अध्यात्म विराम १२५
भोगाच्या वाटेवरून आपण साधनेच्या मार्गावर येण्या साठी आपली पूर्वापुण्याई कमी येते. मुळातच सद्गुरू कृपा होण्यासाठी आपली तशी पात्रता असावी लागते. अध्यात्मिक मार्गात ही पात्रता, जन्म, जातपात, पैसा, श्रीमंती, गरिबी अश्या कोणत्याही निकषावर ठरत नसते. त्याचे निकष परम ईश्वराने घालून दिलेले आहेत आणि युगानुयुगे ते काळ, विधाता, निसर्ग, या सर्वांसहित असलेली ब्रम्हांड व्यवस्था त्यांचं चोख पालन करते. यात कुठेही कसलीही कसूर , चूक, प्रमाद होत नाही आणि होणार सुद्धा नाही.
कारण ही सर्व व्यवस्था चालवणारे, त्यांना दिलेल्या निकष आणि नियम यांनी बद्ध आहेत. त्यांचं ते काटेकोर पणे पालन करतात. नव्हे त्यासाठी ते बाध्य आहेत. त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही भ्रष्टता नाही आणि ती येणारसुद्धा नाही. याच कारण म्हणजे एकतर ती व्यवस्था भौतिक जगताच्या पार आहे. त्यामुळे मायेचे, मोहाचे पाश त्यांना लागू होत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांच्या मतीमध्ये मानवी गुणधर्म नाहीत.
माणसाच्या बुद्धीला बंधनाचा, कर्माचा, मर्यादांचा आणि मोहाचा शाप आहे. तसा तो त्यांना लागू होत नाही. कारण मुळात ते सर्व चैतन्य रुपात आहेत आणि त्यांना मानवी देहात असलेली बंधनं लागू होत नाहीत.याच कारणाने,हे सर्व घटक, नियमशील व नीतिमान राहून, फक्त त्यांना देण्यात आलेली जबाबदारी, युगानुयुगे पार पाडून,ईश्वरी व्यवस्था चोख हाताळतात. जे व्यवस्थापनाचं सर्वात मोठं तत्व आहे.
म्हणून मानवी कर्म व त्यांचे योग्य ते परिणाम फल रुपात, त्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवून, आपल कार्य पार पाडतात. आपल्यापाशी ते परिणाम भोग आणि उपभोग स्वरूपात येतात. ज्याचा आपण स्वेच्छेने वा अनिच्छेने स्वीकार करतो. जिथे तो स्वेच्छेने होतो, तिथे त्या कर्म फलातून नवीन कर्माच बीज उत्पन्न होत नाही आणि ते कर्म शांत होतं. पण जिथे ते अनिच्छेने स्वीकृत केलं जातं किंवा नाकारून भोगलं जातं, तिथे मात्र आपण पुन्हा नव्या कर्माना जन्म देऊन, साखळी पुढे नेऊन, फेऱ्यात अडकतो.
ही स्वेच्छा व अनिछ जाणिवांच्या प्रमाणात आणि गुणधर्मावर अवलंबित असते. जिथे जाणीवा प्रगल्भ असतात किंवा होत जातात तिथे स्वेच्छा प्रमाण वाढत जातं आणि अनिछा प्रमाण कमी होत. म्हणजेच पुन्हा सर्व काही जाणिवांच्या दाराशी येऊन थांबलं. जाणीवा आपल्याला प्राप्त स्थिती स्वीकारून, त्यातून भोगाच्यां वाटेने पुढे जाण्याची प्रेरणा देतात.ही जाणिवांच्या प्रेरणेचे उगमस्थान स्वकर्मफल, स्वपुण्याई व त्यामुळे प्राप्त सद्गुरू कृपा यावर अवलंबून असते.
अशी स्थिती येण्यासाठी काय काय आवश्यक गुणधर्म प्रानिमात्राकडे असावेत यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. पण तोपर्यंत सद्गुरू सेवा करत नाम घेत राहूया
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment