अध्यात्म विराम १०४
आपण आता भागवत धर्माचा विचार आणि चिंतन करत आहोत. वास्तविक भागवत धर्म म्हणजे वारकरी आणि श्री विठ्ठल हे एक अतूट नातं असलं आणि संत सज्जन व लाखो वारकरी यांनी, आज शेकडो वर्ष, अविश्रांत त्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं असलं तरीही, भागवत धर्म म्हणजे एकाचवेळी सामुदायिक व व्यक्तिगत भक्तीचा एक अनोखा संगम आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल वाट पायी तुडवत, वर्षानुवर्षे आपले श्वास त्यासाठी वेचणं हा भक्तीचा एक अद्भुत दाखला आहे.
अनेक संत महंतांच्या पालख्या व त्या पालख्यांमधे लाखो वारकरी, आपल्या भक्तीचा, भक्तीतील आत्मयोगाचा मनाच्या गुंतवणुकीचा आणि वैराग्य व विरक्ती यांचा एक विश्व रूप साक्षात्कार पेश करतात. वृत्तीचं वैराग्य, मनाचा निश्चय, विचारांची एकतानता, भक्तीची अद्भुतता हा या भागवत धर्मीय भक्तांचा खरा आत्मा आहे. अनेक संत महंत याना मानणारे, लाखों भक्तजन, चंद्रभागेच्या तीरा वर, फक्त आपल्या विठु रायाच्या एका दृष्टीनेही नव्हे तर कळस दर्शनाने सुद्धा आपली वारी सार्थकी लागली, यात धन्यता मानतात.
त्यावेळी तिथे जमलेल्या, भक्तिरसात आकंठ बुडालेल्या अनंत आत्मजीवांना, आपल्या आत्म्याचा मूळ अंश, परम आत्मा सखा पांडुरंग प्रत्यक्ष भेटल्याचा अवर्णनीय आनंद मिळतो.त्या अनोख्या,अद्भुत भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या आणि तहानभूक विसरलेल्या लाखो जनांच्या या महासागराचा प्राण एकच असतो. म्हणजे अनेक देहात एकात्म रुपात प्रकट झालेल्या, त्या वैकुंठात वास करणाऱ्या, श्री विष्णुने भक्तांच्या आग्रहाखातर, नव्हे भक्तांच्या प्रेमाखातर, धारण केलेल्या सावळ्या विठाईत, आपली माय बाप बघणाऱ्या वारकरी जनांना आत्मरुप, आत्मानंद, आत्मसंतोष, आत्मस्वरूप दर्शनयोग प्राप्त होतो.
नव्हे त्या अनेक आत्म्यांना एकच नामरुपात, सांक्षीरुपात, संयम रुपात, निज भक्तीच्या संगमी न्हाताना पाहून, वैकुंठात वास करणारा प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा, भुलोकी येऊन धन्य होत असेल. नवविधा भक्तीच्या अनेक पायाऱ्यांना स्पर्श करणाऱ्या आणि भक्त व भगवंत यांच्या दास्य व सख्य रूप भक्तिचं एकाचवेळी दर्शन करवून देणाऱ्या, या भागवत धर्माच्या ध्वजेची धुरा,अशीच वाहती ठेवण्या साठी,भक्तवत्सल पांडुरंग, स्वतः सुद्धा अंशरूपात अवतरित होऊन संत सज्जन रुपात भक्तांच्या या भक्तीला हातभार लावतो.
म्हणजेच स्वतःच्या भक्तांनी, माझी भक्ती करावी, ह्या विचाराने नव्हे तर, त्यांच्या भक्तीने बांधले जाऊन, त्यांच्या भक्तीला बांध येऊ नये किंवा खंड पडू नये म्हणून आणि त्यांच्या इश्वरावरील प्रेमाने बद्ध होऊन, त्यांची ऊर्जा, शक्ती, भक्ती व जागृती कुठेही कमी पडू नये व त्यांना आपला भक्तिमार्ग स्वयम् स्फूर्तीने पुढे नेता यावा आणि त्यातील अडथळ्यानी त्यांची ऊर्जा, चेतना कुठेही मंद होऊ नये, यासाठी स्वतः पांडुरंगाने, अनेक प्रकारे सहाय्य केल्याची, शेकड्याने उदाहरणं आहेत. हे आधुनिक काळातील सख्य भक्तिचं जिवंत व ज्वलंत उदाहरण आहे, असं माझं स्वतःचं सुद्धा मत आहे.
भागवत धर्माबद्दल अजूनही बरच काही चिंतन योग्य आहे. म्हणून हाच विषय उद्या पुढे सुरू ठेवू.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment