अध्यात्म विराम ११५
जाणिवांचा विषय खूप गहन आणि क्लिष्ट आहे, हे मागे मी म्हटलं आहेच. म्हणूनच शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जाणिवांचा गुंता तपासणं हे खूप जिकिरीचं काम आहे. यासाठीचे तज्ञ याची तपासणी करू शकतात आणि तुमची स्थिती जाणून घेऊ शकतात व त्यानुसार मार्गदर्शन करू शकतात. पण हे तज्ञ म्हणजे देहात किंवा देहातीत असलेले, चैतन्य शक्ती जागृत असलेले आणि ईश्वराची असीम कृपा प्राप्त झालेले साधू, सद्गुरू, संत महंत होत. आपण अजून पर्यंत तीनच जाणिवांची जुजबी माहिती घेतली. त्याच्या कार्याबद्दल आपण विस्ताराने नंतर पाहू.
आता भौतिक, सामाजिक या जाणिवांचा विचार करूया. भौतिक आणि सामाजिक असे दोन वेगळे मांडण्याचं कारणच तसं आहे. भौतिक म्हणजे साधारण आपल्या बाजूची भौगोलिक,परिस्थिती. ज्यामधे खगोलीय, राजकीय, इत्यादी अनेक प्रकारच्या परिस्थितीच्या जाणीवा समाविष्ट होतात. आपण आजूबाजूच्या अनेक प्रकारच्या बदलांना सामोरे जातो. त्याबाबत आपल्या क्रिया व प्रतिक्रिया या प्रकारात येतात. मुळात यातील बऱ्याच गोष्टींवर आपला प्रभाव नसतो आणि त्यातील बहुतांशी आपण प्राप्त परिस्थिती म्हणून स्वीकारून पुढे जायचं असतं. म्हणूनच या प्रकारच्या जाणिवा आपल्या गत आणि सांप्रत परिस्थिती प्रमाणे विकसित किंवा संकुचित होतात.
सामाजिक जाणिवांचे विश्व हे कुटुंब, मित्रमंडळी, यामधे विभागलेले आहे. आता बदललेल्या काळाप्रमाणे, गाडी, रोजचं कार्यालयातील, शाळा कॉलेज मधील विश्व यांचा सुद्धा समावेश होतो. सामजिक जाणीवा या आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती नुसार आकुंचित किंवा प्रसारीत होतात. बहुतेकवेळा सामाजिक परिस्थिती ही, राजकीय परिस्थिती नुसार बदलत जाते किंवा तयार होते. त्यामुळे अनेकदा सामाजिक आणि भौतिक जाणीवा या सहसा एकाच पातळीला असतात. म्हणूनच आपण विचार करताना या दोन्ही जाणिवांचा एकत्रित विचार करुया.
या दोन जाणिवांची जुजबी ओळख करून घेतल्यावर आता तिसरा जाणिवांच्या गटाचा विचार करूया. नैतिक आणि अध्यात्मिक या दोन जाणीवा, जाणिवांच्या स्तरात सर्वात शेवटी किंवा खाली येतात. याचं कारण सुद्धा तसच आहे. या जाणीवां शिवाय या भौतिक जगतात आपलं सहसा आडत नाही, असा आपण आपला समज करून घेतला आहे. किंवा आपल्याला त्याबद्दल फार आग्रहाने सांगितलं जातं नाही. किंवा त्याला बऱ्याच प्रमाणात आपली धर्माबद्दल निष्ठा आणि श्रद्धा या कारणी भूत आहेत. म्हणूनच ज्या जाणीवा वास्तविक सर्वात वरच्या स्तरावर असल्या पाहिजेत,त्या आपल्या, विशेषतः हिंदू धर्मात सर्वात शेवटच्या स्तरावर आहेत किंवा असतात
या सर्व जाणिवांची मूलभूत तोंडओळख करून घेतली. आता या जाणिवांचा खोलात जाऊन अभ्यास सुरू करूया. म्हणजे त्याबद्दल आपल्या मनात असलेले ग्रह, न्यूनगंड, समज, अपसमज, गैरसमज कमी होऊन, आपल्याला योग्य असलेल्या जाणिवांचा आपण प्रयत्न पूर्वक विकास करून घेऊ शकतो. अश्या सर्व जाणीवा, ज्या आपल्याला सरतेशेवटी अध्यात्मिक उन्नती साठी आवश्यक आहेत, त्यांचा विकास करता येईल.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment