अध्यात्म विराम ११४
खरतर जाणीवा हा विषय एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. पण महाराज कृपेने आपण तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण या जाणिवांच्या किचकट आणि अत्यंत क्लिष्ट विषयावर आपल्याकडे कोणतेही, आधारभूत साहित्य फारसे उपलब्ध नाही. पण येणाऱ्या काळासाठी,याचा खूप उपयोग होईल,हे जाणून महाराजांनी हा विषय मांडायचं योजलं असावं. कारण जश्या आपल्या देहात मज्जासंस्थेचं जाळ आहे, तसच किंवा त्याहूनही गुंतागंतीचं गुह्य या जाणिवांच्या जगताचं आहे. पण ते जाणल्याशिवाय आपण अध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ शकणार नाही, असा महाराजांचा होरा असावा. असो विषय पुढे नेऊया.
शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जाणीवा गर्भात ते साधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत विकसित होत असाव्यात आणि तिथून पुढे त्या प्रगत होत असाव्यात.याचं महत्वाचं कारण आपल्या धर्मशास्त्रानुसार वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत घडलेल्या अनुचित कर्माचं फल किंवा पाप गणलं जात नाही.आपलं धर्म शास्त्र पूर्ण वैज्ञानिक दृष्टीने संशोधित केलेले आणि लिहिलेले आहे. याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत जाणिवांची जागृती पूर्ण होत असावी. याचाच दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की, पौगंडावस्थेची पाहिली पायरी, इथे सुरू होत असावी आणि ती शारीरिक वाढीसह पंधरा ते सोळा वर्षा पर्यंत पूर्ण होत असावी.
शारीरिक जाणिवांची केंद्रं मुख्यतः मस्तिष्क अर्थात मेंदूत असतात आणि त्यांचं सूत्रसंचालन मज्जासंस्था व चेतापेशी यांच्या मार्फत होतं. मेंदूतून आलेले वेगवेगळे संदेश अनेक प्रकारच्या स्त्रावांच्या स्वरूपात, आज्ञा प्राप्त करून, त्या त्या इंद्रियांना, अवयवांना कार्यरत करतात किंवा कार्यास लावतात. तसा हा विषय शरीर शास्त्राचा आहे, त्यामुळे आपल्याला इतकी जुजबी माहिती पुढे जाण्यास पुरेशी आहे. मस्तिष्क अर्थात मेंदू हा मानवी संगणक आहे. त्याचा विकास साधारण गर्भात पाच ते सातव्या महिन्यापासून सुरू होतो. बुद्धीच्या अनेक प्रकारच्या जाणिवांची जागृती ही मेंदूच्या विकासाचा भाग आहे. त्यामुळे बौद्धिक गरजा व त्यांच्या जाणिवांची जागृती जशी असेल त्यानुसार त्या व्यक्तीचा बौद्धिक विकास होतो. किंवा मेंदूच्या विकासावर, पुढील जीवनातील अनेक गोष्टी घडतात व होऊ शकतात.
तिसरी मूळ जाणीव म्हणजे मानसिक जाणीव. यांची उत्पत्ती, विकास आणि प्रगती ही बऱ्याच अंशी संचित व प्रारब्ध यावर अवलंबून असते. मानसिक जाणिवांच्या वाढीला, बौद्धिक व शारिरीक जाणिवांच्या जागृतीची वाढ, सहाय्यक व कारणीभूत असते किंवा असू शकते. मनातील विचारांची आंदोलनं, भावभावना, त्यानुसार मनाच्या क्रिया व प्रतिक्रिया आणि त्यांचं बुद्धी व देह यांच्या माध्यमातून झालेलं प्रकटीकरण, हे सर्व मानसिक जाणिवांच्या जागृती आणि विकास यांच्या श्रेणिवर अवलंबून आहे.
प्रत्येक कर्म अर्थात क्रिया आणि प्रतिकर्म अर्थात प्रतिक्रिया ही देह, वाचा, बुद्धी आणि मन यांच्या संतुलनावर अवलंबून आहे. पर्यायाने हे संतुलन संचित, वर्तमान कर्म व मायेच्या सहाय्याची स्थिती यांवर अवलंबून आहे. म्हणजेच प्रत्येक क्षण आपली अर्थात आपल्या जाणिवांची परीक्षा आहे आणि असते.
विषय मोठा असल्यामुळे, उद्याच्या लेखात हा पुढे मेऊया. तोपर्यंत विश्व विधात्याच्या या सर्व सृष्टीतील आपल्या स्थाना बद्दल त्याचे आभार मानून, स्मरण करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment