अध्यात्म विराम १०७
मायेबद्दल आपण काल थोडं चिंतन केलं, ते आज पुढे सुरू ठेवूया. माया ही सृष्टीच्या आरंभी विधात्याने निर्माण केली आणि ती ब्रम्हांडाच्या अंतापर्यंत असणार आहे. पण तिचा आपल्या जीवनातील सहभाग, कार्यभाग आणि कर्मभाग किती आहे, याचा विचार करूया. कदाचित त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.ज्याअर्थी माया ब्रम्हांड रचण्याच्या आधी होती. म्हणजेच तिचा सृष्टीच्या खेळात सहभाग आहे आणि तो राहील, ही विधात्याची योजना आहे, हे नक्कीच समजावे. म्हणजेच आपली इच्छा असो की नसो, माया पदोपदी आपलं अस्तित्व दाखवणार आणि ते अपरिहार्य आहे.
मायेच्या या नित्य निरंतर सहभागाचं तार्किक आपण आधी जाणून घेऊ. माया ही, जीव देहात आहे, तोवर आपलं कार्य करत राहते. किंबहुना माया ही, ईश्वराने, जीव, देह, मन, बुद्धी, वाचा या सर्वांवर वर्चस्व गाजवून, जीवाला देहात असेपर्यंत ईश्वर. सेवेचा विचार करण्याची किंवा ईश्वराच्या आराधनेची चिंता किंवा चिंतन करू न देण्याची तिला दिलेली, ईश्वर प्रेरित आज्ञा पालन करत राहेत. ईश्वर प्रेरित या शब्दात सर्व काही स्पष्ट होतं. तरीही हा शब्द आणि त्याचा गर्भितार्थ नीट समजून घेऊया. ईश्वराची खरी इच्छा काय आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे हा सर्व खेळ आणि त्यातील मुख्य मेख आपल्या लक्षात येईल.
एक उदाहरण देतो म्हणजे मुद्दा लगेच लक्षात येईल. आपण परीक्षा देतो, त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही की, परीक्षकांना नक्की काय अभिप्रेत आहे. म्हणजे त्यांना नक्की या प्रश्नातून काय अभिप्रेत आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. आपली परीक्षेत तिथेच गफलत आणि गल्लत होते. आपण खूप मेहनतीने सविस्तर दिलेलं उत्तरसुद्धा, फार गुण देत नाही आणि आपण परीक्षक, परीक्षा व्यवस्था, शिक्षक यांना नावं ठेवून मोकळे होतो. पण यातील खरी गोष्ट, अनेकदा मोठं मोठे खाजगी शिकवणी वर्ग सुद्धा आपल्याला सांगू शकत नाहीत.
परीक्षक, परीक्षा व्यवस्था, यांना हे अभिप्रेत असतं की, या विषयातील, धड्यातील, गाभा, मुख्य मुद्दा, सार आणि गुह्य आपल्याला समजलं आहे की नाही. म्हणजे विषया तील जाण किती झाली आहे, एखाद्या छोट्या गोष्टीला, विषयाला आपण आपल्या पद्धतीने किती फुलवू शकतो. म्हणजेच फक्त पाठ करून, घोकंमपट्टी करून आपण किती गाठोड जमवलं आहे आणि किती खरं ज्ञान आहे. म्हणजेच तुम्ही लिहिलेलं किती मनाने,मनापासून आणि जाणिवेतून लिहिलेलं आहे. किती फक्त गुण मिळवण्या साठी लिहिलय आणि किती स्वतः ज्ञान प्राप्ती साठी आणि प्राप्तीतून लिहिलेलं आहे.
यातून एक गोष्ट कळली का, विधात्याला हेच अपेक्षित असतं की कर्मफल साखळीच्या या अनेक जन्माच्या श्रृंखलेतील आपल्या संचित व प्राप्तरुप आत्मपरीक्षेत, आपण खरच मनापासून बाहेर पडण्यासाठी मनाने प्रयत्न करू इच्छितो, किती प्रयत्न आपण फक्त संकटं टाळण्या साठी, दुःखाच्या, भोगांच्या परीक्षा टाळू इच्छितो का, की परिस्थितीचे ते आव्हान, आपण हसत पार पाडतो, न टाळता त्यांना सहजी सामोरे जातो आणि आपल्या कर्मात आपण लिहिलेलं, आपल्या समोर आल्यावर, आपण त्यांना आपली जबाबदारी मानून स्वीकारतो, हे या गोष्टीतून समजून घेण्यासारखं खरं मुख्य सार आहे.
आता या सर्वांशी मायेचा काय आणि कसा संबंध आहे, हे उद्याच्या भागात जाणून घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment