श्रीकृष्णनीती भाग१६
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ ही म्हण आपण ऐकली आहे आणि वाचली आहेच. मुळात प्रणाशी गाठ म्हणजे जे असंगाच्या संगतीत नाहीत ते अमर आणि असंगाशी संग करणारे मरणार इतका सोप्पा अर्थ अभिप्रेत नाही , हे नक्की. याचा जो अधोरेखित आणि गूढार्थ असा आहे तो हा की, असंगाच्या संगतीत राहिलात तर जो शेवट त्या असंगाला त्याच्या कर्माने येणार आहे वा येणे प्राप्त आहे, तोच वा तसाच शेवट हा त्याच्या संगतीने तुम्हाला प्राप्त होतो.
फक्त संगतीचा परिणाम इतका भयानक आहे, तर मग त्याच्या कृत्यातील तुमचा सहभाग किती भयानक आणि निष्ठुर मृत्यू पदरात देईल, याचा विचार केलेला बरा. नियती जेंव्हा फिरते तेंव्हा देव व दैव यातील काहीही कामाला येत नाही. तर आपल्या विहित कर्मानेच ते ठरतं. पण त्याआधी तीच नियती सावरण्याची संधी देतेच देते. जशी तिने कर्णालासुद्धा दिली होती. दहा दिवस युद्ध असून नुसतं बसवून ठेवून आणि आदल्या रात्री कुंती रूपात नियती समोर येऊन उभी राहिली.
पण माणसाची मानसिक स्थिती ढासळली की त्याची विचार करण्याची शक्ती क्षीण होते आणि नीती अनीती यातील भेद करण्याचा विवेक हरवला जातो. कर्णाच्या याच, दुर्योधनाला आंधळी साथ देण्याच्या, स्वभावामुळेच पितामह भीष्म कधीही त्याच्याशी नीट वागले नाहीत व त्याला कधीही सन्मान दिला नाही.
कारण त्यांच्या दृष्टीने तो करत असलेलं कृत्य व कौरवांना तो देत असलेली साथ ही विनाशाची, अधोगतीची सुरवात आहे हे ते जाणून होते.ते हेदेखील जाणून होते की, कर्णाला त्याच्या वकुबापेक्षा जास्त सन्मान दुर्योधन निव्वळ पांडव विरोध म्हणून देत आहे आणि या गोष्टीला त्यांची कधीही एक महावीर म्हणून मान्यता असू शकत नाही.
श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून कर्णाचं महत्व अर्जुनाच्या जीवाला असलेला धोका अर्थात एक उपद्रवमूल्य म्हणून होतं. कर्ण, द्रोण आणि भीष्म असतानासुद्धा विराट युद्धात एकट्या अर्जुनाने सर्वांना पाणी पाजलं होतं, हे कृष्ण जाणून होता. परंतु कवचकुंडले इंद्राला दान देण्याच्या बदल्यात, कर्णाला मिळालेलं इंद्रअस्त्र हाच एक मुख्य चिंतेचा विषय होता, श्रीकृष्णाच्या दृष्टीने. ती भीती घटोत्कचाच्या रुपात नियतीने साधून इंद्रास्त्र त्याला वापरावं लागलं. ब्रम्हास्त्र भगवान परशुरामांच्या शापाने त्याला आठवणार नाही, हे श्रीकृष्णाला माहीत होतं.
महा भारताच्या संपूर्ण युद्धात आचार्य पितामह भीष्म यांनी कर्णाला आपल्या नेतृत्वाखालील सेनेत सहभागी करून घेण्याचं नाकारलं, त्याचं हेदेखील एक महत्वाचं कारण असावं की त्यांचे गुरू भगवान परशुराम यांचा रोष, यांनी दिलेला शाप आणि कर्णाचा पाशवी व खुनशी स्वभाव.
श्रीकृष्णाने कर्णावर कोणतीही दया न दाखवता अर्जुनाला, रथाचं अडकलेलं चाक बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या कर्णाला, बाण मारण्याची आज्ञा यासाठी दिली की अभिमन्यूच्या हत्येत तो सहभागीच नाही तर मुख्य सल्लागार आणि कार्यकर्ता होता, अभिमन्यूला निर्दयीपणे मारण्याचा कट रचण्यात. ज्याची कदाचित जी मिळाली ती अत्यंत सहज आणि सोप्पी शिक्षा कर्णाला मिळाली.
म्हणूनच अभिमन्यू हत्येत सहभागी असलेले चार मुख्य सूत्रधार दुर्योधन , कर्ण, गुरू द्रोण आणि जयद्रथ येनकेन प्रकारेण संपवण्यासाठी कृष्णाने प्रत्यक्ष सहभाग घेतला, शस्त्र न उचलता, तरीही महत्वाची भूमिका बजावून, मुख्य सूत्रधार बनून.
हीच श्रीकृष्णनीती आहे. अश्या प्रकारचे दुरात्मे संपवणं हा मुख्य उद्देश होता श्रीकृष्ण जन्माचा आणि त्यांनी तो साध्य केला. आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ प्रसंगी आपले वचन देखील मोडून, हाती शस्त्र घेण्याची तयारी ठेवणारे भगवंत म्हणजे श्रीकृष्ण. भक्तरक्षणाचं ब्रीद हेच महत्वाचं, त्यासाठी मार्ग अडवळणाचा असेल तरी बेहत्तर, पण धर्म मरता उपयोगी नाही. धर्म कोणत्याही मुल्याने व मार्गाने टिकणे महत्वाचं.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
१८/०५/२०२०
भाग षष्ठदश समाप्त
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ
Comments
Post a Comment