Skip to main content

अध्यात्म विराम १२२

अध्यात्म विराम १२२

जाणिवांचा विचार करताना आपण असं म्हटल होतं की, प्रगल्भ जाणीवा व्यक्तीला अनेक बाबतीत इतरांपासून वेगळं करतात किंवा दर्शवतात. यातील वेगळेपण हे, शड्रीपू आणि इतर प्रलोभन यांपासून अलिप्त आणि त्यामुळे मनाने शांत, शीतल आणि गंभीर असणं. यातील शांत शीतल याचा अर्थ असा की, ज्या गोष्टींचं आकर्षण सर्वसामान्य व्यक्तींना असतं, त्यातील कोणत्याही गोष्टी अश्या व्यक्तींना आकर्षित वा पथ भ्रष्ट करू शकत नाहीत.

याच महत्वाचं कारण म्हणजे अश्या गोष्टींचे, आकर्षणाचे तरंग व लहरी, या व्यक्तीच्या मनात किंवा मनातील अश्या प्रकारच्या भाव केंद्रांवर आघात करू शकत नाहीत. यातील आघात न करण्याची कृती की हळूहळू घडतं जाते. अध्यात्मिक किंवा कोणत्याही मार्गात प्रगल्भता प्राप्त करताना, मार्गात अनेक अडथळे, प्रलोभने, माया मोह यांचे पाश व इतर अनेक बंध आकर्षित करतात किंवा सुरवातीच्या काळात काही तरंग निर्माण करतात. त्यात कोणतीही गैर बाब नाही.

पण मोहाच्या किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मनात आलेले असे तरंग, भाव केंद्रांवर आघात केल्यानंतर उठणारे भाव तरंग हाताळण्यासाठी लागणारं मनाचं सामर्थ्य, अश्या व्यक्तींना, त्यांचं तप, साधना व मनःशक्ती या द्वारे प्राप्त झालेलं असतं. ही सर्व प्रक्रिया मानसिक, बौद्धिक व आत्मिक अश्या तीनही स्तरांवर होत असते. म्हणजेच एखादी व्यक्ती साधना, भक्ती यांच्या मार्गात जसजशी वर चढत जाते, तसतशी ही प्रक्रिया सुप्तपणे घडत गेलेली असते.

उदाहरणार्थ आपण आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाल्ल्यानंतर, सुरवातीच्या काळात संकटं आल्यानंतर होणारी घालमेल व भीती किंवा त्रस्तता ही, अनेक अनुभवानंतर रहात नाही. अनेक वर्षानंतर अशा प्रकारच्या संकटांना सहज, मनात कोणतीही चलबिचल न होता आणि कोणतेही गैर तरंग न उठता, माणूस शांतपणे सामोरा जातो.

ही एक प्रकारची प्रगल्भता म्हणावी लागेल. कारण माणसाच्या मनात फार मोठे तरंग न उठता, एखादा असामान्य प्रसंग हाताळणं किंवा त्याला सामोरं जाणं, हे ती व्यक्ती आपसूक आणि विनासायास करत जाते. म्हणजेच यातून एक नक्की लक्षात येतं की, प्रगल्भता माणसाच्या मनात कोणतेही अतिरिक्त व मनाला दोलाय मान करणारे किंवा करू शकणारे तरंग, लहरी किंवा भाव तयार होऊ देत नाही आणि झालेच तर, ते हाताळ ण्याची क्षमता व मानसिक शक्ती, प्राप्त झालेली असते.

प्रगल्भता या विषयावर दीर्घ चिंतन केल्यानंतर उद्या प्रगल्भते मुळे प्राप्त लाभ काय काय आहेत, यावर उद्या चिंतन करूया.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...