अध्यात्म विराम १४७
काल म्हटलेल्या प्रकारातील लोकांमधे, जी मानसिक स्थिती असते, ती मोठी विचित्र असते.म्हणजे रोग आहे हे माहीत असतं. पण त्याचं कारण मी नाही तर अन्य आहे, अशी ज्यांची धारणा असते, त्यांना मुळात ही धारणा अर्थात विचारांचं मूळ बदलणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही कृतीचा, कर्माचा पाया हा मानसिक धारणा किंवा विचार यावर अवलंबून असतो. एकदा पायाच चुकीचा असेल तर, पुढील सर्वच चुकत जाणार, हे सांगायला खरतर ज्योतिषाची गरज नाही. पण तरीही काहीजण आपल्या विचारतील विषमता लक्षात न इतर अन्य काही मार्गाने, काही सुधारणा होईल, का याचा जास्त विचार आणि पाठपुरावा करतात.
वास्तविक आपण मनाने स्वीकारलं की, भोग आणि उपभोग वा सुख आणि दुःख हे दोन्ही, एकतर जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि हे दोन्ही कर्मधिष्टित आहेत. म्हणजे दुःख आलं की, उद्वेग, निराशा या भावने पोटी आपण अनेक चुकीची विधान, विचार करून, आपल्या कर्माचा आलेख अजून चुकीचा करण्यास आपणच हातभार लावतो. नंतर पुन्हा हेदेखील म्हणतो की, माझं सुख कोणाला बघवत नाही.
म्हणजे आपणच आपल्या मार्गात विघ्नाची बाधा तयार करतो आणि नंतर विघ्न,दुःख आली की आपण त्यासाठी उपाय शोधून काढण्यासाठी, बुद्धी आणि वेळ खर्ची घालवतो. मुळातच आपली विचारांची दिशा आणि मार्ग बदलून, आपल्याला पुढील कष्ट काळजी यातून बाहेर पडता येईल. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मनात हे दृढपणे धारण केलं पाहिजे की, सुख आणि दुःख दोन्ही कर्मातूनच प्राप्त होतं आणि मला माझ्या कर्माचा आलेख सुधारण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी कर्म करताना ध्यानात ठेवलं पाहिजे की, ज्या प्रमाणे विचार, त्यानुसार कर्म आणि जसं कर्म, त्याप्रमाणे फलप्राप्ती होणार.
दुसरा विचार म्हणजे विचारांमध्ये ठामपणा आणि सकारात्मकता असावी, ज्यामुळे मन बुद्धी व देह, एकाच पद्धतीने कार्य करून, त्यात सुसूत्रता राहील. या सुसुत्रतेचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. पण विशेषतः, द्दुःख किंवा भोग या काळात याचा विशेष लाभ होतो. कारण याच काळात माणसाची खरी परीक्षा असते. या नकारात्मक काळात, मनाचा समतोल, गती आणि स्थिरता हे या सुसूत्रतेवर अवलंबून असतं. एकदा ही सुसूत्रता साधली की, योग्य विचार आणि त्यानुसार योग्य कृती घडते.
दोलायमान विचाराने, अयोग्य कृती किंवा अयोग्य कर्म घडू शकतं. स्थिर विचाराने कितीही आपत्ती आली तरी, मनाचा तोल ढळणार नाही. यासाठी नामासारखं एखादं साधन नित्य करत असणं आवश्यक आहे. थोड्या प्रमाणात असेल तरी हरकत नाही. पण ते करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे, ज्या ज्यावेळी विचारात व कर्मात घसरण होण्याची शक्यता निर्माण होईल, त्यावेळी त्यातून सावरणं मनाला शक्य होईल, जर विचार, स्थिर असतील.
मन देह बुद्धी यांचा कायम ताळमेळ राखण्यास, असं एखादं साधन उपयोगी असतं. बाह्य जगतातील अन्य कोणतीही साधनं, आपल्या आपल्या चांगल्या वाईट परिणामांना सोबत घेऊन येतात.पण नाम हे असं साधन आहे, हे कोणतेही विपरीत परिणाम सोबत घेऊन येत नाही. नामाने सकारात्मकता वाढीला लागते, चित्तात स्थिरता येते, विचारांना योग्य गती येते, योग्य अयोग्य यांचं ज्ञान प्राप्त होतं, मनाला शांतता लाभते.
विचारांची पत, स्तर आणि गुणांक वाढतो. हा गुणांक प्रापंचिक आणि अध्यात्मिक दोन्ही मार्गात प्रगतिकारक ठरतो. देह, बुद्धी, मन व आत्मा या चारही पातळीवर या साधनेचे लाभच आहेत, हानी काहीही नाही. याबद्दल अजून विस्ताराने पुढील भागात जाणून घेऊ.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment