अध्यात्म विराम १३९
खरतर अध्यात्मिक मार्ग हेच प्रत्येक जीवाचं एकमेव ध्येय असायला हवं. कारण ईश्वराने आत्म्याला, या ब्रम्हांडात पाठवताना, तोच उद्देश समजावून पाठवलं आहे. पण या ब्रम्हांडात आल्यावर, प्रथम त्या आत्म्याला देहाचा आसरा घ्यावा लागतो. कारण या नरदेहाशिवाय अन्य कोणताही मार्ग,आत्मोध्दार व आत्मोन्नती चा उपलब्ध नाही. त्यामुळे इथे ईश्वराने त्या आत्म्याला घातलेलं कोडं सुरू होतं. कारण या देहात आल्यावर सर्वात प्रथम मायेचा खेळ सुरू होतो आणि नंतर प्रपंचाचा गुंता अधिकाधिक दृढ होत जाऊन, जीव जन्मोजन्मा साठी मायाबद्ध होतो. विश्व पसाऱ्यात माझा प्रपंच मी, माझे भोग, उपभोग आणि मी, माझं भलं आणि मी या संकुचित चक्रात अडकून जातो.
काळाच्या ज्या खेळात तो जन्म घेतो, यानुसार तो त्या त्या भूमिका वठवून, आपली प्रपंचा प्रती योग्यता सिध्द करतो. हाच फेरा प्रतीजन्मी असच पडत राहतो आणि जीव मायेत अडकत जाऊन, विश्वाच्या चक्राचा एक अविभाज्य भाग होऊन राहतो. खरा उद्देश काय, आपलं खरं कार्य काय आणि आपल्याला काही दिवसांसाठी मिळालेला, त्या त्या जन्मातील देह हेच आपण, हा विश्वास दृढ होऊन, पक्का होतो. कदाचित हा आता मिळालेला देह, हाच माझा अंतिम प्रवास आहे व या आधी आणि नंतर माझं अस्तित्व काय, हे अज्ञात माझ्या मनाला स्पर्शच करत नाही.
याचं कारण, एखाद्या गोष्टीची दुसरी किंवा मला न दिसणारी बाजू माहीतच नसल्यामुळे, तशी ती आहे, हेच मला उमजत नाही. जसं चंद्राची एकच बाजू कायम पृथ्वीसमोर असल्यामुळे आपल्याला फक्त त्याचं बाजूला असलेला चंद्र दिसतो वा ज्ञात असतो. पण काही गोष्टी तर्क, अनुमान, पडताळणी वा बौद्धिक अकलनाने समजू शकतो. त्याप्रमाणे आपल्या मानसिक अमर्याद चेतनेच्या कक्षा, प्रयत्न, सिद्धी व शास्त्र या आधाराने, काही अती बुद्धिमान जीवांनी, या सर्व देहातीत चैतन्यमय गोष्टींचे तर्क लावून, त्यावर अखंड अभ्यास करून, हे जाणल की, या देहापलिकडे जग आहे, जन्म आहे.
देहासोबत घडणाऱ्या अनेक अनाकलनीय गोष्टी, प्रसंग, भोग व दुःख किंवा सुख व उपभोग हे या देहाने केलेल्या कष्टा पलीकडे आहेत. पण तरीही ते काही जीवांना प्राप्त होतात. जसं एखाद्या गर्भश्रीमंत घरात जन्म होऊन, मायेची सर्व सुखं जन्मतः प्राप्त होण्यासारखं कोणतं कर्म, त्या एकदिवसीय जीवाने केलेलं आहे. तर यांचं उत्तर निश्चितच नाही,असच द्यावं लागेल.मग याठिकाणी कर्म फल सिद्धांत खोटा मानायचा का. पण तो सिद्धांत तर स्वयं ईश्वराने भक्त अर्जुनाला व त्याही आधी सूर्याला सांगितल आहे. म्हणजे या तर्काला कुठेतरी पुष्टी मिळते की, प्रत्येक जीव देहात येताना काहीतरी शिल्लक कर्म फलाचं गाठोड घेऊन येत असणार. अन्यथा काहींना भरपूर सुविधा, राजाच्या, श्रीमंतांच्या घरी जन्म आणि काहीना दोन गरीब अश्या घरात जन्म, हे योग घडून आलेच नसते.
आता हे सर्व ज्ञात झाल्यावर किंवा मनाचा विश्वास ठाम झाल्यावर, प्रत्येक जीव, किंवा त्यातील काही जीव तरी आपली कर्मगती सुधारण्याचा प्रयत्न करतील, असं घडताना दिसत नाही. याचं कारण निष्ठा, विश्वास यांचा अभाव, आजच्या प्रश्नांची चिंता व भय आणि मार्गाचं अज्ञान अश्या कारणांनी, मनाला घेरलेलं असतं. मन हेच सर्व सिद्धींचं साधन असल्या कारणाने मनाच्या स्थितीवर सर्व काही अवलंबून असतं. पण मन हे अत्यंत गतिमान, चंचल व अस्थिर आहे. मग हे साध्य कसं काय होणार.
याचसाठी मनाला हा अज्ञाताच्या वाटेचा प्रवास ही कल्पना आहे असं न वाटता, हा आत्म्याच्या मार्गाचा प्रवास आहे, हे ज्ञान उलगडून सांगितलं गेलं पाहिजे. याचसाठी मनाला या मार्गाचा अंतिम उद्देश, त्यासाठी देह, बुद्धी, मन व आत्मा यांची शुद्धता, त्यासाठीचे मार्ग, व त्यावरील वाटचाल, याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. हे ज्ञान देणारी विद्यापीठे म्हणजे सद्गुरू होत.
या अज्ञाताचा वाटेचं ज्ञान आणि सद्गुरु व त्यांचा या वाटचाली तील प्रत्यक्ष सहभाग व महत्व, आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment