अध्यात्म विराम १४६
आपण ज्या लोकांचा आधी विचार केला, त्याहून वेगळ्या प्रकारचे लोक, या जगतात मोठ्या संख्येने असतात. यांच्या मनात श्रद्धा नसते असं नाही. पण ती दोलायमान असते. म्हणजे सुखात, त्यांना देव आठवत नाही. त्यावेळी त्याचं श्रेयं हे स्व कर्तृत्व आणि कर्म याना देतात. त्यांच्या मते त्यांचं, यश, सुख, उपभोग हे, त्यांना त्यांच्या कष्टामुळे प्राप्त झालेलं आहे. मेहनत आणि जिद्द या त्यांच्यातील गुणांमुळे या स्थितीला ते आलेले असतात.
पण आयुष्यात सर्व दिवस कधीही सारखे नसतात. त्यामुळे दुःख, भोग यांचा काळ आला की मात्र, याना अनेक गोष्टींना त्याचं श्रेय वाटून द्यावसं वाटतं. या गोष्टी असतात लोकांचा त्यांच्या यशविषयी मत्सर, त्यांच्यावर देवाची किंवा दैवाची अवकृपा अश्या अनेकानेक गोष्टी, त्यांच्या दुःखाला कारणीभूत असतात, असं याना, अश्या काळात सतत वाटत असतं. बरेचदा अशी माणसं माझं सुख देवालाच बघवलं नाही, असही म्हणायला मागे पुढे पहात नाहीत.
म्हणजे त्यांनी मेहनत करून, उत्तम कर्म करून जे प्राप्त केलेलं आहे, त्यावर दुःखाची भोगांची छाया, इतर अनेक बाह्य कारणांनी पडलेली आहे. म्हणजे कर्मात, कर्तव्यात किंवा आयुष्यात आपण कुठे चुकलो आहोत किंवा होतो, याबद्दल यांच्या मनाची, ज्ञानाची आणि जाणिवांची दृष्टी पूर्ण बंद असते. म्हणजे एकप्रकारे बौद्धिक, जाणिवांचं अंधत्व यांच्यापाशी असतं. अर्थातच त्यामुळे, याना आपलं चुकू शकतं किंवा आपल्या हातून, भूतकाळात काही चुकीचं, प्रमादात्मक घडलेलं असणार, याचा साधा विचार सुद्धा यांच्या मनाला स्पर्श करत नाही.
त्यामुळे ही लोकं आपलं पूर्व कर्म सुधारून, आपली स्थिती सुधारावी, या निष्कर्षाला कधी येतच नाहीत. कारण हे दुःख, यांच्या वर इतर कोणाच्या वाईट नजरे मुळे विचाराने आणि काहीतरी कृतीने आलेलं आहे. त्यामुळे हे प्रसंगी अश्रद्ध असूनही, कधीकधी त्याबाबतचे नको ते उपाय वा कर्मकांड करतात किंवा त्यामागे जातात.
म्हणजे बाह्य दृष्टीची छाया किंवा प्रभाव कमी व्हावा, यासाठी काही प्रयत्न करतात. पण आपण कर्मात कशी सुधारणा करून बघावी किंवा आपल्या मनाच्या धारणेत किंवा श्रद्धेत काही बदल किंवा सकारात्मक गोष्टी करून बघाव्या, याबद्दल, हे नेहमी अनभिज्ञ असतात.
आता सर्वच यात असतात असही नाही. म्हणजे काही जण हे मान्य करतात की, आपलं मागील कर्म या दुःखाला व भोगांना कारणीभूत असू शकेल, याची याना जाणीव असते. पण हे दुःख, हे भोग आताच का आलेत, या विचाराने हे कायम विचलित असतात. त्यामुळे याना दुःख भोग हे माझ्या कर्माचे निदान आहे हे मान्य असलं तरी, कायम असं वाटतं की, देवाने हे मुद्दाम आताच माझ्या नशिबी का लिहिलं.
सर्व सुरळीत असताना, देवाने हे माझ्या कर्माचे भोग आता का पाठवले, अशी एक बोचणी यांच्या मनाला होत असते. यातून आपल्या मनाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा, हे याना सुधरत नाही. कारण मुदलात, हेच याना ज्ञात नसतं किंवा असलं तरी पटत नसतं की, भोगांची आणि सुखांची मांडणी ईश्वर करत नाही, तर ती आपल्याच कर्माची परिणती असते.
आता या दोन्ही प्रकारच्या लोकांना यातून बाहेर पडण्या साठी आणि एकूणच या चारही प्रकारच्या लोकांना योग्य मार्गाला जाण्यासाठी काय उपाय आहे, हे आपण प्रत्येक प्रकारानुसार उद्याच्या भागात पाहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment