Skip to main content

मुरली - २३

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २३


"अन्यथा काय नारायणदास महाराज"

यावर साधू उत्तरतात

अन्यथा मला अजून फक्त एकाच घरी भिक्षा मागता येईल आणि तिथेही भिक्षा नाही मिळाली तर , मग आज पुन्हा आम्हाला उपवास घडेल."

"अस होता कामा नये महाराज. आपण विन्मुख परत गेलात तर मी घोर पापाची धनी होईन. यावर आपणच कृपा करून मला काही उपाय सांगावा. मी आपली आजन्म उपकृत राहीन."

अस म्हणून राधा त्या साधूंच्या पाया पडते. साधू राधेला खांद्याला धरून उठवून म्हणतात

" यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे, ज्याचा तू विचार करत आहेस त्याचा विचार सोडून दे. सोडुन दे म्हणजे अजिबात विचार करू नकोस. त्या व्यक्तीचा विचार सुद्धा न करता फक्त माझे आराध्य निर्गुण निराकार परमशक्ती महानारायण यांचा, माते तू विचार करावास."

" का "

" कारण द्विधा आणि चिंतीत मनाने दिलेलं दान अथवा भिक्षा अस्वीकारार्ह असते. याच साठी तुझी मनःस्थिती शांत आणि चिंतामुक्त होण्यासाठी श्रीनारायणाव्यतिरिक्त अन्य कोणी पात्र आहे असं आम्हास वाटत नाही. म्हणून तू त्यांचा मनोभावे ईश्वर म्हणून स्वीकार कर, म्हणजे तू चिंतामुक्त होऊन मला भिक्षा देण्यास सत्पात्र होशील."

राधा प्रश्नार्थक चेहऱ्याने अजूनच उदासवाणी साधूंकडे पहाते.
खरतर राधा आता द्विधा मनःस्थितीत आहे. कारण पूर्ण आयुष्य ज्याच्या मैत्रीसाठी, ज्याचा श्वास बनून जगली, ज्याच्या एका दर्शनासाठी ती आपला पूर्ण जन्म उधळू शकते, ज्याच्या साठीच तीचा जन्म आहे अश्या कृष्णाचा विचार सोडून द्यायचा म्हणजे श्वास न घेण्यासारखं आहे या राधेला.

त्याच मनोवस्थेत  तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. इकडे श्रीकृष्णाच्या हृदयात  राधेची आर्त हाक पोहोचते. घडत असलेला सर्व प्रकार श्रीकृष्णाच्या ध्यानात येतो.  श्रीकृष्ण त्वरित राधेच्या मदतीला येऊन नारायणदास महाराजांना काय विचारायचं ते सांगतो. राधा मधुसूदनाच्या धावून येण्याने मनोमन सुखावून जाते. तिचा विश्वास सार्थ ठरतो. भानावर येऊन राधा महाराजाना म्हणाली

" महाराज क्षमा मागून एक विचारू का "

" अवश्य विचार "

" आपण मला जे करण्यास सांगत आहात ते करण्यास मी असमर्थ आहे. जो माझा श्वास आहे आणि ज्याचं स्थान माझ्या हृदयापार आहे , जो नित्य माझ्या प्राणात स्थित आहे, जो माझं अस्तित्व आणि ज्याच्यासाठी माझं अस्तित्व आहे, त्यालाच विसरणं , त्याच्या नावाचा त्याग करणं हे प्रत्यक्ष मृत्यू पत्करण्यासारख आहे. म्हणून माझी आपल्याला एक आर्जव आहे, ज्याच्या भेटीसाठी मी अधीर आहे आणि जो माझा प्राण आहे अश्या श्रीकृष्णाच्या भेटीचा आशिष आपण मला द्याव. मी तशी आपल्याला विनंती करते. म्हणजे मी खऱ्या अर्थाने चिंतामुक्त होईन"

एवढं बोलून राधा नारायणदास महाराजांचे चरण धरते. महाराज स्मित करतात. कारण त्यांना समजलंय की, यामागे करता धरता कोण आहे. महाराज राधेला उभं करून म्हणतात.

" मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो. मी तुला तुझ्या अत्यन्त प्राणप्रिय व्यक्तीची भेट घडवून देण्याचं वचन देतो. तो कोण आहे आणि कोठे असतो त्याला ओळखण्याची खूण काय ते मला सविस्तर सांग."

राधा यावर महाराजाना सांगते.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...