अध्यात्म विराम १४४
कर्मफल प्राप्ती आणि त्याचा भोग वा उपभोग हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना पूर्ण जीवन त्याच साठी आहे. काल आपण माणसांच्या वैचारिक पातळीचे पाच प्रकार पाहीले. आता त्यावर विचार आणि चर्चा करूया. अनेकदा आपण माणसांचे हे पाचही प्रकार अनुभवले असतील किंवा अश्या प्रकारच्या माणसांशी आपला जवळून किंवा लांबून परिचय, झाला असेल, निदान माहिती झाली असेल.यातील पहिल्या प्रकारातील माणसं आणि शेवटच्या प्रकारातील माणसं ही मला एकाच प्रकारातील वाटतात.
पहिल्या प्रकारातील माणसं, कोणत्याही फल स्वरूप स्थितीत आपलं जगणं दृढतेने आणि कोणत्याही प्रकारची मानसिक आंदोलनं किंवा विचारांची फारशी धांदल न होता जगतात. शेवटच्या प्रकारात ज्ञानामुळे, अनुभूती मुळे, प्रचितीमुळे आत्मसाक्षात्कार झालेले हे जीव, जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भोग आणि उपभोग दोन्ही परिस्थितीत सारख्याच पद्धतीने मार्ग क्रमण करून, जे समोर येईल ते आपल्या कर्माचं फल आहे आणि ते प्राप्त झाल्यावर स्वीकारून पुढे जाण, हे क्रमप्राप्त आहे, याची त्यांना जाण असते.
पण ही संचितातील शिल्लक कर्माबाबत त्याची धारणा असते. वर्तमानातील कर्माची बद्धता येऊ नये यासाठी, सत्प्रवृत्त होऊन, सर्व कर्म ईश्वर स्मरणात करत जाण्याची बुद्धी आणि त्याप्रमाणे कृती, हा यांच्या वर्तमानातील विचारांचा दृढ निश्चय असतो. किंबहुना, सद्गुरू कृपा प्राप्तीनंतर आता आपण प्रत्यक्ष काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, हे पूर्णपणे ज्ञात असल्यामुळे, येणारा प्रत्येक क्षण, ही सद्गुरू सेवा आणि साधना आहे, याची जाणीव यांना असते.
आपण जगतोय ते एक प्राणी जीवन नसून, आपला जन्म का आणि कोणत्या प्रयोजनासाठी आहे, हे सद्गुरू प्रभावाने आणि यांच्या मागील जन्मातील साधनेमुळे, ज्ञात झालेलं असतं. फक्त श्वास आहेत म्हणून जगायचं किंवा आला प्रत्येक क्षण हे उपचार म्हणून जगायचं, ही धारणा यांच्याठायी कधीही असतं नाही. यांना क्षण अन् क्षण ही एक साधना आहे आणि ती करण्यासाठी आपला जन्म आहे, हे उमजलेल असतं.
पण हे सर्व आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त झालेलं आहे, हे माहीत असल्यामुळे, कोणत्याही प्रकारचा गर्व, स्व, मोह, इत्यादी यांना स्पर्श करू शकत नाही किंवा स्पर्शत नाही. जाणीवेच्या वेगळ्याच विश्वात यांच्या साधनेची वाटचाल सुरू असते.आपल्या भौतिक जगता तील जीवन, हे काही शिल्लक कर्मभोग प्राप्त करून, त्यातून साधनेत सुधारणा करण्यासाठी, सद्गुरूंनी आपल्याला निवडलेले आहे. ते करणं हीच सद्गुरू सेवा आहे, याची त्यांना जाणीव असते.
ही जाणिवेची जागृती, त्यांच्या मनाला, कोणत्याही मोह, लोभ, मत्सर, द्वेष इत्यादी अवगुणांना ग्रासू देत नाही. म्हणजे हे अवगुण आहेत आणि त्यामुळे, साधनेत लुप्त मन, भ्रष्ट होऊ शकतं, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. अश्या व्यक्तीच्या संनिध्यात आलेल्या जीवांना सुद्धा यांच्या साधनेचा परिसस्पर्श लाभतो.
यावर अजूनही विस्तृत चिंतन उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment