Skip to main content

अध्यात्म विराम ११४

अध्यात्म विराम ११४

खरतर जाणीवा हा विषय एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. पण महाराज कृपेने आपण तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण या जाणिवांच्या किचकट आणि अत्यंत क्लिष्ट विषयावर आपल्याकडे कोणतेही, आधारभूत साहित्य फारसे उपलब्ध नाही. पण येणाऱ्या काळासाठी,याचा खूप उपयोग होईल,हे जाणून महाराजांनी हा विषय मांडायचं योजलं असावं. कारण जश्या आपल्या देहात मज्जासंस्थेचं जाळ आहे, तसच किंवा त्याहूनही गुंतागंतीचं गुह्य या जाणिवांच्या जगताचं आहे. पण ते जाणल्याशिवाय आपण अध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ शकणार नाही, असा महाराजांचा होरा असावा. असो विषय पुढे नेऊया. 

शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जाणीवा गर्भात ते साधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत विकसित होत असाव्यात आणि तिथून पुढे त्या प्रगत होत असाव्यात.याचं महत्वाचं कारण आपल्या धर्मशास्त्रानुसार वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत घडलेल्या अनुचित कर्माचं फल किंवा पाप गणलं जात नाही.आपलं धर्म शास्त्र पूर्ण वैज्ञानिक दृष्टीने संशोधित केलेले आणि लिहिलेले आहे. याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत जाणिवांची जागृती पूर्ण होत असावी. याचाच दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की, पौगंडावस्थेची पाहिली पायरी, इथे सुरू होत असावी आणि ती शारीरिक वाढीसह पंधरा ते सोळा वर्षा पर्यंत पूर्ण होत असावी. 

शारीरिक जाणिवांची केंद्रं मुख्यतः मस्तिष्क अर्थात मेंदूत असतात आणि त्यांचं सूत्रसंचालन मज्जासंस्था व चेतापेशी यांच्या मार्फत होतं. मेंदूतून आलेले वेगवेगळे संदेश अनेक प्रकारच्या स्त्रावांच्या स्वरूपात, आज्ञा प्राप्त करून, त्या त्या इंद्रियांना, अवयवांना कार्यरत करतात किंवा कार्यास लावतात. तसा हा विषय शरीर शास्त्राचा आहे, त्यामुळे आपल्याला इतकी जुजबी माहिती पुढे जाण्यास पुरेशी आहे. मस्तिष्क अर्थात मेंदू हा मानवी संगणक आहे. त्याचा विकास साधारण गर्भात पाच ते सातव्या महिन्यापासून सुरू होतो. बुद्धीच्या अनेक प्रकारच्या जाणिवांची जागृती ही मेंदूच्या विकासाचा भाग आहे. त्यामुळे बौद्धिक गरजा व त्यांच्या जाणिवांची जागृती जशी असेल त्यानुसार त्या व्यक्तीचा बौद्धिक विकास होतो. किंवा मेंदूच्या विकासावर, पुढील जीवनातील अनेक गोष्टी घडतात व होऊ शकतात.

तिसरी मूळ जाणीव म्हणजे मानसिक जाणीव. यांची उत्पत्ती, विकास आणि प्रगती ही बऱ्याच अंशी संचित व प्रारब्ध यावर अवलंबून असते. मानसिक जाणिवांच्या वाढीला, बौद्धिक व शारिरीक जाणिवांच्या जागृतीची वाढ, सहाय्यक व कारणीभूत असते किंवा असू शकते. मनातील विचारांची आंदोलनं, भावभावना, त्यानुसार मनाच्या क्रिया व प्रतिक्रिया आणि त्यांचं बुद्धी व देह यांच्या माध्यमातून झालेलं प्रकटीकरण, हे सर्व मानसिक जाणिवांच्या जागृती आणि विकास यांच्या श्रेणिवर अवलंबून आहे. 

प्रत्येक कर्म अर्थात क्रिया आणि प्रतिकर्म अर्थात प्रतिक्रिया ही देह, वाचा, बुद्धी आणि मन यांच्या संतुलनावर अवलंबून आहे. पर्यायाने हे संतुलन संचित, वर्तमान कर्म व मायेच्या सहाय्याची स्थिती यांवर अवलंबून आहे. म्हणजेच प्रत्येक क्षण आपली अर्थात आपल्या जाणिवांची परीक्षा आहे आणि असते. 

विषय मोठा असल्यामुळे, उद्याच्या लेखात हा पुढे मेऊया. तोपर्यंत विश्व विधात्याच्या या सर्व सृष्टीतील आपल्या स्थाना बद्दल त्याचे आभार मानून, स्मरण करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...