श्रीकृष्णनीती भाग ३२
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
कालच्याच मुद्द्यावर पुढे विचार करताना, एक महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय संस्कृती आणि तिची महती जेंव्हा गायली जाते, तेंव्हा प्रत्येक वेळी त्याचा अर्थ तसाच घ्यायला हवा असं नाही. म्हणजेच ज्यावेळी एखादा आक्रमक सेनानी विशेषतः परकीय मुलखातील एखादा आक्रमक इथे येऊन हरल्यानंतर, जेंव्हा एखाद्या राजाचं गुणगान करतो आणि त्याला भारतीय संस्कृती, दया क्षमा आणि शांती यांचं स्मरण करून देतो, तेंव्हा तो एक हरलेला सेनानी आहे, हे त्या जेत्या राजाने लक्षात ठेवलंच पाहिजे. अन्यथा जी चूक पृथ्वीराज चौहान, रामदेवराय यादव वा तत्कालीन अनेक हिंदू राजांनी केली, तशी ते जर न करते तर भारतखंडाचा इतिहास वेगळा लिहिला असता.
मुळात तुम्ही राज्यावर आहात, तेंव्हा संपूर्ण प्रजेचं उत्तरदायित्व तुमच्या हातात आहे. म्हणजेच तुमची एखादी चूक संपूर्ण राज्याला आणि पर्यायाने राज्यातील प्रत्येक नागरिकाला दुःख, दैन्य, अशांती, अंधकारमय भविष्य देऊ शकतं . इथे खूप मोठा घोळ जो त्या त्या राजानी, जिंकल्यानंतरसुद्धा शत्रूला क्षमा करताना, घातला. ज्यावेळी शत्रू तुम्हाला तुमच्या महान संस्कृतीचा इतिहास सांगतो, त्यावेळी तो एक शत्रू म्हणूनच हे काम करतो. तो मित्र नाही वा याचकही नाही आणि अतिथीही नाही.
हि बाब इतक्या महान राजानी विसरली असेल असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल. तरीही एखाद्याला २० वेळा फक्त खंडणी घेऊन सोडून देणं, हा अक्षम्य अपराध आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण तो जर परत परत तुमच्यावर हल्ला करतोय,म्हणजेच त्याला तुम्हाला संपवायचं आहे, हि एक साधी गोष्ट इतक्या महान राजांच्या मनात किंवा सभागृहातील कोणत्याही सल्लागाराच्या मनात आलीच नसेल का.
जर तसं असेल तर फक्त पराक्रमी आहेत म्हणून त्यांना महान म्हणता येईल, हे कितपत योग्य आहे. त्यांच्या अक्षम्य चुकांच मूल्यमापन आपण नागरिक, इतिहास कार व हिंदू म्हणून कधीच करणार नाही का. कारण परत परत हल्ला करणाऱ्या शत्रूला, अश्या परिस्थितीत संपवून विषय संपवणं हे एकच उत्तर शिल्लक राहतं .
कारण दया क्षमा आणि शांती हि खऱ्या अर्थाने याचक, अतिथी यांसाठी आहे, हि साधी गोष्ट श्रीकृष्णांनी अनेक असुर, कंस, चाणूर, जरासंध, शिशुपाल, कालयवन, द्रोण, कर्ण, जयद्रथ या सर्वांना निर्विकारपणे संपवून दाखवून दिली आहे. याचकांना वा अतिथीला दया दाखवून सहाय्य करणं पूर्णपणे भिन्न आहे,स्वागतार्ह आहे आणि एखाद्या शत्रूला, ज्याचं अंतिम ध्येय तुमचं राज्य घेणं वा तुम्हाला संपवणं हेच आहे, त्याला हरवून सुद्धा सोडून देणं, हि अक्षम्य अशी चूक आहे.
