श्रीकृष्णनीती भाग ३९
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
स्वातंत्र्याच्या सुमारास आणि त्या नंतर सत्तेला वा सत्ता धीशांना लागलेलं बेजबाबदारीचं ग्रहण हे त्याच सुमारास लागलं कि आधीपासूनच होतं, यासाठी स्वातंत्र्याच्या थोडं मागे जाऊ.मुळात काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य मिळवण्या साठी झालीच नव्हती. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांकडून, येथील सुशिक्षित जनतेसाठी जास्तीत जास्त सवलत मिळवता यावी, या हेतूने खरतर इंडियन नॅशनल काँग्रेस या संस्थेची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी ब्रिटिश निवृत्ती सनदी अधिकारी अॅलन ह्यूम नी केली.१८८५ ते १९०५ पर्यंत याच उद्देशाने चालणाऱ्या पक्षाच्या रक्तात लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा मंत्र प्रथम ओतला, हे निर्विवाद सत्य आहे. त्यानंतर त्याची री बाकीच्या सर्व नेत्यांनी ओढली आणि नंतर सत्तेची तूपरोटी चाखली. असो
जवळजवळ १९२० पर्यंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपत राय, जिन्ना यासारखे जहाल नेते काँग्रेसच्या नेतृत्वात होते. यातील जिन्नानी १९१३ मध्ये लोकमान्य तुरुंगात असण्याच्या काळात, मुस्लिम लीग पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस सोडली. त्याच सुमारास म्हणजे १९२० नन्तर जहालांचं काँग्रेसमधील प्राबल्य कमी होऊन, मवाळांचं प्राबल्य वाढलं. हि गोष्ट खरतर ब्रिटिशांच्या पथ्थ्यावर पडली. कारण ब्रिटिश जितके सशस्त्र उठावाला अर्थात शस्त्रांना आणि जहाल नेत्यांना घाबरत होते, तितके ते मवाळांच्या आंदोलनाला घाबरत नव्हते.
याची साक्ष म्हणजे सर्व क्रांतीकारकांना जास्तीतजास्त कठोर शिक्षा देण्यात आल्या आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना आगाखान पॅलेस सारख्या जागेत शिक्षेसाठी ठेवलं जायचं किंवा त्यांना पारंपरिक तुरुंगात ठेवलं तरी नरमाईचं धोरण स्वीकारलं जायचं. निदान क्रांतिकारकां सारखे हाल केले जात नसत, हे ऐतिहासिक सत्य आहे. आपण इतिहासात ते तुरुंगात होते इतकचं वाचलं, पण त्यांना वागणूक किती नरमाईची दिली जायची, हे कधीही इतिहासात शिकवलं गेलं नाही. गांधी नेहरू यांची, तुरुंगातून लिहिलेली पत्र सुद्धा अजून जपण्यात आली आहेत.
कदाचित काळाची हि पावलं ओळखून असेल, याच दरम्यान नेहरू आणि गांधी याची काँग्रेसमध्ये जोडी जमली आणि त्यावेळच्या व त्या नंतरच्या कोणत्याही नेत्याला, जो यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल असं वाटत होतं, त्याला टिकू देण्यात आलं नाही. कदाचित डायनॅस्टी निर्माण करण्याची बीजं आणि आपलंच प्राबल्य राहावं हा अट्टाहास, तेंव्हापासूनच होता आणि तो नंतरही टिकून, काँग्रेस पक्ष एका घराण्याची जहागीर झाली. यात एकमेव महान नेते ज्यांनी या जोडीला आव्हान देऊन,काँग्रेस अध्यक्षपद १९३८ ला निवडणुकीत जिंकलं, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. परंतु ते जहाल आहेत या नावाखाली त्यांना टिकू देण्यात आलं नाही. या अध्यक्षपदाची कारकीर्द पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना द्यावी कि नाही यावर चर्चा झाली, वादविवाद झाले.
त्यावेळी नेताजींची लोकप्रियता वादातीत होती. ते जर काँग्रेसमध्ये राहिले असते, तर पुढचं चित्र वेगळच झालं असतं. पण या वादविवादात सुभाषबाबूंना मनाप्रमाणे काम करता येईना आणि अध्यक्ष असूनसुद्धा प्रत्येक बाबतीत गोष्टी गांधी आणि नेहरू यांच्यापर्यंत आणाव्या लागत, इतका या दोघांचा पक्षावर पगडा तोपर्यंत बसला होता. या सर्व गोष्टींना कंटाळून, सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपद सोडून, फॉरवर्ड ब्लॉक हा स्वतःचा पक्ष काढला.
माझ्या मतानुसार जर सुभाषबाबू काँग्रेस मध्ये राहिले असते आणि या जोडीला त्यांनी यशस्वीपणे तोंड दिल असतं तर, भारत एक कणखर राष्ट्र म्हणून अल्पावधीतच उभं राहीलं असतं. त्यामुळे आज निर्माण झालेले बरेचसे प्रश्न मूलतः नष्ट करण्यात आले असते वा निर्माण झालेच नसते. मला वाटतं की, इथे श्रीकृष्ण नीतीचा अवलंब करून, या जोडीचे धोके ओळखून, त्यांना टक्कर देऊन, सुभाषबाबू, राहिले असते, तर चित्र वेगळं असतं.
अजून एक जहाल आणि कणखर नेते जे पक्षात होते ते म्हणजे सरदार पटेल. ज्यांचं पक्षावर शेवट्पर्यंत बऱ्या पैकी नियंत्रण होतं. किंबहुना ते असेपर्यंत नेहरूंना बऱ्याचश्या गोष्टी एकतर्फी करता येत नसत वा त्या करताना विचार करावा लागत असे. तरीही स्वातंत्र्याचा इतिहास, उपलब्ध लिखाण आणि पुरावे पहिले तर एक गोष्ट जाणवते कि, सरदार पटेल पंतप्रधान पदाच्या खूप जवळ होते. ते एकमेव जहाल नेते होते, हे या जोडीला टक्कर देऊन, आपलं तत्व व हित जपत, टिकून राहिले. म्हणूनच ५५२ संस्थानं भारतात यशस्वीपणे विलीन होऊ शकली.
इथे काँग्रेसमधील १९४६ सालची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया थोडक्यात सांगणं गरजेचं आहे (हाच अध्यक्ष पुढे जाऊन भारताचा प्रथम पंतप्रधान होणार होता,हे ठरलं होतं). वास्तविक १९४० साली अध्यक्ष झालेले मौलाना आझाद हेच १९४६ पर्यंत अध्यक्ष राहिले होते कारण यादरम्यान बरेचसे नेते तुरुंगात होते. म्हणून १९४६ला अध्यक्ष फेरनिवडीच्या वेळी आझाद यांनी पुन्हा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. ज्याला नेहरूंनी हरकत घेतली. कारण त्यांनाही अध्यक्ष होण्याची इच्छा होती. अर्थातच पहिले पंतप्रधान आणि त्यामार्गे सत्ताधीश हि त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती.
परंतु काँग्रेसच्या वोर्किंग कमिटी मधील बहुतांश सदस्यांची इच्छा सरदार पटेल यांना अध्यक्ष करण्याची होती. म्हणून काँग्रेसच्या त्यावेळच्या नियमाप्रमाणे देशातील १५ प्रदेश काँग्रेस कमिट्यांपैकी १२ कमिटयांनी सरदार पटेल यांना नॉमिनेट केलं आणि ३ कमिट्या तटस्थ राहिल्या. म्हणजेच काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठीची अधिकृत १५ सदस्य कमिट्यांपैकी एकानेही नेहरूंचं नाव अध्यक्ष , म्हणजेच पर्यायाने पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून नॉमिनेट केलं नव्हतं. हे विशेष नमूद करण्या सारखं आहे आणि हे रेकॉर्डवरील सत्य आहे. यावर गांधी नेहरूंना म्हणाले देखील कि, एकाही प्रदेश काँग्रेस कमिटीने तुम्हाला नॉमिनेट केलं नाहीये. यावर खरंतर नेहरू गप्प झाले.
परंतु त्यांनी आपली नाराजी गांधीजींजवळ बोलून दाखवली होती आणि हे देखील स्पष्ट केलं होत कि, जर माझी निवड झाली नाही तर मी पुढील सर्व प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला करीन. थोडक्यात नेहरू ब्लॅक मेल करून अध्यक्ष आणि पंतप्रधान झाले. त्यामुळे अर्थातच त्यांना समजावून सांगण्याऐवजी गांधींनी सरदार पटेल यांना समजावून उमेदवारी मागे घेण्यासाठी राजी करण्यास सुरवात केली.
राजेंद्रप्रसाद म्हणाले देखील, गांधींनी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वात विश्वासू माणसाला निव्वळ दिखाऊ नेहरूंसाठी त्याग करायला लावलं. कारण गांधी जाणत होत कि, अन्यथा नेहरू ब्रिटिशांच्या मार्गाने निघून जातील. स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलेल्या एका उच्च नेत्याची हि प्रतिमा होती आणि आपलं म्हणणं साध्य करून घेण्यासाठी, कोणत्याही थराला जाण्याची त्या नेत्याची तयारी होती. हेच एकूण घटनांवरून दिसतं.
अशातर्हेने या देशाच्या माथ्यावर एका घराण्याची सत्ता कायमस्वरूपी लादण्यात आली. खरंतर नेहरूंची रंगेल हि प्रतिमा, त्या वेळच्या बऱ्याच नेत्यांना माहीत होती. कदाचित म्हणूनच स्वच्छ चारित्र्याच्या आणि उत्तम प्रशासक असलेल्या पटेलांना, त्यावेळच्या नि:पक्षपाती प्रदेश काँग्रेस कमिट्यानी पसंती दिली. तीदेखील जवळ जवळ एकमताने. कारण स्वातंत्र्याच्या एकवर्ष आधीच्या सर्वच घटना,तपशील,कागदपत्र, पत्रव्यवहार, ब्रिटिशांशी बोलणी , विशेषतः विभाजन, संस्थानं विलीनीकरण अगदी काश्मीर प्रश्न इत्यादी सर्व बाबींमध्ये सर्व विचार विनिमय पटेलांशीच केला जात होता, हे सर्वश्रुत आहे.
काश्मीर प्रश्न हा ऑक्टोबर १९४७ च्या सुमारास गृह खात्याकडून (म्हणजे पटेल यांच्याकडून) काढून विदेश मंत्रालयात समाविष्ट करण्यात आला. हि देखील नेहरूंचीच खेळी होती, पटेलांना काश्मीर प्रश्नातून बाजूला करण्यासाठी. या सर्व गोष्टी पटेलांना व्यथित करणाऱ्या होत्या. कारण एका व्यक्तीने किती अमर्याद वागायचं आणि एका व्यक्तीने किती अमर्याद जुळवून घ्यायचं, यालासुद्धा मर्यादा आहेत.
सरदार पटेलांनी, हे सर्व काँग्रेसमध्ये फूट पडू नये या एकमेव कारणासाठी केलं. परंतु त्याचे अमर्याद वाईट परिणाम सर्व देशाला भोगवे लागले.कदाचित विभा जनाच्या जखमा सहन केलेल्या जनसामान्यांना काँग्रेस फूट, हा अजून एक आघात सहन करावा लागला असता. परंतु तसही नंतर अनेक फुटीतून गेलेली काँग्रेस, अजून एकदाच फुटली असती. परंतु देशाची जी अपरिमित हानी झाली, ती नक्कीच वाचवता आली असती. परंतु एरवी सर्व प्रश्नांबाबत कणखर असणारे सरदार पटेल याबाबत भावूक होऊन जुळवून घेत गेले.
कदाचित सरदार पटेलांच्या, या बंडखोरी न करता जुळवून घेण्याच्या, स्वभावाचा गांधी आणि नेहरू यांनी गैरफायदा घेत, आपलं इप्सित सध्या केलंच. कारण गांधींना नेहरूंबद्दल इतकं अमर्याद प्रेम का होतं हा एक वेगळाच विषय आहे. इथेच श्रीकृष्णनीतीमधील खूप महत्वाच्या गोष्टीचा विसर पडला. ती म्हणजे अयोग्य व्यक्तीला बाजूला करून योग्य व्यक्तीची योग्य पदासाठी निवड हाच निकष लावला गेला पाहिजे, तिथे भावना चालत नाहीत.
विशेषतः राज्यकरभारा सारख्या दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टींमध्ये कधीही भावना येता कामा नयेत. तिथे देशाहितच महत्वाचं आहे आणि याचाच विसर मोठ्या नेत्याला व्हावा हे दुर्दैव या देशाचं. म्हणजे पक्षाहितापेक्षा देशहित महत्वाचं आहे, ही अर्जुनासम समस्या निर्माण झाली होती आणि पटेलांनी पक्षाहित जपण्यासाठी जास्त कणखर भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळे सरदार पटेलांनी केलेलं कार्य कुठेही कमी महत्वाचं ठरत नाही.
बघूया पुढील इतिहास पुढच्या भागात.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
२८/०६/२०२०
भाग एकोणचाळीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ
Comments
Post a Comment