अध्यात्म विराम ९६
देहाच्या बाबतीत आपल्या हिताच्या आड येणाऱ्या अनेक गोष्टी आपण, भावनिक न होता, बाजूला सारून पुढे जातो. कारण अनेकदा आपल्याला त्यातील भौतिक प्रगती, विकास व लाभ दिसत असतो किंवा जाणिवेत असतो. आत्मिक प्रगतीच्या या द्वैतावर किंवा या संघर्ष काळात, बुद्धी, प्रेराणा वा चेतना ही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, हे आपण पाहिले. अनेक गोष्टीतून पुढे जाणारा हा संघर्ष जन्मोजन्मीचं हित आहे आणि ते साधलं पाहिजे, ही सुप्त आत्मजागृतीची जाणीव करून देतो. म्हणजेच आपले आत्महित कशात आहे,याची जाण येऊन,तसं करण्याची इच्छा व क्रिया यांच्या संयोगातून घडतं. कोणत्याही बाबतीत तयार उत्तरं, जीवनात नसतात. या बाबत सुद्धा, तीच स्थिती असते.
इथे आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, भौतिक जगतात प्रगती व लाभ यांसाठी आपण, प्रसंगी भावना बाजूला ठेवून, अनेकदा जसे, दृढ व संयमी निर्णय घेऊन, ते अंमलात आणतो, तसे निर्णय किंवा तशी दृष्टी ही आपल्याला आत्मिक प्रगतीत दिसत किंवा दृष्टीत येत नाही. याचं महत्वाचं कारण, देहाची दृढ भावना, देह म्हणजेच मी, ही वृत्ती व दृष्टी, भौतिक जगत हा परीघ सोडू देत नाही.
पण अशी किंवा त्या मार्गाची दृष्टी आणि वृत्ती असलेले, सद्गुरू नामक ईश्वर प्रतिनिधी, देहरुप धारण करून, ईश्वराच्याच प्रेरणेने व कृपेने, या भूतलावर देहात व देहापश्र्चात चैतन्यमय स्वरूपात या लोकी, वास करत असतात. यांना प्रत्येक जीवात्म्याचा अध्यात्मिक विकास, प्रगती व गती, यांचा आलेख ज्ञात असतो व तो तपासून, त्यां जीवांना, आत्मिक प्रगतीच्या विशिष्ट टप्प्यांवर, विशिष्ट समयी, अनेक रुपात सहाय्य करतात. म्हणजेच त्या प्रत्येक जीवाच्या, हिताची चिंता करतात आणि त्यांच्या हिताचा भार वाहतात.
याच हिताच्या भार वाहनात, सद्गुरू किंवा ईश्वर प्रसंगी, आत्मिक प्रगतीच्या आड येणाऱ्या भौतिक भावनिक गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. कारण तसं न केल्यास,त्या देहातील आत्म्याचा विकास खुंटतो किंवा त्यात बाधा निर्माण होऊ शकते. काही भोग हे भोगून संपवणं, जीवाच्या हिताचं असतं. म्हणून आपण अनेक प्रसंगांत भोग भोगत असताना, त्यावेळी, जर ईश्वर किंवा सद्गुरू यांना ज्ञात असेल, की हे भोगून संपवणं, त्या आत्म्याच्या हिताचं आहे, तर त्या प्रसंगात आपल्याला नैतिक व आत्मिक बळ देऊन, त्या प्रसंगात धीराने बाहेर पडण्यासाठी ते नक्की अप्रत्यक्षरीत्या सहाय्यभूत होतात.
म्हणजेच आपल्या आयुष्यातील भौतिक व आत्मिक द्वैतात, आपण आत्ममार्गी होऊन, किंवा ईश्वर व सद्गुरू यांच्यावर निष्ठा पूर्वक,श्रध्देने,विश्वास ठेऊन,पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कारण कधीकधी देह झिजवून, देहाला कष्टवून आत्महित साधण्याचा विशाल, दूरगामी दृष्टी व दृष्टिकोन सद्गुरू व ईश्वर आपल्याला संकेत रुपात सांगत असतात. अश्या अनेक प्रसंगी, आत्मिक बुद्धीचा वापर करून, देह व त्या देहाभोवती गुंतलेली, बुध्दी व मन यांना आवर घालणे, हितावह ठरते.
म्हणजेच यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, दूरगामी विचार करणारे ईश्वर व सद्गुरू हे आपले खरे हीतेशी आहेत किंवा असतात. म्हणजेच हित पाहणारा, कोणत्या दृष्टीने व जाणीवेने आपल्याला प्रत्यक्ष वा सांकेतिक भाषेत व स्वरूपात सहाय्य करत आहेत वा असतात,हे जाणण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यासाठीच हित या शब्दाचा खरा अर्थ,समजून व जाणून घेऊन, तद्नंतर योग्य अयोग्य याचा निर्णय घेतला पाहिजे.
या बाबतीत, विधीचे, सद्गुरुंचे सांकेतिक संदेश वा प्रासंगिक परिभाषेत केलेलं सहाय्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यासाठी आत्मिक बुद्धी जागृत झाली पाहिजे. याच विषयाला उद्याच्या भागात पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment