Skip to main content

अध्यात्म विराम १५१

अध्यात्म विराम १५१

कालची बोधकथा आपण वाचली. आता त्या अनुषंगाने चिंतन करूया. धर्म, शास्त्र आणि भगवंत स्वतः सांगतात की,नाम कोणत्याही प्रकारे घेतले तरीही,त्याचा परिणाम हा प्राप्त होतो. पण तो इष्ट परिणाम होतो. जरी पोपट पंची म्हणून नाम घेतले तरी, असा याचा अर्थ घ्यायचा का, यावर आता विचार करू. एक मुद्दा स्पष्ट आहे की, कर्म अवधान राखून केलं किंवा अनावधानाने केलं तरीही, ते आपलं फल देणार हा सिद्धांत आहे. पण त्या फळाचा परिणाम आपल्याला कधी प्राप्त होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे ते आपल्या कर्माच्या धर्मानुसार प्राप्त होईल. 

आता कर्माचा धर्म म्हणजे काय. तर त्यामागील भाव भावना किंवा intensions असा याचा अर्थ आहे. म्हणजेच ज्या भावनेने कर्म घडेल, ती भावना हा त्या नामाचा धर्म झाला. त्या धर्माला आपलं फल जोडलं गेेलं. अर्थात त्याची फलप्राप्ती त्या धर्मानुसार होणार. आता विचार करा की, ईश्वराने जे म्हटलंय की, कोणत्याही भावाने नाम घेतलं तरी त्याची प्राप्ती होते. हे भगवत वचन असल्यामुळे, फल प्राप्ती होणार.पण त्या कर्माच्या धर्मानुसार. म्हणजेच आपण चुकून अथवा अनावधानाने एखाद्या व्यक्तीला वाटेत जाताना साद घातली, तरी ती व्यक्ती आपल्या कडे बघणार हे नक्कीच. 

पण त्या व्यक्तीला नजरेतून जाणवलं की, चुकून साद घातली, तर ती व्यक्ती पाहून स्मित करून, पुढे निघून जाईल. अर्थात हा भुलोकीचा मानवी मनाचा गुणधर्म झाला. परंतु भगवंत मात्र आपल्याला पाहून, स्मित करून पुढे जाणार नाही. कारण त्याच्या कृपादृष्टीचा सुद्धा परिणाम हा अमूल्य असणार. फक्त प्राणीमात्राना त्यांच्या प्रारब्ध योगानुसार त्याचे परिणाम प्राप्त होतील. एक उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल . भगवंताचा प्रिय सखा सुदामा नित्य प्रभुआराधन करत असूनही, त्याचे भोग पूर्ण होई पर्यंत, श्रीकृष्ण भगवान काहीही करू शकले नाहीत.

त्यांनी सुदामा, आपल्याला भेटायला द्वारकेत आल्यानंतर त्याच्यावर कृपेचा वर्षाव केला. हे निर्विवाद. त्यावेळी त्यांनी, सुदामा या सख्याला सांगितलं, की माझी तुला सहाय्य करायची ईच्छा होती. परंतु तू त्या भावनेने मला साद घातली नाहीस. तू पूर्ण समर्पित भावाने मला बाहले नाहीस, माझी मनधरणी केली नाहीस.ज्याक्षणी तू माझ्या कडे आलास,त्या क्षणीच तुझ्या सर्व भोगांची इतिश्री झाली आणि मला माझ्या कृपेचा अथांग सागर, तुझ्या शिरावर, बरसता आला. म्हणजे जर नामात, स्मरणात भाव इच्छा व मनधरणी करण्याचे इष्ट भाव नसतील, तर भगवंताची इच्छा असूनही,भगवंत काहीही करू शकणार नाहीत.

दुसरा मुद्दा म्हणजे, सुदामा आपल्याकडे आला याचा भावार्थ असा घ्यायचा की, मनाने, आत्म्यासह माझ्याकडे समर्पित झाला. अर्थातच हाच भेद आहे, अवधान राखून केलेलं स्मरण आणि अनावधानाने घडलेलं स्मरण. अनाव धानाने घडलेल्या स्मरणाने, ईश्वर स्वतः इच्छा असूनही, योग्य ती कृपादृष्टी कटाक्ष टाकू शकत नाही. म्हणजे योग्य धर्माने केलेलं कर्म व त्या धर्माच्या पायाशिवाय केलेल्या कर्मातील भेद असा आहे. त्यामुळे अवधान न राखता केलेलं स्मरण हे सुदाम्याच्या पूर्ण भाव अर्पण न करून केलेल्या ईश्वराच्या स्मरणाप्रमाणे आहे. त्याच प्रमाणे अवधान राखून योग्य धर्माने, अर्पण भक्तीने केलेलं स्मरण हे ईश्वराच्या हृदयात पोचतं. 

हाच विषय उद्याच्या भागात पुढे सुरू ठेवूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...