हीच चूक ज्यावेळी सरनोबत प्रतापराव गुजर यांनी, बहलोल खानाला सोडून केली, त्यावेळी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील क्षमा केली नाही. कारण ते जाणत होते की इतिहास फक्त जेत्याना अर्थात विजेत्यांना जाणतो, पराभुतांना इतिहासात आणि जनात काहीही स्थान नाही.
त्याचप्रमाणे मोंगलांसाठी विजापूरकरांविरुद्ध लढाई लढताना सरसेनापती नेताजी पालकर थोडे म्हणजे काही क्षण उशिरा पोहोचल्यावर, त्यांनाही राजांनी क्षमा केली नाही. राजे इतके कर्तव्यकठोर राहिले म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याचं ध्येय गाठू शकले. हे एक उदाहरण आहे महाराजांचं, ज्यांनी स्वकीयांना देखील क्षमा केली नाही चूक केल्यानंतर आणि त्याच वेळी इतिहासात काही राजे आहेत, ज्यांनी परकीय शत्रूला अनेक वेळा पराभूत करून देखील, जीवित सोडलं आणि इतिहास साक्षी आहे कि, नंतर त्याच शत्रूंनी त्याच राजांना पराभूत करताक्षणी हाल हाल करून मारलं.
मुळात हा घोळ योग्य वेळी योग्य गोष्टींचे अर्थ लावण्यात आपणच चुका केल्यात, यामुळे झालाय. त्यामुळे आपणच त्या चुकांची अपरिमित किंमत मोजली, जी कधीही भरून येणार नाही. अयोग्य वेळी तुम्हाला अडकवण्याचा हा सापळा कायम इतिहास आणि वर्तमानात देखील रचला जातो आहे आणि याच सापळ्यात कायम अडकून, आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो आहोत.
हा सापळा म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने तुमच्याच चांगुलपणाचा हवाला देऊन, संस्कृतीचे गोडवे गाऊन, तुम्हाला योग्य निर्णय घेण्या पासून परावृत्त करणं. जेणेकरून तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन सदर शत्रूला सोडून द्याल. त्याचा कार्यभाग साध्य होईल आणि नन्तर तो तुम्हाला अडकवायला मोकळा. हाच सापळा अनेक वेळा,अजूनही रचला जातो. प्रसार माध्यमांकडून वा त्यांना हाताशी धरून परकीय शक्तींकडून.
ज्यावेळी अतिरेक्यांकडून निरपराध माणसं मारली जातात, त्यावेळी गप्प असलेली माध्यमं आणि तथाकथित मानवतावादी, त्यावेळी बरोबर जागे होऊन तुम्हाला मानवतेचा हवाला देऊन, गप्प करण्याचा प्रयत्न करतात, जेंव्हा आपलं सैन्य एखाद्या अतिरेक्याला मारतं. आज शतकानुशतके हाच सापळा कायम रचून एक प्रकारे तुमच्यात वैचारिक गोंधळ निर्माण करून, त्यांच्या चुकीच्या प्रतिमा तयार करण्याचं कार्य व हित योग्य पद्धतीने साध्य करून घेतलं जातं.
मुळात याचं खूप महत्वाचं कारण युगानुयुगे आपल्याला मानवतेचे पुजारी, थोर संस्कृती रक्षक या बिरुदांनी गौरवलं जातं. नव्हे तर या बिरुदांचा आपल्याच विरुद्ध पद्धतशीरपणे वापर केला गेलाय आणि अजूनही करून घेतला जातोय. ते त्या त्या प्राप्त परिस्थितीत योग्य असेलही. परंतु आपण कायम हि एक गोष्ट विसरतो कि, प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी देखील रणांगणात उतरल्यानन्तर फक्त शस्त्रांची भाषा बोलली. त्यावेळी त्यांनी द्या क्षमा वा तत्सम मानवतावादी राग गायला नाही. कारण एक मुख्य तत्व जे श्रीकृष्णांनी कायम सांगितलंय अनेक उदाहरणातून कि, ज्याला जी भाषा कळते तीच त्याच्याशी बोलावी.
शांतीची भाषा कळणाऱ्याला शांतीचा संदेश आणि ज्याला फक्त दुरुत्तरे, उद्धटपणा, क्रोध वा प्रसंगी शस्त्र हीच भाषा कळते, त्याच्याशी निसंकोचपणे तीच भाषा बोलायला काहीच हरकत नाही. ज्यावेळी आपण शिकू, त्याचवेळी आपण आपल्या खऱ्या संस्कृतीच्या वारशाचे रक्षक होऊ अन्यथा नष्ट होऊ. आज आपण देशात बघितलं तर, कित्येक पिढ्यांची अमाप संपत्ती, स्त्रिया, मुले, पुरुष असे अनके अगणित जीव, अमूल्य अशी सांस्कृतिक धरोहर, हजारो देवळं, सुंदर सुंदर बांधकामं गमावून बसलोय. का तर आक्रमकांना आपण हरवून सुद्धा सोडून दिलं.
याच महत्वाचं कारण म्हणजे आपला पद्धतशीरपणे करण्यात आलेला बुद्धीभ्रम. मुळात एक गोष्ट आपण विसरतो कि, ज्या देवांनी मानवता, शांतता, दया, क्षमा या तत्वांचा पुरस्कार केला, त्यांनीच आपल्या हातात संरक्षणार्थ शस्त्रदेखील बाळगली आहेत आणि वेळ प्रसंगी सुयोग्य पद्धतीने वापरली आहेत. संपूर्ण महाभारत, कृष्णाचं चरित्र, विशेषतः महाभारतचं युद्ध यात नियम मोडणाऱ्या कौरवांनीच अनेकदा पांडवांना नियमांची आठवण करून दिली आहे. पण त्या त्या प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनीच कौरवांना विशेषतः दुर्योधनाला नियम भंगाची पण आठवण करून गप्प केलंय. परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण येईलच असं नाही. त्यामुळे आपल्यालादेखील पुढील काळासाठी विना कारण मानवतावाद सोडून द्यावाच लागेल. अन्यथा नष्ट होण्याची तयारी ठेवावी लागेल.
याबाबत इस्राईल हे खूप मोठं उदाहरण आहे. चारही बाजूनी अनेक मुस्लिम शत्रू राष्ट्रांनी घेरलेला हा देश,फक्त आक्रमक भूमिका आणि जशास तसे उत्तर,याच तत्वांवर ताठ मानेने उभा आहे. मला वाटतं त्यांना पाहिल्यावर असं जाणवतं कि, कदाचित श्रीकृष्ण नीती, जी अशांततेच्या काळात विशेष उपयोगी येते, ती त्यांनी योग्य प्रकारे अभ्यासून अवलंबली आहे. अन्यथा त्यांचं अस्तित्वच मुश्किल आहे.
कारण कितीवर्ष संस्कृतीचं तेच घोषवाक्य गात राहायचं कि, भारत कोणावरही हल्ला करणार नाही. पण मग आलेले हल्ले किती वर्ष, किती शतकं, किती युगं झेलत राहायचं आणि त्यासाठी अजून संस्कृतीचा, सनातन धर्माचा होणारा ऱ्हास पाहात राहायचं. शत्रूला हरवण्याच्या ताकदीचा किती वर्ष अभिमान बाळगून फक्त आलेले हल्ले यशस्वीपणे झेलत राहायचं, याचा विचार करायची वेळ खरच आली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अन्यथा टिकण्याची शक्यता नाही. ग्रीक, बॅबिलोनियन ईजिप्शियन वा अन्य नष्ट झालेल्या संस्कृतीप्रमाणे नष्ट व्हायचं, तेही श्रीकृष्णनीती सारखी तेज धारदार विचारधारा व्यासांच्या , श्रीकृष्णांच्या आपल्या याच मातीतल्या महाभारताने दिली असताना.
विचार करा.
उद्या पुढे पाहू........
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०९/०६/२०२०
भाग बत्तीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ
Comments
Post a Comment