हुकलेला शापत्विधी, देवाभाऊ आणि अजितदादा !!
नुकतंच काही दिवसांपूर्वी हुकलेल्या तीन दिवसीय सरकारबद्दल, फडणवीस थोडंसं किंवा अगदी किंचित बोलले. त्यात त्यांनी हा सत्याचा काही भाग आहे, असा उल्लेख केला. काही दिवस ही बातमी चवीने चर्वण करत, मराठी मीडियाने हा विषय चघळला. त्यावर पवार साहेबांनी त्रोटक विधान करून, आपल अंग झटकण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते अपेक्षित होतच. कारण त्यावेळी फडणवीस यांनी पवारांच्या संमतीने हे सर्व झालं असं मोठं विधान केलं आणि पवारांनी त्याचा इंकार केला नाही. पण एवढं विधान जरूर केलं की, आपण फडणवीस याना एक सभ्य व्यक्ती समजतो.
म्हणजे फडणवीस याना सूचक इशारा की, पुढचं बोलू नका, अर्थात आतापर्यंत दाखवलेला सभ्यपणा असाच पुढे दाखवा.
त्यामुळे जे काही घडलं, त्यामधे काकांचा रोल नक्कीच असणार आणि हा औट घटकेचा संसार मोडायला पवारांचीच खेळी कारणीभूत झाली. दादांकडे असलेले सर्व आमदार हळूहळू करत, परत माघारी गेले. दादांना सुद्धा नाईलाजाने जावं लागलं. म्हणजे एकतर त्यांचं फडणवीसांकडे येणं किंवा फडणवीसा कडून जाणं, दोन पैकी एक हे दादांच्या मनाविरुद्ध होतं,हे नक्कीच. तरीही माझ्या अंदाजाने या खेळाची सुरुवात साधारण ऑगस्ट 19 मधील, परभणी येथील एका सभेत किंवा त्या सुमारास झाली असावी.
मला स्पष्ट आठवतंय त्याप्रमाणे, दादांनी राष्ट्रवादीच्या या सभेत भगवा झेंडा सुद्धा पक्षाच्या नियमित झेंड्यासह असेल, अशी घोषणा केली. ती घोषणा नंतर काकांनी बासनात गुंडाळून टाकली. विषय नंतर कुठेही चर्चिला गेला नाही. कदाचित तो राग किंवा अपमान दादांच्या मनात कुठेतरी धुमसत असावा. किंवा पक्षावर नियंत्रण घेण्याचा दादांचा तो एक प्रयत्न असावा. त्यामुळेच त्यांनी गटनेते पदी निवड झाल्यावर, त्या पत्राचा वापर करून, राज्यपालांना गटनेता म्हणून आपला पाठिंबा भाजपाला दिला असावा.
मला आठवतंय त्याप्रमाणे फडणवीस यांना भेटण्याआधी दादा अचानक बैठकीतून गायब झाले, not techrable झाले आणि रात्रीत सर्व सोपस्कार पार पडून, सकाळी 8 च्या सुमारास ऐतिहासिक शपथविधी पार पडला. साधारण त्याच क्षणापासून अजित पवार यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. पण मला खात्रीने वाटतं की, हा गेम, अडीच वर्षानंतरच्या शिंदे नाट्याची रंगीत तालीम होती, असा माझा कयास आहे. किंवा त्या चुकलेल्या प्रयोगात पुढील यशस्वी प्रयोगाची बीजं दडलेली आहेत. कुठेतरी आतून फडणवीस व दादा यांच्या मैत्रीची तिथे रुजुवात झालेली असावी.
ही आतल्या आता असलेली फडणवीस दादा यांची मैत्री, कुठेतरी आता पुन्हा एकदा नव्याने, उघडपणे उभी राहताना दिसते आहे, असा माझा अंदाज आहे. परवा विधासभेत दादांनी एका इंग्रजी वर्तमापत्रात आलेली बातमी दाखवून, फडणवीस यांच्याकडे मागितलेला सविस्तर वृत्तान्त, सदनात पटलावर यावा, ही तो कोणाचीतरी इच्छा असावी, असा अंदाज बांधायला जागा आहे. दादांची त्यावेळची देहबोली ही, सहजता या सदरात मोडणारी नव्हती हे नक्की.
त्याचप्रमाणे फडणवीस बोलताना, अत्यंत विचारपूर्वक, प्रयत्नाने, मोजक्या शब्दांचा वापर करून, जाणीवपूर्वक अगदी मनात योजलेलं, तितकंच प्रत्यक्षात बाहेर पडेल, याची कटाक्षाने काळजी घेत होते, हे दिसत होतं. दुसरं म्हणजे, ही बातमी आणि त्यामागील कथा, हा कोणालातरी देण्यात आलेला इशारा असावा. मुदलात हा ट्रॅप आहे, हे फडणवीस यांच्यासारख्या जाणकार व चाणाक्ष नेत्याची पत्नी असलेल्या आणि आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष लक्ष ट्रोल होणाऱ्या, अमृताताई फडणवीस यांच्या लक्षात आलं नसेल, हे म्हणणं अती आहे, असं माझं मत आहे.
कारण अनुभवावरून सांगतो, आपल्या नवऱ्याच्या हुद्धा, अनुभव, उठबस याप्रमाणे, बायकांना जाण आणि जाणीव असते. ज्याला इंग्रजीत maturity म्हणतात, ती असतेच असते. किमान पांढरपेशा सुशिक्षित समाजात असतेच असते. त्यामुळे जरी फडणवीस म्हणाले, तरीही तो संबंधितांना गाफील ठेवण्याचा एक सरळसरळ प्लॅन होता, असा माझा अंदाज आहे. कारण या विधानसभेतील खुलाश्या नंतर लगेचच एक की दोन दिवसात, सदर जयसिंघांनी गुजरात मधे अटक झाला. याचाच अर्थ, फडणवीस यांना ट्रॅप करण्यासाठी लावलेल्या सापळ्याचा वापर करत फडणवीस यांनी अमृताताईना चित्रात ठेवून त्याचं व्यक्तीला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला असणार, हे नक्कीच.
ज्यावेळी ही गोष्ट विधानसभेत जाहीर केली, त्यावेळपर्यंत सदर इसम, पोलिसांच्या ट्रॅप मधे आलेला असणार, हे नक्की. म्हणजे हे सर्व सदनात पटावर यावं, यासाठी फडणवीस आणि दादा यांनी चतुराईने विषय सदनात मांडला. याचाच दुसरा अर्थ फडणवीस दादा यांची दोस्ती गहरी आहे आणि येत्या काळात तिचे अनेक रंग आणि परिणाम पाहायला मिळू शकतात, अगदी काकांना सुद्धा. मोदी शहा यांच्या आतापर्यंतच्या धक्का तंत्रा प्रमाणे, नवीन धक्काप्रयोग सुद्धा पाहायला मिळू शकतो.
Lets see !!
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
२२/०३/२०२३
Comments
Post a Comment