दुःखाचे, भोगाचे, कष्टांचे दिवस आले की, नक्की समजावं हे आपणच आपल्यासाठी कधीतरी लिहून ठेवलं आहे. आता यातून आपल्या मनाला काय समजावून सांगायचं ते ध्यानात घ्या. सुखाच्या दिवसात उपभोग घेताना, मनाला हे सांगायचं की, आपण केलेली कर्म आपल्याला साठी आपल्या ताटात येऊन उभी आहेत.
पण त्यामागे प्रेरणा ईश्वरी होती. कारण कर्माच्या फेऱ्यात उत्तम कर्म करण्याची प्रेरणा, हा ईश्वराचा आपल्या जीवनात, विचारात व कार्यात असलेला सहभाग आहे. त्याच प्रमाणे, भोगांच्या, दुःखाच्या दिवसात मनाला याची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे की, आपण मागील काळात केलेल्या चुकीच्या, वाईट, पाप कर्मांचा परिपाक आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे ज्या ज्या कर्मात आपण ईश्वराच्या सहभागाला, स्मरणाला विसरून जे जे कर्म केले किंवा ज्या ज्या कर्मात ईश्वराचा अभाव होता, ते भोगरूपात आपल्या समोर आलेलं आहे. आता यातील, ईश्वर स्मरणात केलेली कर्मे आणि त्या स्मरणा शिवाय केलेली कर्म हे काय गणित आहे. हे उद्याच्या भागात जाणून घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment