श्रीकृष्णनीती भाग ३१
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्णांनी संपूर्ण आयुष्यात अजून एका गोष्टीची स्थापना केली ती म्हणजे धर्म या शब्दाचा सुयोग्य अर्थ प्रस्थापित केला. मुळात धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य हा आहे. एखाद्या व्यक्तीचं एखादी गोष्ट करण्यातील कर्तव्य, हा त्या व्यक्तीचा धर्म झाला. याचा उचित अर्थ त्या त्या परिस्थितीनुसार कसा लावायचा आणि यात राजाचं वा एका क्षत्रियाचं काय कर्तव्य आहे वा धर्म आहे, हे गीतेतील तत्त्वज्ञानाने नीट उलगडून सांगितले. राजाने पाळावायचा धर्म, हा राजधर्म अर्थात राजाची कर्तव्य राजाने पाळली पाहिजेत, हे स्वतः सुयोग्य पद्धतीने राज्य करून, प्रजेला सर्व सुख सोयी सुविधा देऊन, आपले कर्तव्य पूर्ण करून सिद्ध केलं.
आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य अनेक रूपाने जसं द्रौपदीचं शीलरक्षण करून,नरकासुर वधानंतर त्याच्या कैदेत असलेल्या १६१०० राजकन्यांना स्वीकारून आपलं नाव दिलं. पण आपलं नाव दिलं याचा मतितार्थ त्या काळच्या रुढीनुसार एखाद्या खल पुरुषाच्या कैदेतून सुटून आलेल्या स्त्रीला, समाज स्वीकारत नसे. स्वतः जेंव्हा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला, त्यांचा उद्धार केला, त्यावेळी त्यांनी खूप मोठा आदर्श घालून दिला. नव्हे त्यांनी एका चुकीच्या सामाजिक रुढीला अमान्य करत, नवीन आदर्श निर्माण केला. तरीही तो नंतरच्या काळात हजारो वर्ष पायदळी तुडवला गेलाय.
बालपणी समाजातील भिन्न भिन्न घरातून, वर्गातून आलेल्या मुलांशी मैत्री करून, जातीपातीच्या चुकीच्या कल्पनांना एक प्रकारे धुडकावून लावलं. मित्र म्ह्णून आपलं सुदामाप्रती, असलेल्या कर्तव्याचा विसर न पडू देता, त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. मैत्रीचा धर्म, प्रेमाचा धर्म, मानवतेचा धर्म, पांडवांच्याप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याचा धर्म या सर्वांचं स्वतः पालन करून कर्तव्यपुर्ततेची परिमाणं निर्माण करून जगापुढे ठेवली.
एक खूप महत्वाची गोष्ट जी, भारतीय संस्कृतीची महती सांगताना कायम विसरली जाते वा मुद्दाम विसर पडायला लावली जाते, ती म्हणजे शत्रूशी शत्रुत्वाचा व्यवहार करताना, आपल्या शत्रू धर्माचं योग्य पालन करणं. क्षमाशीलतेचा नंतरच्या युगात भारतखंडाला बसलेला मोठा फटका, हा खरतर श्रीकृष्णांना आपण न जाणल्याचा परिणाम आहे. या मुद्द्यावर खरतर कधीच आपण खोलात जाऊन विचार केला नाही. आज हा मुद्दा विस्ताराने पाहूया.
शत्रू शरण आला तरी त्याला क्षमा करताना, अनेक वेळा विचार केला पाहिजे. जर हा शत्रू सुधारण्यापलीकडे असेल आणि त्याचं उपद्रवमूल्य जर त्याच्या मृत्यूनेच संपणार असेल, तर समाज व धर्महितार्थ त्याला संपवणं इष्ट आहे आणि एक राजा वा क्षत्रिय म्हणून, त्याचं पालन केलंच पाहिजे. श्रीकृष्ण हे जाणून होते की, शकुनी, कर्ण दुर्योधन, इत्यादी कधीही न सुधारण्यासाठी जन्मले आहेत आणि त्यांच्या असण्याने समस्या वाढतील. तरीही त्यांना शांततेची पुरेशी संधी देऊन, उपचार म्हणून का होईना, शिष्टाई श्रीकृष्णांनी करून पाहिली.
अर्थात ही संधी, या पापी पुरुषांना नसून, मुळात ती धृतराष्ट्राला दिलेली शेवटची संधी होती. धृतराष्ट्र, ज्याची व्यक्तिगत महत्वाकांक्षा,ही देश समाज व मानवता यांच्या हितापेक्षा मोठी झाली होती. त्याला पोषक वातावरण दुर्योधनाच्या रुपात मिळालं आणि धृतराष्ट्राची महत्वा कांक्षा फलद्रुप झाली.जी कधीही शमणारी नव्हती. त्याचा शेवट दुर्योधन वा कौरव संपवूनच होणार, या निर्णयाप्रत आल्यामुळेच पांडवांच्या सहाय्यार्थ श्रीकृष्ण सारथी बनून आले आणि आपली इतिकर्तव्यता पार पाडली.
ज्यावेळी श्रीकृष्णांनी हे मर्म जाणलं, त्यावेळी त्या शत्रूला संपवण्याच्या मार्गातील सर्व अडथळे, भीष्म, द्रोण, कर्ण यांना येनकेनप्रकारेण संपवून मुख्य शत्रू दुर्योधन याला यमसदनी धाडला, कोणतीही दयामाया न दाखवता. कारण एकदा शत्रू ठरला आणि युद्ध आरंभ झालं कि, ते शत्रूला, विशेषतः दुर्जन मतीच्या शत्रूला संपवणं हेच योग्य. मतितार्थ हा की, शत्रू जेंव्हा कोणत्याही प्रकारे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसेल वा तुम्हाला धर्म रक्षणार्थ त्याला संपवणं गरजेचं असेल, तर ते करणं तुमचं इतिकर्तव्य आहे, त्याला क्षमा करणं ही कायरता ठरते आणि राजा म्हणून ते धर्माविरुद्ध होईल.
शरणागत रक्षण, हे तत्व सरसकट खचितच लागू होऊ शकत नाही. अजून एक गोष्ट जी या निमित्ताने श्रीकृष्णांनी सांगितली वा करून दाखवली, परंतु आपण त्यातून कधीही धडा घेतला नाही ती म्हणजे, शत्रूच्या कारस्थानांना त्याच भाषेत उत्तर देणं. त्याला जी भाषा कळते, त्याच भाषेत त्याच्याशी बोलणं, क्रमप्राप्त आहे. कपटाला कपट व कारस्थानांला कारस्थान, हा शत्रू संपवण्यासाठीचा धर्म आहे. कोणत्या शत्रूला क्षमा करून सोडून द्यावं आणि कोणत्या शत्रूला प्रसंगी निःशस्त्र असताना देखील, जीवे मारणं गरजेचं आहे, याची उदाहरणं श्रीकृष्णांनी महाभारतात घालून दिली.
या संदर्भात इतिहासातील काही घोडचुका ज्या नंतर भारतखंडाला महागात पडल्या त्या पडताळून पाहता येतील. पृथ्वीराज चौहान, ज्याने मोहम्मद घोरी अर्थात गझनीचा मोहम्मद, याला अनेक वेळा परास्त केलं आणि एका परकीय राजाला ज्याचा इतिहास ज्ञात होता क्रूरकर्मा म्हणून, त्याला कमीत कमी २० वेळा सोडून दिलं. जे महाभारतातील आणि श्रीकृष्णाच्या नीतीच्या नक्कीच चुकीचं होतं.
परंतु घोरीने मात्र पहिल्याच जिंकलेल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याला, देहदंड देऊन संपवून टाकलं. कारण तो पृथ्वीराज चौहान याला आपला शत्रूच मानत होता आणि त्याच्या रणनीतीनुसार तुमच्या हातून एकदा सुटलेला कट्टर शत्रू, पुन्हा परत नवीन शक्तीनिशी येणारच, हे युद्धाचं तत्वज्ञान घोरी जाणत होता. त्यामुळे अश्या शत्रूला संपवणं हे इतिकर्तव्य आहे. जर पृथ्वीराज चौहानने, ते त्यावेळीच पार पाडलं असतं , तर पुढील इतिहास पूर्ण बदलून गेला.
कदाचित हीच कथा रामदेवराय यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी याची. याच खिलजीला आधीच्या युद्धात पराभूत करून सोडून देण्यात आले. कित्येक युद्धात हीच परंपरा ठेवून, त्याला जीवित सोडून दिले. शेवटी फितुरीचा वापर करत खिलजीने यादव साम्राज्य धुळीस मिळवून,आपले बस्तान तिथे निर्माण केले. अश्या कितीतरी युद्धात,सशक्त हिंदू राज्यांनी बाहेरून आलेल्या साम्राज्यवादी राजांना, युद्धात हरवूनसुद्धा, जीवदान दिलं.
परंतु हे करताना, पुढे भविष्यात हाच आपल्या जीवावर उठून, आपलाच घास घेऊ शकतो, हि शक्यता लक्षातच घेतली नाही वा त्याचा पूर्णपणे बंदोबस्त देखील केला नाही. एक राजा म्हणून, त्यांचं हे नैतिक कर्तव्य होतं आणि त्यांच्याकडून तेच अपेक्षित होतं. खरतर याचा यौग्य धडा श्रीकृष्णांनी आपल्या संपूर्ण चरित्रात घालून दिला आहे.
कारण ज्याची मती कधीही बदलू शकत नाही, अश्या शत्रूला संपवणं हेच श्रेयस्कर आहे हाच धर्म आहे. कदाचित आपला अतिसहिष्णूपणा वा शरणागत रक्षणाचा आपण घेतलेला चुकीचा अर्थ हे देखील याचं कारण असू शकतं. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी शरणागत रक्षणाचं ब्रीद जपलं, याचं कारण म्हणजे उद्या तो शत्रू पुन्हा चालून आला वा आपला शब्द त्यांनी फिरवला,
तर दोघेही त्याचा निःपात करण्यास समर्थ होते. ते अवतारी पुरुष होते. त्यांना दैवी पाठबळ होते. परंतु सर्वसामान्य परिस्थितीत, प्रत्येक हिंदू राजाने या ब्रीदाचा मान ठेवताना, आपली शक्ती सर्वथा तशीच राहिल का आणि शत्रू सर्वथा आपल्या आदेशात राहील का, हे देखील पाहायला हवे होते. अश्या प्रकारचा धोका आपली ताकद ओळखून पत्करायचा असतो.
यात संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं उदाहरण आठवतं. त्यांनी सरनोबत प्रतापराव गुजर याना, बहलोल खानास जीवित सोडून दिले म्हणून, त्यास पुन्हा अटक करून या, अन्यथा पुन्हा तोंड दाखवू नका, असा खणखणीत आदेश दिला, जो त्यांची एक राजा आणि रयत रक्षक म्हणून खूप मोठी साक्ष देतो.
असो या संदर्भातल्या अजून काही बाबी पुढे पाहू........
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०८/०६/२०२०
भाग एकतीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ
Comments
Post a Comment