अध्यात्म विराम १४५
पहिल्या प्रकारातील व्यक्ती या आलेला प्रत्येक क्षण हा निरिच्छ मनाने जगतात. म्हणजे आयुष्यात कोणत्याही काळात, परिस्थितीत आणि सुख वा दुःख या स्थिती असतील, तरीही ही लोकं कोणत्याही प्रकारचा वेगळा विचार मनात येऊ देत नाही. अत्यंत साधेपणाने जगून, कोणताही फार मोठा टप्पा आयुष्यात न गाठता सुद्धा हे मनाने उत्तम आयुष्य जगतात. आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य विनातक्रार आणि प्राप्त परिस्थितीनुसार
जगत मार्गक्रमणा करतात. भौतिक दृष्ट्या फार काही मिळवलं नसेल, पण अध्यात्मिक दृष्टीने याना बरच काही प्राप्त होतं.
कारण ईश्वराच्या नजरेत, ज्यांना वाट्याला आलेलं निमूट पणे सोसून पुढे जाणारी माणसं जास्त आवडतात. कारण जे कर्माच्या मार्गाने प्राप्त झालं,ते आपल्याच हिश्श्यातील नफा वा नुकसान आहे. ते आपल्याच खात्यात आपण नोंदवून घेतलं पाहिजे.त्यामुळे या तत्वाला वा ब्रीदाला जगतो आणि त्यानुसार जगतो, तो या जन्मात नाही, पण पुढील जन्मात, नक्की, उच्च पदावर जातो.
हे म्हणजे आपल्या नोकरीत इमानाने काम करणारा, उशिराने पण योग्य पदाला पोचतो. या मागे अजून एक कारण आहे.गीतेत ईश्वराने स्वतः, त्याच्यापर्यंत पोचण्याचे मुख्य तीन मार्ग सांगितले आहेत. एक कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग.यातील पहिला कर्ममार्ग आचरणारे हे पहिल्या प्रकारातील लोक. याचं जीवन निरिच्छ पणें पार पडत. जे बऱ्याच अंशी, निष्काम कर्मयोग साधून देतं.
पाचव्या प्रकारातील व्यक्ती, ज्यांच्या बद्दल आधीच्या एक दोन भागात आपण जाणून घेतलं,त्या ज्ञानमार्ग आचरणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती. त्यांना जगण्याचा अर्थ, उद्देश, कारण आणि ध्येय माहीत असतं. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी, भावना, बुद्धी, मन याना कशाप्रकारे आपण नियंत्रणात ठेवून, आपल्या आयुष्यात आत्मबल, आत्मशुद्धी कशी साधावी, याचं, पूर्ण ज्ञान या लोकांना प्राप्त झालेलं असतं.
खरी समस्या दोन ते चार या तीन प्रकारातील लोकांची असते. बहुतांश लोक या प्रकारात असतात. कारण जीवनाचं ध्येय काय, का जगायचं, मनाच्या विशाल दृष्टीचा अभाव, संकुचित आयुष्य, भोगात देव दैव याना दोष आणि सुखात मात्र आपल्याला त्याचं श्रेय, असा दुटप्पी स्वभाव आणि धारणा या लोकांची असते. म्हणून अनेक संत महंत, साधू, ऋषी मुनी यांची खरी चिंता अश्या लोकांची जन्मोजन्मीची वाटचाल, हीच असते.
म्हणून या तीन प्रकारातील लोकांवर उद्याच्या भागात विस्ताराने चर्चा करूया. तोपर्यंत आपल्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त नाम आपण घेत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment