अध्यात्म विराम १३३
मुळात विचारांना महत्व का द्यायचं,तर तेच सर्व काही साध्य करून घेतात आणि देतात. कारण विचार शून्य कृती ही घातक आहेच पण अविचाराने केलेली कृती हीसुद्धा तितकीच आत्मघातकी असते. म्हणजे विचारांचा अभाव आणि योग्य विचारांचा अभाव अश्या दोन्ही कारणांनी माणूस चुकीची कर्म करून, भोग, दुःख, पश्चात्ताप ओढवून घेतो. पण नंतर मात्र दोष देव व दैव याना देतो. एकजरी खरं असलं की, आपण प्रत्येक कर्माची संगती फलाशी लावू शकत नाही, तरीही तशी तर्क संगती लावून आपण ताडून पाहू शकतो.
पण आपल्या सर्व कर्मांची फलनिष्पत्ती याचं जन्मात होईल असं नाही. कारण आपण फक्त या देहाचा आणि याच जन्माचा विचार करू शकत असलो तरीही, आत्मा हा अविनाशी आहे आणि तो नित्य एका देहातून दुसऱ्या देहात, इच्छापूर्ती साठी फिरत असतो. इच्छा या वासने तून जन्म घेतात आणि वासना मायेतून. आता वासना या चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या असतात त्याच प्रमाणे माया सुद्धा चांगली व वाईट दोन्ही प्रकारची असते.
जसं लग्न करणं आणि आपला प्रपंच पुढे नेऊन, प्रजोत्पादन करणं, हा एक नैसर्गिक नियम व अधिकार आहे. त्या अधिकारापोटी अनेक गोष्टी माणूस करतो. म्हणजे इथे जन्माला असलेली किंवा उत्पन्न झालेली माया ही चांगली आहे आणि त्यातून इतर अनेक वासना जन्म घेतात. त्या वासनांमधून अनेक विध इच्छा जन्म घेतात. त्याच इच्छांच्या पूर्ततेसाठी माणूस प्रपंच नामक चक्र तयार करवून घेतो आणि त्यात आपल्या पूर्ण आयुष्याला अर्पण करतो. ज्यावेळी यातील अनेक पूर्ण होतात त्यावेळी आनंदी होतो आणि ज्यावेळी यातील काही अपूर्ण राहतात किंवा आपल्या इच्छे प्रमाणे फल देत नाहीत, तेंव्हा तोच मनुष्य दुःखी होतो, निराश होतो.
पण ज्या गोष्टीच्या मागे तो आधी धावला, कष्ट घेतले, त्याचा पाया हाच मुळी अशाश्वत आणि बेभरवशाचा आहे, त्याच्यावर पूर्ण विसंबून राहून, जे मिळेल ते आपल्या इच्छा, वासना, माया आणि कर्म यांच्या परिणामातून आलेलं आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे कर्माचा पायाच जिथे एका तकलादू आधारावर आहे, त्यातून मिळेल ते केलेल्या कर्माचं प्राप्त फल आहे, हा सरळसरळ एकसमायिक समिकरणाचा इष्ट परिणाम आहे किंवा असतो, हे ध्यानात धरावें लागेल. म्हणजे लॉटरीचं तिकीट काढताना, ते बक्षीस मिळेल किंवा न मिळेल हे माहीत असूनही, आशेच्या धाग्याने बांधलेलं मन, बक्षीस न मिळताच, खट्टू किंवा नाराज होतं.
हे चूक आहे हे जाणवून सुद्धा आपण मनाला समजावू शकत नाही, याचं कारण आपण आपल्या मनाशी संवाद साधायला कमी पडतो, किंवा आपल्या मनाला सत्य स्वीकारायची व त्यातून बोध घ्यायची इच्छा नाही आणि अपेक्षा नाही, हे नक्कीच.
अनेक प्रकारे आपण आपल्या मनाला समजावून सांगू शकतो की, मुळात एखादं कर्म केल्यावर, मला त्याचं फल चाखता येईल किंवा भोगावं लागेल.कारण याचा परिणाम काय आहे, हे मीच काय कोणीही सांगू शकणार नाही. पण काही निश्चित आडाखे, नीतीचे नियम, शास्त्र, वेद इत्यादी माध्यमातून आपल्याला माहीत झालेले आहेत. ते म्हणजे उत्तम वागणूक असेल तर चांगलं कर्म हातून घडेल व वागणूक वाईट किंवा स्वार्थी स्वरूपाची असेल तर, आपल्या हातून, वाईट कर्म घडेल.
ही वागणूक माणसाच्या वृत्ती वर आणि वृत्ती मनाच्या आकलना वर अवलंबून आहे. सरते शेवटी आकलन हे आत्म्याच्या संस्कार, ज्ञान इत्यादी वर अवलंबून आहे. यावर उद्याच्या भागात, सविस्तर चर्चा करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment