अध्यात्म विराम १३७
ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पोचून तिथे आपला संदेश स्वतः देऊ शकत नाही, तिथे आपण अनेकदा अप्रत्यक्ष पणे आणि इतर माध्यमाने, आपला संदेश किंवा म्हणणं पोचवण्याचा प्रयत्न करतो.म्हणजेच आपल्याला, एखाद्या बद्दल कळकळ किंवा करुणा भाव असेल तर त्याला काहीही करून आपण त्याला मार्ग मिळावा यासाठी, प्रयत्न करतो. असा प्रयत्न अनेक मार्गांनी असू शकतो. पण मूळ उद्देश त्या व्यक्तीबद्दल असलेला स्नेह, करुणा हा असतो. आपल्या विशिष्ट स्थानामुळे व स्थिती मुळे आपण असा संदेश पाठवू शकत नसलो, तर आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकणाऱ्या, एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीला त्यासाठी निःसंकोचपणे कामाला लावतो.
किंवा जिथे यातील काहीही शक्य नसेल तर निदान काही सांकेतिक अर्थाने, संदेश पाठवून, त्या व्यक्तीला चुकण्या पासून रोखण्याचा प्रयत्न जरूर करतो. अर्थात तेवढी घसट असेल किंवा तितकं स्नेह माया व प्रेम असेल, त्याच ठिकाणी आपण असे संदेश पाठवून जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. यात मुख्य उद्देश त्या व्यक्तीला सत्य परिस्थिती जाणवून, त्यातून त्याने सावरावं, पुढे जावं, ठेच खाऊ नये आणि जीवनात मागे तर निश्चितच येऊ नये, हा असतो. याउलट आपल्या स्नेहापोटी दुसरा एखादा स्नेही, आपल्याला अश्याच प्रकारे, सावरण्याचा प्रयत्न करतो वा करू शकतो.
आपली या देहातील ही स्थिती आहे, तर विचार करा, ज्याला आपला जन्मोजन्मीचा प्रवास, दिसतो, आपल्या चुका कळतात, त्याने आपली होणारी वा होऊ शकणारी अधोगती त्याला समजू शकते व दिसते, त्या विश्व निर्मात्याला या गोष्टींची, आपल्या चुकांची, जाणीव होत नसेल का. मग जो करुणेचा महासागर आहे आणि कारुण्याची महामुर्ती आहे, त्याला आपल्या प्रत्येक लेकराची, किती काळजी, कळवळा, करुणा असेल, याची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. ज्यांना एकापेक्षा जास्त अपत्य आहे अश्या पालकांना आपल्या प्रत्येकच आपत्याची, किती काळजी असते.
त्यातही, ज्या अपत्यात काही वैगुण्य, न्यून किंवा कमतरता असते, त्या आपत्याबद्दल निश्चितच कणभर जास्त करुणा असते. मग आपली जी अपत्ये, कर्माच्या, भोगांच्यां, संचीतातील दुःखाच्या गर्तेत, न्युन, कमतरता यांचं आयुष्य भोगत आहे, त्याबद्दल किती करुणा असेल. पण त्या विधात्याची अगतिकता पहा की, तो प्रत्यक्ष आपल्याशी अनेक मर्यादा असल्यामुळे बोलू, भेटू व प्रत्यक्ष मार्गदर्शन करूही शकत नाही. पण तरीही त्याच्या अंतरात करुणामय, प्रेमळ जननी आहे.त्यामुळे सद्गुरू, ऋषीमुनी, शास्त्र, वेद, पुराणे, संत सज्जन इत्यादी अनेक माध्यमातून, तो आपल्याला, बाहेर पडण्याचा,मार्गात आणण्याचा, चुका दुरुस्त करण्याचा, सल्ला, संदेश, संकेत पाठवून जाणीवा जागृत करतो.
त्याद्वारे पुन्हा आपल्याला मार्गस्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोच. पण हे संदेश, गुह्य संकेत, गहन ज्ञान या स्वरूपात मांडून ठेवलेलं आहे. यातील जे गुह्य ज्ञान आहे, ते सांगण्या साठी, त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी अनेकदा ईश्वर स्वतः या जगतात येऊन, आपल्या आदर्श जीवनाच्या द्वारे, हे संकेत, गुह्य ज्ञान, प्रकट स्वरूपात, समस्त जगतासाठी मांडून पुन्हा परत जातो. त्याच्या जगण्यातून जगाला दृश्यमान स्वरूपात दिसलेलं, सापडलेलं हे मर्म, अनेक जण आपापल्या परीने मांडून जगाला त्याचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करतात.
यामधे त्यांचा व्यक्तिगत कोणताही हेतू नसतो. कारण ईश्वराच्या जगण्यातून, त्यांना जाणवलेलं सार, अर्थ, भावार्थ हा आपल्यापुरता शोधून, आपलं आयुष्य समृद्ध आणि परिपूर्ण करू शकतात. जेणेकरून ईश्वराला अभिप्रेत असलेल्या जीवन मार्गाची वाटचाल ते करून, नक्कीच कृतकृत्य होऊ शकतात. पण ज्या ईश्वराला त्यांनी जाणल आहे, त्याचं ईश्वराच्या करुणामय मनाची, ओळख ज्यांना झालेली असते, ते आत्मकेंद्री राहूच शकत नाहीत. त्यांना इतरांच्या भोगांची काळजी, चिंता करुणा असते.
म्हणूनच ते या गुह्य संकेतांची मांडणी आपल्या परिभाषेत करून, सोप्प्या शब्दात जगापुढे मांडतात. यावरच पुढे चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत त्या करुणामय ईश्वराच्या स्मरणाचा आनंद घेत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment