अध्यात्म विराम १४२
सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
काल म्हटल्याप्रमाणे ज्या कार्यात ईश्वरी स्मरण असतं, ते कार्य अंती उत्तम फलदायी होतं. त्याचप्रमाणे जे कार्य करताना ईश्वराच्या स्मरणाचां विसर होतो, ते कार्य अंती, दुःख, भोग आणि कष्ट आपल्या वाट्याला येतात. आज यावर विचार करूया. कारण हे फक्त एक विधान नाही, तर ते एक सत्यवचन आहे. तेदेखील प्रत्यक्ष ईश्वराचं वचन आहे. आता विषयाकडे वळूया. जे कर्म ईश्वराच्या स्मरणात केलं जातं ते अंती उत्तम फल देत. हे सर्वश्रुत आहे.
यावर लगेच एक विचार मनात येतोच की, कोणतंही कर्म जे ईश्वर चिंतनात वा स्मरणात केलं जातं, ते सर्व या सदरात येत. मग यात चांगलं वाईट असं सर्व कर्म येत का. तर हो, येतं. काही गोष्टी खुलासेवार चिंतनातून जाणून घेऊ. चांगलं कर्म केलं तर नक्कीच त्याचं फल चांगल मिळेल कर्मफल न्यायाने. पण ईश्वराच्या स्मरणात त्याचं फलित योग्य स्वरूपात आणि विशेष म्हणजे योग्य तऱ्हेने आणि योग्य वेळी आपल्याला प्राप्त होतं. हा या स्मरणाचा मुख्य लाभ आहे.
मुळात एक लक्षात घ्या की, ईश्वर स्मरण हा व्यवहार नाही. त्यामुळे हे केलं म्हणून मला पुढे चांगलं मिळेल, हा व्यवहार साध्य करण्यासाठी स्मरण करायचं नाही, हे नक्कीच. पण ईश्वराची कृपा अशी आहे की, आपण केलेल्या स्मरणाची पोच ईश्वर आपल्या कृपेने करतो. म्हणून स्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. पण आता दुसरा विचार करुया. समजा ईश्वर स्मरणात चुकीचं कृत्य घडल तर काय. यावर हे निश्चित सांगता येईल की, असं चुकीचं कृत्य घडताना ईश्वर स्मरण केल्यानंतर, त्याचे होणारे परिणाम ईश्वर टाळणार नाही. पण अंततः त्याचा शेवट हा उत्तम फलदायी होईल, याची काळजी तोच ईश्वर घेतो.
आता यावर अजून पुढचा विचार करूया की, अधमी, पापी, हीन वृत्तीच्या लोकांनी जर ईश्वर स्मरण करत, हीन दर्जाचं, पापदायक कर्म केलच, तर त्याच्या परिणामांना ईश्वर थांबवू शकत नाही आणि थांबवणार सुद्धा नाही. कारण ईश्वर हा व्यवहार नाही. पण तोच ईश्वर त्या पाप कर्माच्या फलातून मुक्तता न करता, तुमच्या मुक्तीच्या मार्गाकडे तुम्हाला घेऊन जाईल.
म्हणजे त्या कृत्याच्या परिणामतः तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. केलेल्या कर्माची आणि प्राप्त फलाची सांगड घालण्याची जाणीव जागृत करून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जरूर करेल. पण शेवटी फल त्या जीवाच्या बुद्धिनुसार त्याला मिळेल. तरीही त्याला त्या पाप फलाचा, चुकीच्या कर्म फलाचा भागीदार करूनही, त्याला मोक्षपदाला नेईल. ही झाली अंतिम मार्गाची महती.
पण सर्वसामान्य जीवाला चुकीने झालेल्या कर्मात, ईश्वर स्मरण घडल्यास, त्या ईश्वरीय शक्तीला, फलाच्या भोग काळात, सुलभता आणि सहजता प्राप्त करून द्यावी लागेल. म्हणजे जे फल समोर येईल,ते भोगताना जीवाला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होऊन, त्या पश्चात्ताप अग्नीत, कर्मफल भोग विरून जातील किंवा त्या फलाची तप्तता जाणवणार नाही, हे नक्कीच.
याचं विषयाला उद्याच्या भागात पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment