अध्यात्म विराम ९४
हित आणि सखा यावर अजून सखोल आणि मुळापर्यंत जाऊन विचार करूया.
देहात असणारे आणि फक्त देहाचाच विचार करू शकणारे जीव, देहाचं हित म्हणजे सर्वश्रेष्ठ हित, असा अर्थ लावतात व त्यानुसार त्यांची मानसिकता, वर्तणूक असते. अशी संकुचित बुद्धी असलेले जीव. सहसा प्राण्यात आढळतात. हे अप्रगत जीव असतात. पण माणसातसुद्धा असे जीव आढळतात आणि तेही साधारण याचं वृत्तीचे असतात. कदाचित लक्ष लक्ष योनी पार करून, मानवी देहात आलेले आणि अध्यात्मिक पातळीवर अप्रगत किंवा काहीही दृष्टी,बुद्धी आणि विचार नसलेले हे जीव,अश्याच संकुचित वृत्तीने वर्षानुवर्षे जन्म जन्म या भूतलावर येतात, आपलं आयुष्य काढतात आणि मरणोपरांत, पुन्हा पुढील जन्मासाठी निघून जातात.
त्यांना जन्म आणि मरण या संकल्पनेशिवाय अन्य काहीही ज्ञात नसतं आणि आपलं जीवन सुरू आहे व जिवंत आहोत तो पर्यंतच खरं आयुष्य असतं किंवा आहे, इतकाच मनाचा विकास झालेले, हे जीव असतात. यांना जीवन जगण्यातील स्पर्धा हाच आपला प्रवास, हेच आपलं ध्येय हे ज्ञात असतं. जगण्याच्या, संघर्षाच्या परिघात कंठलं जाणारं आयुष्य, यापेक्षा जास्त काहीही मिळवायचं आहे, हे त्यांना ज्ञातच नसतं. किंवा त्याहून भिन्न काही जीवन असतं,हे त्यांना माहीतच नसतं.त्यामुळे यांच्या लेखी हित म्हणजे मी, माझं, माझ्या देहाचं आणि माझ्या प्रपंचाचं हित, तेच हित. ते जाणणारा खरा कर्ता आणि धर्ता इतकाच मनाचा परीघ असलेले हे जीव फक्त कर्म करतात आणि फल भोगण्यासाठी जन्माला येतात.
कदाचित प्रारब्ध आणि संचित यामुळे अत्यंत हालाखित किंवा अत्यंत वैभवात राहण्याचा योग, यांच्या भाग्यात येत असेल. पण वृत्ती आणि मानसिक संकूचितता तशीच असते. याहून थोडे प्रगत जीव असतात, ते जीवनात काही अन्य करायची, बुद्धीची थोडीशी जाण ठेवून जन्माला येतात किंवा प्रारब्धाच्या योगाने, या देहात आल्यावर त्यांना काही गोष्टींची जाण, बुद्धी व दृष्टी येते व जागृत होते. यांना ही जाण व हे ज्ञान, श्रवण भक्तिमार्ग द्वारे, कानातून, बुद्धीपर्यंत पोचून, जन्मोजन्मी सुप्त असलेला आत्मा थोडा जागृत होण्यास प्रारंभ झालेला असतो. यांना काय चूक आहे, याचं ज्ञान व त्या ज्ञानातून जाणीव जागृती, इतकं घडून, येण्याची प्रक्रिया या जन्मी घडली जाते.
अर्थात हा त्या श्रवण रूप भक्तीचा परिणाम असतो. या जन्मात झालेली ही जाणीव जागृती आणि ज्ञान प्राप्तीची सुरुवात, यांच्यातील, वृत्तीत इतकासा फरक घडवून आणते की,या जगताच्या पार काहीतरी आहे,जे आपल्या शक्ती, बुद्धी व दृष्टी यांच्या पार आहे. म्हणजेच जागृतीची ही सुरुवात हित कशात आहे, या जाणिवेची जागृती करेल की नाही, हे, सर्वस्वी त्यांच्या श्रवण, मनन व चिंतन यावर अवलंबून असतं. यातून किती आणि कितीपत प्रगती, या जन्मात होईल, हे प्रारब्ध आणि श्रवण व कीर्तन रूप भक्तीचा परिणाम, यावर ठरतं.
विषय खूप मोठा आणि थोडासा क्लिष्ट आहे, म्हणून हाच विषय उद्याच्या भागात सुरू ठेवूया. पण तोपर्यंत विधात्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त बुद्धीने, त्याचंच स्मरण करण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment