Skip to main content

श्रीकृष्ण नीति १३

श्रीकृष्ण नीति १३
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

काल पितामह भीष्म यांचा विचार केला. आज गुरू द्रोणाचार्य यांच्याबद्दल बघण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक महाभारत हे चुकांची मोठी थैली आहे. ज्यातून पुढच्या कित्येक पिढ्याना नव्हे कित्येक युगांना पुरेल इतकी देणगी या एका महाकाव्याने जगताला दिली आहे. आचार्य द्रोण एका गरीब कुटुंबातून आलेले होते. महर्षी भारद्वाज यांचे पुत्र असलेले आचार्य द्रोण, सर्व प्रकारच्या अस्त्र व शस्त्र कलेसह, अनेक शास्त्रांचे देखील उत्तम अभ्यासक होते.

पांचालनरेश राजा द्रुपद याच्याशी असलेल्या वैरामुळे आणि परिस्थितीमुळे सुरवातीला, अत्यंत हालाखीत काढलेले दिवस, गुरु द्रोण कधीही विसरले नाहीत. म्हणूनच अश्या काळात भीष्मांनी, पांडव आणि कौरव पुत्रांच्या शिक्षणासाठी दिलेलं गुरुपद, हे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत हे त्यांनी, आयुष्यभर लक्षात ठेवलं. परंतु यात ते हे विसरले कि,त्या उपकाराच्या ओझ्याखाली ते पूर्ण दबून कौरव विशेषतः दुर्योधन आणि शकुनी यांच्या प्रत्येक गैरकृत्यावर गप्प राहून, एकप्रकारे साथ देत आले. 

यात विशेष बाब म्हणजे ते महाराज धृतराष्ट्र यांच्या खास मर्जीतील व भीष्मांना सर्वात जवळचे असूनसुद्धा त्यांनी या चुकीच्या गोष्टींबाबत कधी सल्ला दिला नाही व प्रतिवाद केला नाही. वास्तविक पाहता गुरुपदी असल्या नंतर आणि दुर्योधन सरळ सरळ उपमर्द करत असल्या बद्दल ते महाराज धुतराष्ट्र यांना जाब विचारून, पद सोडून जाऊ शकले असते. विशेषतः द्रौपदी वस्रहरणानंतर हि संधी त्यांना उपलब्ध होती. कदाचित धुतराष्ट्रांवर हा चांगला दबाव ठरला असता. 

परंतु हे काही न करता वा आपल्या शिष्याने इतकी नीच पातळी गाठली असताना, त्या कृत्याच्या वेळी गप्प राहून एक प्रकारे त्या कृत्यात सहभाग घेतला, मुकपणाने पाठिंबाच दिला. त्याही आधी लाक्षागृहाच्या वेळी देखील, हि संधी त्यांना चालून आली होती. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून मिळालेल्या द्रुपदाच्या अर्ध्या राज्यात,त्यांचं स्वतःच स्थान निर्माण करून,ते त्याच कारणास्तव पद सोडू शकत होते. किंबहुना विद्यार्थी म्हणून कौरव व पांडव यांचं लौकीक शिक्षण संपून, गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचं अर्ध राज्य पांडवांनी मिळवून दिलं, त्याच क्षणी त्यांचं, गुरु म्हणून उत्तरदायित्व संपत होतं . तरीही इतर अनेक वेळा दुर्योधनाचं उद्दाम वर्तन आणि नीच व कपटी वागणूक, हे देखील उत्तम कारण होतं. त्याचं असं वर्तन हे त्याच्या पुढील वागणुकीचं द्योतक होतं . 

अश्या अनेक गोष्टी, खुणा वा घटना, सावरण्यासाठी नियतीने त्यांच्यापुढे मांडल्या असताना, त्यातून बोध न घेता, फक्त ऋणात राहून, त्याआधारे मानमरातब भोगणं, त्यांनी जास्त योग्य मानलं आणि हेच त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. कदाचित भीष्मांचा नैतिक दबावदेखील असू शकेल. कारण वर म्हटल्याप्रमाणे पांडव आणि कौरव यांचं शिक्षण पूर्ण होताच त्यांना निघण्याची संधी होती. परंतु सद्सद्विवेक बुद्धी राजदरबारी एका अंध राजाला वाहून, तिथेच राहणं त्यांनी स्वीकारलं. यात त्यांनी स्वतःच्या विनाशाची बीज पेरली. श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या प्रमाणे वाईट आणि चांगलं यातून योग्य ते निवडण्याचं स्वातंत्र्य, नियती प्रत्येकाला एका विशिष्ट वळणावर देत असतेच. तुम्ही तुमची बुद्धी आणि विवेक यांचा वापर करून काय निवडता, यावर तुमचं स्वतःच प्रारब्ध तुम्ही लिहिता. 

याच कारणास्तव श्रीकृष्णाने त्यांना, रणांगणात, एक राजकीय खेळी करून, शस्त्र खाली ठेवायला लावलं . श्रीकृष्णांना हे माहित होतं कि, दृष्टद्युम्न या क्षणाचा व संधीचा अचूक वापर करून, द्रोणाचार्यांना संपवणार. यात श्रीकृष्णाची एक कुशल नीती अशीही दिसून येते, कि आपल्याला आपल्या शत्रूंचीच नव्हे तर मित्रांची वा साथीदारांची बलस्थान, त्यांची व्यक्तिगत शत्रूता आणि स्वभाव वैशिष्ट्य माहीत असावीत, ज्याचा आपल्याला योग्य प्रकारे, शत्रूला संपवण्यासाठी उपयोग करता येईल.   

द्रोणाचार्यांच्या या जीवनातून वा उत्तर जीवनातील चुकांमधून एक गोष्ट निश्चित कळते कि, ऋणात इतकं हि दबून जाऊ नये कि, ते तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला खाऊन टाकेल, अन्यथा संगती संग दोषा: या उक्तीप्रमाणे तुमचाही अंत, ज्याची कुसंगती तुम्ही धरली आहे, त्याच प्रमाणे होतो. हि गोष्ट वासनेला व व्यसनांनाही लागू होते. कदाचित हीच शिकवण यातून मिळते. उदाहरणार्थ एखाद्याने तुम्हाला या अटीवर मदत केली कि, तुम्ही त्याच्याबरोबर रोज अपेय पान करावं. अश्यावेळी हि मदत स्वीकारायची कि नाही हे तुम्हालाच ठरवावं लागेल, तुमची बुद्धी आणि विवेक वापरून. अन्यथा द्रोणाचार्यांची गतीच तुम्हाला मिळेल, हा बोध महाभारताचे काव्य नक्कीच देते.  

असो आज इथेच थांबू. उद्या दुर्योधनाबरोबर असलेलं व त्याचप्रमाणे संपलेलं अजून एक महान व्यक्तित्व. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
१५/०५/२०२०
भाग त्रयोदश समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...