Skip to main content

अध्यात्म विराम १२३

अध्यात्म विराम १२३
 
जाणिवांच्या जगताचा विचार करताना आता दुसऱ्या बाजूचा विचार करूया. जाणिवांना जे जाणवतं, ते फक्त देह, इंद्रिय, बुद्धी व मन याना आणि त्याने कार्यान्वित होतात ते सुद्धा देह, इंद्रिय, बुद्धी व मन यांनाच. म्हणजेच ही जाणिवांची साद, भौतिक जगातील, भौतिक गोष्टी पर्यंत मर्यादित राहते. पण त्याने खरं हित आणि खरा उद्देश साध्य होईल का आणि कसा काय साध्य होईल, यावर चिंतन करूया.. याच ठिकाणी अनेक ऋषीमुनी, संत महंत यांनी आपल्या जीवनातील वास्तव्याने जे दाखवून दिलेलं आहे, त्याचा विचार करावा लागेल. 

या जाणीवा जगताच्या ज्ञान संपादन व त्यांचं अवलंबन यासाठी आहेत का, हा एकदा विचार करावा लागेल. मुख्य कार्य आहे की, देहात आल्यावर, देहाच्या सहाय्याने मनाने आत्मतत्वाला जागृत करून, स्वहित साधणं. यातील स्व म्हणजे देह नसून, आत्मा, हे या ठिकाणी ध्यानात ठेवाव लागेल. मुळात, सर्व ज्ञान, शास्त्र, वेद, पुराणं हे सर्व, देहाच्या सहाय्याने आत्म्याचा विकास, शुद्धता व अंतिम ध्येय साधण्यासाठी आहे. 

म्हणजे नश्वर जगतातील सर्व काही किंवा काहीही साध्य करण्यासाठी यातील ज्ञान, उपयोगी आलं तरी गरजेचं नाही. पण देहात आल्यावर, आत्म्याला मन, बुद्धी, ज्ञान इंद्रिय, कर्मेंद्रिय यासह संपूर्ण देहाच्या आवरणाने वेष्टित आहे. त्यामुळे सकृत् दर्शनी आपण देहाला आणि देहामुळे प्राप्त ओळखीला सर्वस्व मानतो. त्यालाच महत्व देतो. हे कितपत योग्य आहे यावर जरा विचार करूया.

आता एक कल्पना करुया की, तूप मिळवण्यासाठी, आपण दूध घेतलं. म्हणजे त्या दुधाला तापवून, त्यातून आलेल्या साईला विरजणं जरुरी आहे. म्हणजेच दुधाच्या तापवण्याच्या प्रक्रियेत, आपण दुधाला त्रास होईल याचा विचार करत नाही. त्यानंतर साय विरजली की, किण्वन प्रक्रियेने बॅक्टरिया अर्थात विशिष्ट प्रकारचे विषाणू, त्यावर प्रक्रिया करून, त्याला पद्धतशीर पणे दह्यात रुपांतरीत करतात. ही प्रक्रिया होताना, आतील सायरुप पदार्थाला त्रास होत असणार. पण आपण त्याचा विचार करत नाही. 

त्यातून तयार झालेल्या सायीच्या दह्याला आपण घुसळतो. त्या घुसळण्याच्या प्रक्रियेत, आपण आतील पदार्थावर होणाऱ्या घर्षण रूप प्रक्रियेच्या त्रासाचा विचार करत नाही. तद्नंतर तयार झालेल्या ताकातील, शुभ्र लोण्याला बाजूला काढून, त्याला मंद आचेवर तापवून, त्यात लपलेले शुद्ध साजूक तुपाला आपण, तितक्याच एका स्वच्छ भांड्यात, सटात काढून, ते योग्य गोष्टींसाठी वापरतो. 

आता या शुद्ध सात्विक साजूक तुपाचं नाव आहे आत्मा. जो या सर्व आवश्यक प्रक्रियेने, पूर्ण मूळ, शुद्ध व सात्विक स्वरूपात प्राप्त झाला. ईश्वराने प्रदान केलेला देह म्हणजे ते दूध आहे. ज्यामधे सर्वात आत हृदयस्थ आत्मा प्रस्थापित आहे. हाच चैतन्य रुपात सर्व देह, इंद्रिय, धमन्या, नसा, रुधिर, पेशी यांसह मज्जा व चेता संस्था, बुद्धी आणि मन याना ऊर्जा, शक्ती प्रदान करतो. म्हणजे तोच या सर्वांसाठी. बॅटरी स्वरूप आहे. आता अजून खोलात जाऊ. 

या बॅटरी ला ऊर्जा कुठून प्राप्त होते, यावर नंतर विचार करूया. त्याआधी थोडे मागे जाऊया. जगताच्या या जंजाळात मी कर्मरुपात अग्नी प्रज्वलित केला. तो अग्नी भोग व उपभोग रुपात देहाला जाळतो, अर्थात तापवतो. म्हणजेच भोग व उपभोग हे एकप्रकारे शेगडी आहेत आणि त्याने प्राप्त धग, त्यातील अग्नी आहेत. त्यातून त्याची धग, पूर्ण देह, इंद्रिय, बुद्धी, मन याना जाणवते, पोचते. ही तापवणे, किण्वन करणे, घुसळणे व पुन्हा तापवणें अश्या या प्रक्रिया आहेत. जे भोग आणि उपभोग रुपात, देहाच्या माध्यमाने, आत्मा तत्वाला जागृत करण्यासाथीच्या अत्यंत गरजेच्याच प्रक्रिया स्वरूप आहेत. 

पण यात मुख्य समस्या आहे ती म्हणजे दुधाला म्हणजेच देहाला, आतीला लोण्याची काहीही माहिती नसते किंवा दुधात ते इतकं सामावून गेलेलं आहे किंवा आपल्या देहाच्या जाणीवा इतक्या पक्क्या आहेत की असतील, ज्यामुळे, लोण्याचा गंध सद्धा नुसतं दूध पाहून सामान्य असलेल्या आपल्या बुद्धीला जाणवत नाही. पण चाणाक्ष आणि अनुभवी सद्गुरूरूप सद्गृहिणी हे जाणते की, दुधाला, अग्नी, किण्वन, घुसळण व पुन्हा अग्नी इत्यादी अनेक प्रक्रियेतून न्यावच लागेल. तरच आतील शुद्ध सात्विक परब्रम्ह स्वरूप आत्मतत्वाचे लोणी, विधात्याला पोचवता येईल. 

आता या विचाराने भारलेले आपण, उद्या पुढील चिंतन करण्यासाठी, या लेखाचा साकल्याने विचार करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...