अध्यात्म विराम १०६
रामजन्म हा अनेक अर्थानी अलौकिक जन्म आहे. मर्यादांचे, नियमांचे अनेक गुणदर्शनाचे रसाळ व्यक्तित्व म्हणजे प्रभू श्रीराम. स्वतः प्रत्यक्ष श्री महाविष्णू यांचा अवतार असूनही आपण मानवी देहाच्या, धर्माच्या सर्व बंधनांच मर्यादा पालन करत, रावण वध घडवून आणला. त्यासाठी नर आणि वानर यांचा अद्भुत मिलाफ घडवला. या दोन जीवांना,खिजगणतीत न धरता,रावणाने आपल्या वरदानातून यांना बाजूला केलं होतं. हा मायेचा प्रभाव आहे. याच त्याच्या मदाचा,उन्मत्तपणाचा लाभ घेण्या साठी घडून आलेला जन्म म्हणजे श्रीराम.
काल म्हटल्या प्रमाणे प्रभूंच्या जन्माच्या आधीपासूनच किंवा शिवशंकर समाधीत रममाण होताना श्रीराम यांच्याच नामाचं उच्चारण करतात. महादेवाचं अस्तित्व हे विष्णूंनी आपल्या संकल्पनेतून घडवलं, अशी मान्यता आहे. तरीही शिवांचा आदी हा अज्ञात आहे. आता प्रभू श्रीराम यांनी राम जन्मात, लंकेत जाण्यासाठी सिद्धता करत असताना, मार्ग मिळावा आणि आपण योजलेल्या कार्यात विजय प्राप्ती व्हावी यासाठी, सागर किनारी शिवांची स्थापना केली. प्रत्यक्ष श्री महाविष्णू, रुद्राच्या अर्थात भगवान शिवलिंगाची स्थापना करून, त्यांच्या पूजनाने आपल्या कार्याला आरंभ करतात. यामधे नक्कीच काही संकेत भक्तांसाठी आहे.
एक गोष्ट कोणत्याही अवताराबाबत, ध्यानात घेतली पाहिजे की, त्या अवतारात, प्रत्येक कृतीत, काही संदेश, काही बोध आणि काही आदर्श असतोच. याच प्रमाणे, प्रभू श्रीराम यांनी शिवपूजन करून,श्री रामेश्वर हे ज्योति र्लिंग स्थापना करून, एक आदर्श घालून दिला आहे. अर्थात श्रीराम ज्यांचं पूजन, चिंतन व ध्यान शिवशंकर करतात, त्यांचं पूजन व स्मरण श्रीराम करतात. यातून हा बोध व संदेश भक्तांसाठी नक्कीच दिला आहे की, स्वरूपात हे दोन भिन्न भासले तरी तत्वरुपात दोन्ही एकरूप आहेत.
म्हणजेच आपण बाह्य स्वरूपात शिव व विष्णू हे दोन भिन्न मानले तरीही, अंतरी दोन्ही एकच आहेत. त्यायोगे नानाविध रुपात प्रकट झालेला हा विश्व रूप पसारा, अंतरंगी एकाच तत्वाचं सगुण रूप प्रकटीकरण आहे. त्यामुळे पांडुरंग रुपात प्रकट झालेल्या या स्वरूपात विश्वात्मक विश्वशक्ती एकच आहे, जी चराचरात व्याप्त आहे. पण ही भिन्न का भासते आणि आपल्याला वेग वेगळ्या स्वरूपात पूजनाची बुद्धी का होते, याचा विचार व चिंतन आपण करूया. त्यानंतर आपल्याला द्वैत अद्वैत यांचा उगम आणि भेदाभेदातून भासणाऱ्या भिंन्नत्वा पलीकडे एकच तत्व प्रकाशित आहे आणि तेच भागवत धर्माचं खरं मर्म आहे, हे लक्षात येईल.
अनेकातून एकता आणि एकतेतून अनेकता, या तत्वानुसार ब्रम्ह, शिव व ब्रम्हांड यांची रचना, एकाच विश्वात्मक शक्तीने केली. हे भिन्न रुपात प्रकट होणं, हा पुरुषोत्तम शक्तीच्या आदिरुपातील मायेचा खेळ आहे. विश्व प्रकट झालं,त्याधी माया प्रकट झाली. त्या मायेच्या प्रभावाने, भिन्नता प्रतीत होते, दृष्टीस भासते. ही माया सर्व विश्वाला प्रकाशित करते आणि विश्व व्यापून कार्य करते. भावभावनांचे खेळ, मनातील लहरींचे, भासांचे, अभासांचे, सत असत यांच्या खेळाचे, जन्म मृत्यूचे, देहाच्या भिन्नत्वाचे, कर्माचे सर्व गणित व त्यांची साखळी जीवाला देहाच्या बंधनात बांधते.
एकदा जीव देहात आल्यापश्र्चात, माया, त्या जीवाच्या भोवती असलेल्या, काया वाचा यांचा, बुद्धीचा, मनाचा ताबा घेऊन, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या प्रभावात ठेवून, सर्व कार्य करवून आणते. मायेच्या या कार्याचा पसारा आपण उद्याच्या भागात पुढे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत मायेच्या निर्मात्याला स्मरत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment