Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग ३८

श्रीकृष्णनीती भाग ३८
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्णाच्या काळापासून,अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक अशी सर्वच स्तरावर सुबत्ता अनुभवून उपभोगणारा जगातला एकमेव देश म्हणजे भारतवर्ष. इतर देश वा संस्कृती या चाचपडत देखील नव्हत्या, त्यावेळी येथे सर्व बाबतीत संपन्नता नांदत होती. खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात सोन्याचा धूर निघत होता. कदाचित याचं आकर्षण वाटून, यांच्या लोभापायी हे वैभव लूटण्याकरता येथे अश्या मुलखातून टोळ्या आल्या, ज्यांनी या वैभवाचा एक शतांश देखील, कधी अनुभवाला नव्हता. 

प्रथम येऊन गेलेले या बद्दल या देशाबाहेर जितकं जास्त सांगत गेले असतील, त्या वर्णनानुसार येथील अमाप संपत्तीचा, वैभवाचा उपभोग घेऊन, यातील जास्तीत जास्त लुटून नेण्याकरिता, अजून अजून टोळ्या येत गेल्या. सुरवातीला कदाचित इथली संपन्नता इतकी होती कि, लुटून नेलेलं ऐश्वर्य हे गुंजभर भासत असल्यामुळे, येथील राजे आणि प्रजा दुर्लक्ष करत गेले. त्याचा परिणाम म्हणून अजून लूट नेण्यासाठी, टोळ्या येत गेल्या. 

अगणित संपत्ती असल्यामुळे असलेली बेफिकिरी, हि घातक ठरते. तसंच झालं. कदाचित आज अमेरिकेत जे घडलं, तसंच वा त्याचप्रमाणे आपल्या इथे घडलं असण्याची शक्यता आहे. चीनने सुरवात केली तेंव्हा अमेरिका आपल्याच वैभवाच्या धुंदीत असल्यामुळे चीन पसरत असलेले हात पाय कोणालाच दिसले नाही आणि हात पाय व्यवस्थित पसरून झाल्यावर, चीनने पूर्ण बिछाना काबीज करण्यासाठी मोठा डाव टाकला. 

इथेही तेच होत गेलं असेल. ज्या लोकांचं नुकसान सुरवातीच्या हल्ल्यात झालं, ते नुकसान त्यावेळचे राजे राजवाडे आर्थिक सुबत्तेमुळे, लोकांना भरपाई करून देत असतील. त्यामुळे सुरवातीला कोणालाच या हल्ल्यांचा परिणाम जाणवला नसावा. हळू हळू इथली संपत्ती संपत गेली वा कमी कमी होत गेली, तस तशी येथील एक एक राज्ये परकीय हाताना अलगद सापडत गेली असतील. 

त्यानंतर त्यांच्याच मदतीने हळू हळू येथील मध्यम राज्ये हस्तगत करून मग मोठ्या राज्यांना काबीज करणं परकीय आक्रमकांना शक्य होत गेलं असावं. परंतु यात सर्वात महत्वाचं काम कोणी केलं असेल तर इथल्या फितूर लोकांनी. ज्यांनी या परकीय आक्रमकांना प्रलोभनं, मोह, लोभ, मत्सर, असूया, महत्वाकांक्षा, अहंकार या अनेक कारणांसाठी सढळ हस्ते मदत केली. 

एक गोष्ट जी कोणत्याही फितूर राजाने लक्षात घेतली नाही कि, फितुरांची किंमत फक्त सत्ता हस्तगत होई पर्यंतच. आजवरच्या इतिहासात कोणत्याही परकीय राजाने योजना सफल झाल्यानंतर, फितुराला संपवलं नाही, असं उदाहरण मिळणार नाही. एक मोठं उदाहरण म्हणजे जयचंदाचं. पृथ्वीराज चौहानला पराभूत केल्या नंतर हाल हाल करून मारण्यात आल्यानंतर, दोन वर्षातच, जयचंद याला हरवून, त्याचं राज्य काबीज करून त्याचाही अंत पृथ्वीराज पेक्षाही दुर्दैवी करण्यात आला. 

याच सत्ता वा गादी यांच्या मोहामुळे असेल, स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत येथील सत्तेचे लोभी असलेले राजे महाराजे, जे ब्रिटिशांशी तह करून, आपलं राज्य आपल्या ताब्यात ठेवून, वाचवण्यात यशस्वी झाले असले तरी, त्यांना त्यासाठी ब्रिटिशांची कायमची हुजरेगिरी करावी लागत होती. ते करत असताना व ब्रिटिश हुकुमाची अमल बजावणी करताना, बिनदिक्कत आपल्याच प्रजेवर अत्याचार देखील करण्यात आले असतील. 

फार थोडे राजे होते, ज्यांनी अशाप्रकारचं लांगुलचालन केलं नाही. ज्यांनी हे केलं नाही ते झाशीची राणी, नानासाहेब पेशवे (दुसरे) इत्यादी काळाच्या ओघात नामशेष झाले. म्हणजेच ज्या राजांची राज्य टिकली अश्या जवळपास ५५२ संस्थानिकांनी मोठ्या प्रमाणात या देशाशी गद्दारी बिनदिक्कतपणे केली आणि आपलं राज्य टिकवून, ब्रिटिशांकडून तनख्वा प्राप्ती करून घेतली.  

