Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग २९

श्रीकृष्णनीती भाग २९
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

कालचाच विषय पुढे नेताना निष्ठा आणि निष्ठेबाबत अजून काही उदाहरणं घेऊन पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी श्रीकृष्ण चरित्रावरून घेतलेला बोध, आत्मसात केला आणि माणसांना धर्माच्या, स्वराज्याच्या पायाशी निष्ठा आणि प्राण कसे वाहायचे, याचा सत्शील मार्ग दाखवला. नव्हे महाराजांनी, या माणसांच्या रुपात निष्ठेच्या नवनवीन व्याख्या त्यांच्याच कर्तृत्वाने लिहून घेतल्या. मला वाटतं श्रीकृष्णाला इतकं परिपूर्ण कोणीही आत्मसात केलं नाही. 

चुकीच्या पायावर निष्ठा वाहिलेल्या कित्येक माणसांना स्वराज्याचा मंत्र देऊन धर्माच्या रक्षणार्थ प्रवृत्त केलं. प्रसंगी यातील अनेकांनी लढता लढता, जीवाची बाजी लावून धर्माच्या स्थापनेसाठी, देहाचं मोल मोजलं. हीच निष्ठेची अपेक्षा वा संकल्पना श्रीकृष्णांनी गीतेतून आणि महाभारतातील स्वचारित्रातून जनसामान्यांना शिकवण स्वरूपात दिली की, निष्ठा ही धर्माप्रति असावी. तीच खरी धर्मनिष्ठा. 

श्रीकृष्णाच्या माध्यमातून अजून एक गोष्ट जी प्रखरपणे जाणवते ती म्हणजे दांभिक अहिंसा व सत्य यांचा कोणी फुकाचा बडेजाव करू नये आणि त्याच्या आहारीसुद्धा जाऊ नये. जे सत्य धर्माच्या मार्गात येत असेल वा धर्मावर घाला घालत असेल किंवा ज्या असत्यातून धर्माचं भलं होत असेल ते असत्य प्रसंगी शंभर सत्याहून श्रेष्ठ आहे. पांडवांच्या बाजूने असलेलं धर्माचं पारडं प्रत्यक्ष युद्धात विजयरुपात प्राप्त व्हावं यासाठी गुरुद्रोणाचार्य यांना मार्गातून बाजूला करणं क्रमप्राप्त होतं आणि यासाठी युधिष्ठिरीला असत्य वा अर्धसत्य बोलण्यास प्रवृत्त केलं. कारण त्याशिवाय युद्ध विजयाच्या दिशेने पुढे गेलंच नसतं आणि अधर्माचा पराभव झाला नसता.

तिथे आपण प्रत्यक्ष भगवंत आहोत, आपणच असत्य कसं वदवून व घडवून आणायचं, हा खोटा आदर्श जपण्याचं नाटक न करता, व्यावहारिक पातळीवर विचार करून, प्राप्त परिस्थितीत त्यांनी मार्ग काढला. गुरू द्रोण हे अस्त्र शस्त्र विद्येत प्रवीण होते. भगवान परशुराम यांचे शिष्य व त्यांच्याकडून द्रोणाचार्यांनी शिक्षण प्राप्त केलं होते. म्हणूनच प्रत्यक्ष युद्धात कोणीही त्यांना पराभूत करू शकत नव्हतं. आपण स्वतः शस्त्र उचलणार नाही. मग प्राप्त परिस्थितीत, जी चाल योग्य वाटेल आणि जी धर्माला विजय प्राप्त करुन देईल ती यथार्थ समजावी, ही मोठी शिकवण त्यांनी दिली. 

सत्याचा तो मार्ग जो धर्मनाशाकडे नेतो, तो नक्कीच अनुकरण योग्य नाही. त्या ऐवजी थोडं असत्य बोलून, धर्माचं मोठं काम होत असेल तर ते सुसंगत आणि सुयोग्य आहे. म्हणजेच अपवादात्मक परिस्थितीत, काही तत्व मोडून नाही पण लवचिक करून, धर्म रक्षण करणं महत्वाचं माना, हाच संदेश त्यांनी आयुष्यातील अनेक घटनांमधून दिला. मतितार्थ हा की तत्व, प्रतिज्ञा, तर्क, ज्ञान, मूल्य, निती ह्या धर्माच्या मार्गाकडे नेणारी असावीत वा असतात. परंतु प्रसंगोपात वा कालानुरूप यातील काही कालबाह्य वा बदलून धर्म रक्षण होत असेल तर नक्कीच त्याचा विचार व अंमलबजावणी, कोणताही तात्विक वाद न करता केला जावा. धर्म हा सर्वांच्या वरती आहे. त्याचं रक्षण हे प्राय: महत्वाचं आहे वा मानलं गेलं पाहिजे.

श्रीकृष्णाचं अजून एक वैशिष्ट्य की, त्यांनी कोणतीही शिकवण तत्वरुपात नुसती न सांगता, ते त्यांनी व्यावहारिक पातळीवर सिद्ध करून दाखवून दिलं. व्यवहार्य आणि धर्मरक्षणाच्या मार्गातील कोणतही कार्य यज्ञ आहे आणि ते करणारा यज्ञार्थी. सत्याचा मार्ग जर धर्माच्या हिताच्या आड येत असेल तर तो न अवलंबणं हिताचं आहे. 

गीतेच्या तत्वज्ञानात एक तत्व सांगताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक श्लोक सांगितला

अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च ll

याचा वास्तविक चुकीचा अर्थ अर्वाचीन भारतात पसरवून भारताच्या वीर, बलवान आणि धैर्यशाली परंपरेला छेद देऊन धर्मधारा क्षीण करण्याचा प्रयत्न, जाणूनबुजून करण्यात आला वा येतो. ज्यात फक्त अर्धा श्लोक पसरवून आपल्या मनात हे बिंबवून देण्यात आलं की सनातन धर्म म्हणजे भारताने फक्त अहिंसेचाच मार्ग जगाला दिला व त्याच मार्गाचा अवलंब केला. किंबहुना यातच भारताचं हित आहे किंवा हाच खरं भारत आहे. जे वास्तवात सत्य नाही. श्रीकृष्णाचं नितीतत्व याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतं. म्हणून पूर्ण अर्थ जाणून मगच आपण आपली भूमिका ठरवावी. 

याच संदर्भात पुढे उद्या..........  

श्रीकृष्णाबद्दल विस्ताराने पुढील भागात. .....

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०५/०६/२०२०
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
भाग एकोणतीसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...