Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग:१७

श्रीकृष्णनीती भाग:१७
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

पितामह भीष्म , गुरु द्रोण आणि महारथी कर्ण यांच्या नंतर कौरव सैन्यातील महारथी होता दुर्योधन. परंतु त्याच्याकडे वळण्याआधी आपण अजून एका महारथीचा विचार करू. अश्वत्थामा. गुरू द्रोण आणि माता कृपी यांचा पुत्र आणि महर्षी भारद्वाज यांचा पौत्र. महाभारता तील अत्यंत निर्दयी आणि निंदनीय व्यक्तित्व. 

द्रोणाचार्यांनी पराक्रमी आणि शिवअंशाच्या पुत्रप्राप्ती साठी भगवान शिवाची अत्यंत उग्र तपस्या केली. त्या तपस्येने प्रसन्न होऊन द्रोण आणि कृपी यांना तेजस्वी पुत्र, जो शिवाचा अंश अर्थात ११ रुद्रांपैकी एक असेल, असा आशीर्वाद भगवान शिवांनी दिला. या वरप्राप्तीनंतर अश्वत्थामा याचा जन्म झाला. महारुद्राचा अंश म्हणून, त्याच्या कपाळावर एक दिव्य मणी जन्मतः विराजित होता. हा मणी त्याला मानवेतर सर्व जीव जसे देव, दानव, असुर, यक्ष किन्नर, इंद्र, वरुण यांपासून आणि कोणत्याही अस्त्र शस्त्र यांपासून अभयदान देत असे. म्हणजेच यांपैकी कोणीही अश्वत्थामाला मारू शकत नव्हते.

अश्वत्थामाच्या जन्मानंतर द्रोणांची परिस्थिती अजूनच खालावली. इतकी की ते मुलाला गायीचं दुधसुद्धा घेऊन पाजू शकत नव्हते. या परिस्थितीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी एक गाय मिळवण्यासाठी द्रोणांनी अनेक प्रयत्न केले. सरते शेवटी आपला बालमित्र द्रुपद, यांच्या दरबारात जाऊन मित्र म्हणून याचना देखील करून आले. परंतु तिथे घोर निराशा आणि असह्य अपमान सहन करून, धक्के देऊन बाहेर घालवण्यात आलं. ही अपमानाची आग मनात जागृत ठेवून, ते तिथून तडक हस्तिनापूरला आले, जिथे त्यांची भार्या कृपी हिचे ज्येष्ठ बंधू, कृपाचार्य धृतराष्ट्र दरबारी होते. 

इथे आल्यावर देश व काल बदलाप्रमाणे त्यांचे दिवस देखील पालटले. त्यांना भीष्मांच्या कृपेने,कौरव आणि पांडव यांचे गुरुपद प्राप्त झाले. अश्वत्थामादेखील या मुलांबरोबर सर्व शस्त्र अस्त्र विद्येत पारंगत होत होता. किंबहुना अश्वत्थामाला अनेक दिव्यास्त्र ज्ञात होती, जी त्यांनी आपला शिष्योत्तम अर्जुन यालादेखील शिकवली नव्हती. 

अश्वत्थामाला मिळालेल्या या टोकाच्या अनुभवांमुळे त्याचा स्वभाव विक्षिप्त आणि टोकाचा पाशवी झाला होता. त्याच्या या स्वभावाचे पैलू ज्ञात असल्यामुळे भीष्मांनी महाभारत युद्धापूर्वी व युद्धादरम्यान कोणत्याही प्रकारची महत्वाची जबाबदारी द्यायला नकार दिला होता. परंतु तो एक तिखट योद्धा असल्यामुळे, सेनेच्या एका गटाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्याला देण्यात आली होती. 

मुळात बालपणीची हालाखीची परिस्थिती, त्यानंतर थेट हस्तिनापूर युवराजांच्या बरोबर अखंड सहवास. या विभिन्न स्थितीचा परिणाम अश्वत्थामाच्या स्वभावात आला. कदाचित दुर्योधनाशी मैत्री, ही आपल्या या परिस्थितीची शाश्वती असल्याकारणाने असेल, पण दुर्योधनासाठी काहीही करण्याची तयारी त्याच्या मनाचा भाग वा अपरिहार्यता झाली. 

पांडवानी गुरुदक्षिणेत दिलेलं पांचाल राज्य, अर्ध द्रुपदाला परत करून उरलेलं अर्ध राज्य गुरू द्रोणांनी अश्वत्थामाला देऊन त्याला त्या राज्याचा राजा केलं. शस्त्रविद्येत गुरू द्रोण यांच्या प्रमाणेच प्रवीण व पारंगत असलेला अश्वत्थामा, कुशल योद्धा होता. महाभारत युद्धात अनेक प्रसंगी अर्जुनासारख्या सर्वश्रेष्ठ योध्याला सुद्धा उत्तम लढत अश्वत्थामाने दिली. 

भीष्म पतना नांतर गुरू द्रोण सेनाध्यक्ष झाल्यावर, झालेल्या युद्धात अकराव्या दिवशी नारायणास्त्राचा वापर करून, संपूर्ण पांडव सैन्याला संपवण्याचा डाव, त्याने कोणाशीही चर्चा वा विचार विनिमय न करता प्रत्यक्षात आणला. हा त्याच्या स्वभावाचा आततायीपणा आत्मघातकीसुद्धा होता.

त्यावेळी केवळ वासुदेवामुळे पांडव आणि सैन्य वाचले. कारण त्या अस्त्राचे निर्माते स्वयं, त्यावेळी रणांगणावर उपस्थित होते. त्यांनी त्वरेने सर्वांना अस्त्र शस्त्र टाकून रथावरून व अश्व ,गज यावरून खाली उतरून निशस्त्र त्या अस्त्रासमोर उभं राहायला सांगितलं. कारण त्या अस्त्राचं वैशिष्ट्य हे की, जो त्याच्या समोर शस्त्र घेऊन उभा राहील तो नष्ट होईल. 

परंतु जो निशस्त्र होऊन त्याला सामोरा जाईल, त्याला ते अस्त्र काहीही न करता प्रभाव हीन होत असे. त्यादिवशी श्रीकृष्ण नसता तर संपूर्ण पांडव व सैन्य, त्याच क्षणी संपून युद्ध तिथेच संपलं असतं. अर्थात ते प्रभावहीन झालेले पाहून अश्वत्थामाला स्वतःच्या अस्त्रविद्येच्या ज्ञानाबद्दल व प्रभावाबद्दल शंका उत्पन्न झाली होती आणि तो निराश झाला होता. 

अश्या या पराक्रमी, पण अनियंत्रित आणि पाशवी स्वभाव असलेल्या अश्वत्थामाला नियंत्रण करणं अशक्य होतं असे. एकट्या अश्वत्थामाने पांडवांच जवळजवळ एक अक्षौहिणी सैन्य नष्ट केलं होतं. गुरू द्रोण आणि अश्वत्थामा या दोघांनी मिळून मिळून, समस्त पांडवसैन्य नष्ट केलं असतं. म्हणूनच श्रीकृष्णाने युक्ती योजून गुरू द्रोण यांना मार्गातून दूर केलं. 

उद्या पुढे पाहू.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
१९/०५/२०२०
भाग सप्तदश समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...