Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग २६

श्रीकृष्णनीती भाग २६
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली, त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे सख्खे मामा,यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियम भंगाची खरी सुरवात, कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला. 

त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विषद केलं. परंतु बाह्य गुण धर्माला आणि सैन्य संख्या यांना महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं महत्व वाटलंच नाही. 

कारण गुणांपेक्षा संख्येला महत्व देणारा दुर्योधन हा खरतर युद्ध इथेच हारला होता. फक्त त्याचा निर्णय कुरुक्षेत्रावर लागला. कारण जगाचा नियंता आणि जगत्पालक या नात्याने धर्म आणि न्याय ज्या बाजूला आहे त्याच बाजूला विजय मिळणं हा अंतिम उद्देश ठेवून, रणांगणावर उतरलेला श्रीकृष्ण, जरी प्रतिज्ञाबद्ध होता, शस्त्र न उचलण्यास, तरी वास्तविक अर्थाने बुद्धीचं शस्त्र अस्त्र आणि साधनं यांचा खरा वापर श्रीकृष्णानेच केला. 

एका अर्थाने पारंपारिक शस्त्र म्हणजे खरं शस्त्र हा समज श्रीकृष्णाने इथे खोटा ठरवला आणि हा नवीन मापदंड आणि राजनीती व कूटनीती चा नवीन अध्याय घालून दिला की, शस्त्र अस्त्र आणि सैन्य संख्या म्हणजे विजय नव्हे. तर डावपेच, शत्रूच्या कमजोरी व त्याचं मर्म जाणून, त्यानुसार अस्त्र शस्त्र वापर करावा. अन्यथा कौरव सैन्य अकरा अक्षौहीणी आणि पांडव सैन्य फक्त सात अक्षौहीणी होतं. संख्या नव्हे डावपेच महत्वाचे असतात. अन्यथा भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन असे अनेक महारथी असलेलं सैन्य हरलच नसतं. 

त्यामुळे फक्त सत्य धर्म यांच्या बाजूने असून उपयोगी नाही, तर शहाला काटशह आणि डावाला प्रतिडाव असलाच पाहिजे. म्हणूनच पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, यादव, असे अनेक महारथी असलेला हा देश पारतंत्र्यात गेला नसता. यात एकच नाव हे श्रीकृष्ण पद पथावर जसच्या तसं गेलं त्यामुळे यशस्वी होऊन, धर्म रक्षण करू शकलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 

पितामह भीष्म आपल्याच प्रतिज्ञा व्यूहात अडकून गुरफटून गेलेले. किंबहुना प्रतिज्ञा पालन हा एककलमी कार्यक्रम त्यांनी केला वा त्यांनी जीवनाचं सूत्र मानलं. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या या प्रतिमेत स्वतःला जखडून घेतलं, ज्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे, असं त्यांच्या आत्म्याने मानलं. खरतर त्यांची प्रतिज्ञा हस्तिनापूरच्या रक्षणाची होती आणि त्या हस्तिनापूरच्या राज्यावर जो राजा बसेल त्याला साथ देणं वा त्याच्या आदेशांचे पालन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. 

परंतु जर तो राजा, हस्तिनापूरच्या हिताविरुद्ध निर्णय घेऊन ते भीष्मांवर लादत असेल, तर हस्तिनापूरच्या हित रक्षणार्थ, असे आदेश झुगारून, तिथे हस्तिनापूरचं हित जपणारा राजा बसवणं, हे देखील त्यांच्या प्रतिज्ञेचा प्राण होता. तो प्राणच त्यांनी घालवला वा त्या प्राणाचाच गळा घोटला. ज्याचा परिणाम हा त्यांच्या स्वतःच्या अंतात झाला. जे संयुक्तिक होतं आणि अपरिहार्य सुद्धा. . 

हे त्यांनी देखील जाणलं परंतु तोपर्यत त्यांनी स्वतःला प्रतिज्ञेच्या व्यूहात अडकवलं होतं आणि त्यांनी हे जाणलं त्यावेळी युद्धाचे नऊ दिवस उलटून गेले होते. हा व्यूह कसा तुटणार हे फक्त दोनच जण जाणत होते. ते म्हणजे श्रीकृष्ण आणि स्वतः भीष्म. याच कारण म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञेला जोडलेलं इच्छा मरणाचं वरदान. जे खरतर त्या समयी, ते वरदान एक शाप जाहलं होतं. यातून बाहेर पडणं, हे त्यांच्या स्वतःसाठी दुरापास्त होतं. हे जाणूनच कृष्णाने त्यांनाच याचा उपाय विचारला, जो इतक्या सहजी त्यांनी सांगितला. पण हे इतकं सहजी व्हायला भीष्माचं कार्यकर्तृत्व किती श्रेष्ठ आहे वा त्यांचं स्थान किती भक्कम आहे हे विशद करणारा एक प्रसंग युद्धात आठव्या दिवशी घडला.  