ब्रिटीशानी नौसेनेच्या बंडाला घाबरून येथून पाय काढण्याचा निर्णय घेतला, हे खरं सत्य आहे. कारण सैन्यबळ हेच त्यांचं येथील अमर्याद सत्ता भोगण्याचं महत्वाचं हत्यार होतं. जे साधारण १९४२च्या नौसेनेच्या बंडानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की, आता येथील सत्ता उपभोगताना, जर सैन्यबळ आपल्या ताब्यात राहीलं नाही तर, जी सत्ता आज आपण आत्मसम्मानाने सोडू शकतो, ती नंतर पळून जाऊन सोडावी लागेल. 

जे ब्रिटिश साम्राज्यासाठी ती लाजिरवाणी गोष्ट ठरेल. ते टाळण्यासाठी १९४२ ते १९४५ या कालावधीत,त्यांनी सर्वबाजूने विचार करून, साधारण १९४५च्या दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, तत्वतः मान्य केलं असावं. असं ब्रिटिश संसदीय कागदपत्र, संसदेतील भाषणं यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. 

तरीही जाताना त्यांनी कावेबाजपणा करून, सत्तेचा लोण्याचा गोळा सोपवताना, सत्तापिपासू बोकेच सत्तेत राहतील, याची पूर्णपणे खबरदारी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यावेळच्या एकमेव पक्षातील मतभेदांचादेखील प्रसंगी वापर करून घेत, आपल्याला हव्या असलेल्या नेत्याला, त्याचे कच्चे दुवे हेरून, त्या कच्या दुव्याचा पूर्ण वापर करत, अनेक प्रश्न निर्माण करत, अनेक प्रश्न जटिल व गुंतागुंतीचे करत, भविष्यातील अनेक प्रश्नांची बीज रोवून, वांझोट्या समाजवादाचं बाळकडू पाजून, येथील प्रश्न कधीच सुटणार नाहीत, याची काळजी घेत 

आणि येथील सत्तेची भूक असलेले नेतेच, कायम सत्तेत राहतील याचा बीजमंत्र त्यांच्या कानात टाकून, दुहीची बीज पेरून, मगच पोबारा केला. कारण त्यांच्या सत्ता काळात त्यांनी, येथील जयचंदांचा पूर्ण अभ्यास केला होता. त्यांचा पूर्ण वापर त्यांनी सत्ता सोडताना केला. तेच जयचंद आजदेखील त्रास देत आहेत.

एक खूप मोठा कुटील डाव जो त्यांनी टाकला होता. या देशाचं अधिकृतपणे विभाजन केलं, आधार धर्माचा घेतला गेला. बर पडद्यासमोर ब्रिटिश कुठेही चित्रात नव्हते, भांडण तुमचं आहे, आम्ही तुम्हाला फक्त सत्ता सोपवण्यासाठी आधार देत आहोत. पण तत्वतः ती सत्ता कशी द्यायची ते तुम्हीच ठरवा. तुमचं ठरलं कि, आम्ही सत्ता द्यायला मोकळे. यात शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड मौटबॅटन यांनी जिनांना नेहरूंच्या मागे, शेख अब्दुलाला, काश्मीरचा राजा आणि नेहरू यांच्या मागे लावून दिल. 

एकमेव तल्लख आणि निःपक्षपाती नेते सरदार पटेल यांचं नाणं, फार चालणार नाही, याची देखील तजवीज नेहरूंच्या मार्फत, त्यांनी करून ठेवली. कारण उपलब्ध कागदपत्रांवरून स्वातंत्र्याची वा त्यासंबंधीची बरीचशी बोलणी हि सरदार पटेल यांच्याशीच झाल्याचं दिसतं . विशेषतः काश्मीर प्रश्नाबाबत बोलणी सुरवातीला सरदार पटेल यांनीच केली होती. 

नेहरू नंतर चित्रात आले आणि सरदार पटेल यांच्या हाती देशातील ५५२ संस्थानं विलीन करण्याचं महत्वाचं काम देण्यात आलं. (काश्मीर प्रश्नावर याआधीच गेल्या ५ ऑगस्ट, २०१९ नंतर ६ ते ७ भागांची खास काश्मीर वरील लेखमाला मी लिहिली होती, त्यामुळे काश्मीरवर आता जास्त विस्ताराने लिहीत नाही). ब्रिटिशांनी हे करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, ब्रिटिश जाणत होते, जर सत्तेचे सर्व अधिकार सरदार पटेल यांच्याकडे गेले, तर अनेक प्रश्न त्वरित वा कमी कालावधीत तडीस लागतील.... 

आणि आपला, जन्मतःच बालक कमजोर व अशक्त करून जाण्याचा उद्देश, साध्य होणार नाही. म्हणून सत्तेची निर्मिती दुफळीतून निर्माण होईल, याची काळजी घेतली आणि नेहरूंमुळे वास्तविक तिचं रूपांतर त्रिफळीत झालं. सत्तेच्या महत्वाकांक्षेची बीज नेहरूंच्या डोक्यात भिनली आणि गांधीजींच्या मार्फत ते साध्य होईल, हे त्यांनी पाहिलं. इथेच अनेक प्रश्नांची निर्मिती झाली. अर्थात ती भिनली कि आधीपासून होती हा एक मोठा प्रश्न अभ्यासावा लागेल.  

पुढील भागात यावर प्रकाश टाकू. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
२६/०६/२०२०
भाग अडतीसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...