Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग ३६

श्रीकृष्णनीती भाग ३६
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
(आजचा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. योग्य टिपण्णी अपेक्षित आहे) 

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

धर्म हि संकल्पना मुळातच जगण्याच्या संकल्पनेशी निगडित आहे. त्यावर त्या त्या धर्माची संस्कृती ठरते. रूढार्थाने खरतर सनातन धर्म हा मूळ आणि धर्म या व्याख्येत बसणारा, सर्वात जुना धर्म आहे. कारण बाकी बहुतेक सर्व धर्मांच्या स्थापनेबद्दल निश्चित तिथी माहीत आहे वा ज्ञात आहे. परंतु सनातन धर्म, ज्याला हिंदू धर्म म्हणूनही म्हटलं जातं, त्याच्या स्थापनेबद्दल वा मूळ तिथीबद्दल काहीही सांगता येणार नाही, इतका तो जुना आहे. 

अर्थातच मूळ आणि सनातन असल्यामुळे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा धर्म, हा सनातन धर्मच असतो. कारण तो जन्मतः धारण केला जातो. अर्थात पंचमहाभूत देहात आत्मा प्रवेशल्यानंतर सर्वप्रथम पुरुषार्थ जो आत्म्यातून देहात प्रवेशतो तो धर्म. सनातन धर्मात चार पुरुषार्थ स्वीकारले आहेत. ज्यामध्ये धर्म प्रमुख आहे. बाकी तीन पुरुषार्थ आहेत - अर्थ, काम और मोक्ष।

गौतम ऋषि म्हणतात - 'यतो अभ्युदयनिश्रेयस सिद्धिः स धर्म।' (जे कर्म केल्याने अभ्युदय और निश्रेयस यांची सिद्धि होईल तो धर्म आहे ), अर्थात अभ्युदय म्हणजे सर्वव्यापक हित, उन्नती, ऐश्वर्यवृद्धी आणि निश्रेयस म्हणजे मोक्षाप्रत नेणारी आत्मोन्नती.

मनुने मानव धर्माची दहा लक्षणं सांगितली आहेत. :

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः।
धीर्विद्या सत्यमक्रोधो, दशकं धर्मलक्षणम् ॥
अर्थात ... 

(धृति (धैर्य), क्षमा (दुसर्याने केलेल्या चुकांना क्षमा करणे , क्षमाशील असणे ), दम (आपल्या वासनांवर नियंत्रण असणे.), अस्तेय (चोरी न करणे ), शौच (अंतर्बाह्य शुचिता,शुद्धता), इन्द्रिय निग्रहः (इन्द्रियांना वश करणे वा त्यावर नियंत्रण राखणे ), धी (बुद्धिमत्तेचा उपयुक्त उपयोग करणे ), विद्या (ज्ञानप्राप्ती करणे, त्याची जिज्ञासा असणे ), सत्य (मन वचन आणि कर्म याद्वारे सत्य व्रती राहणे ) आणि अक्रोध ( अर्थात क्रोध न करणे ) ; हि दहा मानव धर्माची लक्षण आहेत ).

म्हणजेच मनूने यात संपूर्ण मानवजातीची लक्षणे सांगितली आहेत आणि विद्या, ज्ञान, बुद्धी ही कोणत्या एका जातीची मक्तेदारी असेल, हे सांगितलं नाही. म्हणजेच मनुबद्दल अत्यंत विषारी अपप्रचार केला जात आहे, याचा वाचकांनी बोध घ्यावा. जो व्यवहार वा कर्म, आपल्याला स्वतःसाठी अनुकूल वाटत नाही, तो व्यवहार वा ते कर्म दुसर्याशी न करणे - हि धर्माची कसौटी आहे.  

श्रूयतां धर्म सर्वस्वं श्रुत्वा चैव अनुवर्त्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि, परेषां न समाचरेत् ॥
अर्थात ....

(धर्माचं सर्वस्व अर्थात सार काय आहे , ऐका आणि ऐकून त्यानुसार मार्गक्रमण करा ! जे आचरण स्वतःला रुचणार नाही वा योग्य वाटणार नाही ते आचरण दुसऱ्याशी न करणे !).