ज्यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वतः सारथ्य सोडून सुदर्शन चक्र घेऊन भीष्मांच्या अंगावर धावून गेला होता. हे फक्त अर्जुन श्रीकृष्ण आणि भीष्म स्वतः जाणत होते. या ठिकाणी भीष्मांना समजलं कि, आपण धर्म आणि अधर्म यांच्या लढाईत परम ईश्वराच्या विरुद्ध गेलो असूनसुद्धा संयमाने श्रीकृष्णाने स्वतःचे हात बांधून ठेवले आहेत. अन्यथा भीष्मांना सुदर्शनचक्र सहजी संपवू शकते हे त्यांनाही माहित होतं. कारण जो निर्माता असतो त्याला संपवणं येतच. म्हणून त्या प्रसंगात भीष्मांना आपल्या आयुष्याची इतिश्री झाली हे कळून चुकलं आणि युद्धानंतर रात्री त्यांना भेटायला गेलेल्या अर्जुन आणि श्रीकृष्णाला त्यांनी आपल्या शस्त्र खाली ठेवण्याचा उपाय सांगितला. 

श्रीकृष्णाचं महत्व यासाठी अत्याधिक जाणवतं कि, प्रत्येक व्यक्तीच्या चुकांची जाणीव असून आणि त्याला आपण विधाता म्हणून वा योद्धा म्हणून सहजी संपवू शकतो हे जाणूनसुद्धा, त्यांनी ती मर्यादा कधीच ओलांडली नाही. अर्थातच हे कार्य त्या त्या व्यक्तीकडूनच करवून घेतलं. मला स्वतःला यासाठी श्रीकृष्णाचं जीवन आदर्श वाटतं. जरासंधाचा वध भीमाकडून, भीष्म व कर्ण यांचा मृत्यू अर्जुनाच्या हातून, द्रोणाचार्याना भीमाकरवी खोटी बातमी पुरवून व शस्त्र खाली ठेवायला लावून, नन्तर दुष्टद्युम्नाच्या हातून संपवून आणि दुर्योधनाला भीमाच्या हातून संपवून, कर्माचं महत्व वा समीकरण प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. अर्थातच ज्यांच्यावर त्या त्या व्यक्तींकडून अन्याय झाला होता वा ज्यांच्याशी त्यांचं वैर बांधलं गेलं होतं त्यांच्याच हातून त्या त्या व्यक्तीचा अंत करवून आपण मात्र एका सल्लागाराच्या भूमिकेत वावरले. 

स्वतः सर्वशक्तिमान नव्हे तर सर्व शक्तींचा स्रोत असून सुद्धा आपला हात मागे ठेवून अर्जुन, भीम, युधिष्ठीर, अभिमन्यू, घटोत्कच या मानवी देहांनाच कार्य करण्यास प्रवृत्त केलं. यातून अजून एक संदेश दिला, जो पुढे जाऊन कलियुगासाठी प्रत्येकाला विशेष उपयोगाचा आहे कि, मग अगदी तो अर्जुन असेल तरी , स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. प्रत्यक्ष भगवंत सोबत असतील तरी, ते आता कार्य करणार नाहीत. फारतर तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकतील. पण लढणार नाहीत. ते कार्य मानव म्हणून वा योद्धा म्हणून तुम्हालाच करायचं आहे. 

मला वाटतं श्रीशंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारक अश्या अगणित सन्माननीय सर्वांनी हाच वसा पाळला. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन कि,हि गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवण्या साठी आहे कि, ईश्वरी शक्ती तुम्हाला सहाय्य करेल, शक्ती प्रदान करेल, वेळ प्रसंगी जयद्रथ वधाच्या वेळी घडलेला सूर्यास्तासारखा चमत्कार देखील करेल, पण प्रत्यक्ष कार्य वा कर्म तुम्हालाच करायचे आहे. कदाचित महाभारत युद्धातील श्रीकृष्णाचं शस्त्र हाती न घेण्याचं धोरण व संकल्प हा त्या अर्थाने प्रेरक , मार्गदर्शक आणि त्यांच्या कर्मफल सिद्धांताला शास्वतपणे स्थापित करणारा आहे. 

अजून एक गोष्ट जी मला जाणवते ती म्हणजे दश अवतारांचा आढावा घेतला तर उत्क्रांतीचा डार्विनचा सिद्धांत लागू होतो. प्रथम दोन अवतार जलचर, नन्तर वराह दोन्हीकडे वास करणारा, नरसिंह पशु आणि मानव यांचं अस्तित्व दर्शवणारा, मानवाचा छोटा अवतार वामन, ब्रह्मचारी आणि उग्र रूप श्रीपरशुराम जो प्रथम पूर्ण मानवी अवतार, नन्तर प्रभू रामचंद्र मर्यादांचं अतीव अमोल आणि अजोड दर्शन घडवून, स्वतः सर्व कार्य करणारा, नन्तर श्रीकृष्ण अवतार अर्जुनरूप मानवाच्या प्रतिनिधींकडून कर्म करवून घेणारा. 

उत्क्रांतीचा वरचा टप्पा म्हणजे कृष्णावतार, अनेक नवे सिद्धांत मांडणारा, अनेक जुने नियम मोडणारा, नवीन परिमाण जोडणारा, अनेक नवीन तत्वांना जन्म देणारा, कर्मावर पूर्ण विश्वास असणारा आणि मानवाला त्यावर विश्वास ठेवायला लावणारा व त्यासाठी गीतेचं अलौकिक तत्वज्ञान जगाला देणारा. मानवाचा खरा मित्र मार्गदर्शक. नर आणि नारायण याना प्रथम भूतलावर एकत्र उतरवणारा. 

श्रीकृष्णाचं महत्व महाभारत काळात आणि तदनंतरच्या काळासाठी उद्या पुढे पाहू. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
३१/०५/२०२०
भाग सव्हिसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...