वरील व्याख्या वा संकल्पना वा विश्लेषणं पाहिली कि, त्यामध्ये विशिष्ट धर्म संकल्पना मनात ठेवून हि व्याख्या लिहिली आहे, असं वाटत नाही. कारण हि व्याख्या फक्त मनुष्यप्राणी समोर ठेवून, त्याने देहात आल्यानंतर आणि देहातून जाईपर्यंत,आचरणात आणायच्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत. अर्थातच या तत्वात जे बसत नाही तो धर्म नाही. हि व्याख्या अनन्य (exclusive) नाही, तर समावेशक (inclusive) आहे. समावेशक व्याख्येत या व्यतिरिक्त गोष्टी देखील बसू शकतात असा अर्थ निघतो वा असे अनुमान काढता येते. कारण यातील बऱ्याच गोष्टी वा तत्वे स्थलकालत्व व परिणाम यांवर ठरतात. 

धर्माचा इतका सखोल विचार करण्याचं प्रयोजन म्हणजे तो सर्व बाबींशी निगडित आहे. जसं संसारी माणसाचा धर्म म्हणजेच गृहस्थाचा धर्म, कुटुंब प्रमुखाचा धर्म, विवाहित स्त्रीचा धर्म, जन्माला आल्यानंतर त्या जातकाचा धर्म, आपल्या मातापिता आणि गुरु यांप्रती आपला असलेला धर्म. राजाने पाळावयाचा राजधर्म, सन्यास घेतलेल्यांनी पाळावयाचा सन्यासधर्म, कर्मचारी आणि सैनिक यांचा धर्म, मातृभूमीप्रती आपलं असलेलं उत्तरदायित्व म्हणजेच आपला धर्म. यातील सर्व गोष्टी एकमेकांना पूरक समजाव्यात म्हणजेच कोणतीही गोष्ट एकमेकांशी विरोधाभास निर्माण न करेल हे पाहावे. सर्वात शेवटी मानव धर्म श्रेष्ठ आहे. 

आता मूळ मुद्द्याकडे वळूया. मुळात यातील कोणताही तत्व हे दुसऱ्या तत्वाला पूरक आहे, पण मारक नाही. अर्थात जिथे दोन तत्वांचा संघर्ष निर्माण होईल, तिथे काय. हा प्रश्न निर्माण होतोच. इथेच खरी मेख दडलेली आहे. अखिल मानव जातीला,आपले ध्येय मानून निर्माण झालेला, (केलेला असं म्हणता येणार नाही, कारण याचा स्रोतच माहीत नाही), वा मानवाच्या जन्माशी निगडित असलेला धर्म म्हणजे सनातन धर्म. 

ज्याला परंपरेने हिंदू धर्म असं नामाभिधान प्राप्त झालं आणि हे शब्द एकमेकांना पूरक या अर्थी वापरले जाऊ लागले. म्हणजेच या दोन शब्दांची सांगड घातली गेली. तरीही मुळात हिंदू पद्धती हि संस्कृतीशी निगडीत संकल्पना आहे आणि मूळ सनातन धर्म येथेच परंपरेने पाळला गेला, जपला गेला, समृद्ध झाला, विस्तारला आणि म्हणून हिंदू या शब्दाशी तो जोडला गेला. 

आज हे दोन्ही शब्द परस्पर पूरक वापरले जाऊ लागले. तरीही मूळ धर्म म्हटलं कि, सनातन वैदिक धर्म संकल्पना. येथे एक मुद्दा, मुद्दाम स्पष्ट करतो कि, वैदिक धर्म म्हटलं कि, तो फक्त ब्राम्हणांचा असा एक खूप मोठा गैरसमज पसरला आहे वा पसरवून दिला आहे. परंतु हे सत्य नाही. मुळात वैदिक धर्म हि कल्पना पूर्णतः कर्माशी निगडित आहे. 

वैदिक काळात कित्येक ऋषीमुनी हे जन्माने एखाद्या जीवनपद्धतीत जन्मले असतील, तरीही नंतर कर्माने ते ऋषीमुनी वा संत सज्जन म्हणून नावा रूपाला आले आणि कित्येक महर्षी पदालादेखील पोहोचले. उदाहरणार्थ महर्षी वाल्मिकी, महर्षी वेदव्यास व्यास (ज्यांचा जन्म एका कोळिणीच्या पोटी झाला), महर्षी विश्वामित्र इत्यादी. 

कर्माने ठरणाऱ्या वर्णव्यवस्थेचा जन्माने ठरणाऱ्या व्यवस्थेत झालेला बदल कसा झाला असू शकेल हे एका उदाहरणाने पटवून देता येईल. एखाद्या कुळात वा कुटुंबात एखादा राजकारणी जन्म घेतो. आपल्या कर्माने तो सर्व उच्च पद प्राप्त करतो. हि झाली कर्माधिष्ठित व्यवस्था. परंतु त्या पदाचे सर्व अधिकार आणि त्याचे फायदे चाखल्यानंतर, ते पद वा तो अधिकार वा ती व्यवस्था आपल्याकडेच राहावी, यासाठी आपल्याच कुटुंबात ते राहावे यासाठी, आपल्या पुढील पिढयांना त्यातच आणून, सर्व लाभ स्वतःच्या खानदानात ठेवतो. 

हि झाली जन्माधिष्ठित व्यवस्था. मला वाटतं या तर्हेने आपण पुन्हा एक नवीन वर्णव्यवस्था निर्माण करत आहोत आणि हे आपल्याला अजून ५० वर्षांनी उमगेल. पण तोपर्यंत कदाचित उशीर झाला असेल आणि इतर सर्वसामान्य घरातील लोकांना त्या पदांवर पोहोचणे दुरापास्त होऊन बसेल. असो 

धर्माच्या या सर्वसमावेशक व्याख्येत एक तत्व कायम लक्षात ठेवलं पाहिजे कि या तत्वांनी मानवाचं कल्याण होईल हेच ध्येय सनातन धर्माचं होतं, आहे वा राहील. पण मग समस्या निर्माण का होतात. हा प्रश्न उरतोच. याच मुख्य कारण म्हणजे या तत्वातील काही वा सर्व तत्वांची पायमल्ली होते म्हणून. त्यावेळी मानवकल्याणा स्तव अशी पायमल्ली करणाऱ्याला त्याचा उचित दंड, शिक्षा करणं जरुरी होतं. कारण मानवाचं अस्तित्व हे महत्वाचं आहे आणि तेच मानलं गेलं पाहिजे. आता हि शिक्षा वा दंड कोणी करावा आणि कश्या स्वरूपाचा असावा याचे काही मापदंड कसे ठरवावेत. 

मुळात असे मापदंड तात्कालीन परिस्थिती, मागील घटना वा निर्णय, धर्मातील काही नीतिनियम, दंड वा शिक्षा यांचा होणारा परिणाम, त्याचे सकारात्मक परिणाम, त्यातून तयार होणारे नवीन प्रश्न, त्यानंतरची समाजाची मानसिकता, शिक्षापात्र व्यक्तीची वा समुदायाची मानसिकता, शिक्षेमुळे त्यांच्यामध्ये अपेक्षिलेले उचित बदल होणार वा न होणार याचं परिस्थितीजन्य अनुमान आणि जर असे उचित बदल न घडल्यास, दंडात करावयाचा बदल, जेणेकरून पुढे असे कृत्य करण्यास व समाजव्यवस्था बिघडवण्यास, कोणीही प्रवृत्त होता काम नये, या सर्वांचा एकत्रित परिणाम विचारात घेऊनच दंड वा शिक्षा ठरवली जावी , वा जाऊ शकते वा जात असावी. 

वर मांडलेल्या धर्माच्या दहा तत्वात क्षमा या शब्दात अहिंसा या शब्दाचा समावेश असावा असा निष्कर्ष काढता येऊ शकेल. परंतु यातील कोणतही तत्व एकट्याने विचारात घेतलं तर,अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात वा आपण अश्या प्रश्नांना जन्म देऊ शकतो. कारण मुळात कोणतंही तत्व हे समाजाच्या व्यापक भल्यासाठी आहे. 

जसं एखाद्या माणसाने फक्त नीतिनियम, पाळून उपयोग नाही. सर्वांनी ते करावं हे अपेक्षित आहे आणि जर तसं होत नसेल तर त्यावर उपाय शोधणं, प्रसंगी कायदा करणं वा यातील तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडित करणं हे क्रमप्राप्त आहे. 

सर्वसाधारणपणे हे कार्य तत्कालीन राजव्यवस्थेकडेच असलं पाहिजे. इतिहास आणि सद्य परिस्थितीचा अभ्यास केल्यास या कार्यात बरेचदा राजव्यवस्था निष्फळ ठरली आहे, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाने, भ्रष्ट व्यवस्थेने, उणिवांमुळे, जाणूनबुजून, भविष्याचा व समाजाचा कोणताही विचार न करता, स्वार्थासाठी, अमिषाला बळी पडून, व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी इत्यादी अनेक कारणांनी. 

याबाबत पुढील भागात विस्ताराने पाहू. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
१९/०६/२०२०
भाग छत्तीसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...