Skip to main content

अध्यात्म विराम १०२

अध्यात्म विराम १०२

भागवत धर्माची ही गुढी किंवा ध्वजा, अनेक थोर संत महंत यांनी, या भूमीत रुजवून, पार आकाशाला नेऊन ठेवली आहे. मुळात इथे धर्म या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेऊ आणि मग पुढे जाऊ. धर्म म्हणजे एखाद्या कर्तव्याची किंवा कार्याची धुरा, जी आपल्या खांद्यावर घेऊन, आपण ते आपल्या आत्म्याच्या जवळचं मानून पूर्ण करतो, किंवा पुढे नेतो, त्याला धर्म म्हणतात. 

किंवा जे आपल्या, या जगतात येण्याचं खरं कारण आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपला जन्म आहे, असं कर्तव्य म्हणजे धर्म. या अर्थाने, या भागवत धर्माची धुरा, अनेक आत्म्यांनी आपल्या अवघ्या देहाचं सोनं करत,त्याला करोडो आत्म्यांचा श्वास बनवलं तो हा भागवत धर्म.

भागवत या शब्दातच, याचा संबंध आत्मा आणि परम आत्मा, अर्थात भक्त आणि भगवंत यांचं सख्य अर्थात अतूट नातं आहे, हे लक्षात येतं. हे पटवून देण्याचं, वास्तवात आणण्याचं, त्याला मूर्त रूप देण्याचं आणि ते शक्य आहे हे सर्व जनांना पटवून देण्याचं, अत्यंत महत्वाचं कार्य या भागवत धर्माने जगाला दाखवून दिलं आहे. 

किंबहुना, भगवंतांची, देहातील आत्मा आणि परमात्मा यांचं सख्य व्हावं ही सुप्तरुप इच्छा पूर्ण करण्यासाठी योजलेल्या, भक्तीच्यां नऊ मार्गांचा, एकाच धर्मात, एकाच योगात व एकाच मार्गात सर्वसमावेशक सहयोग साधला जावा,यासाठी स्वतः भगवंतांनी,संत महंत रुपात अवतरून, लोकांना हा मार्ग उलगडून दाखवला.

कलियुगाया या वाढत्या तमोगुणी, तामसी आणि नकारात्मक वातावरणात, जिथे देहाच्या नात्यांचा, एकमेकांवरील विश्वास उडत जाईल, आत्मा या देहाला चालवतो ही ओळखच पुसट होत जाईल आणि धर्मा वरील, भक्तिवरील, देवावरील श्रद्धा, भक्तीभाव कमी कमी होत जाईल, अश्या परिस्थितीत व्यक्तिगत भक्तिमार्ग जोपासना करणं, देवाबद्दल सद्भाव वाढीस लावणं, या साठी समोर आदर्श, दिशादर्शक, मार्गदर्शक व्यक्तित्व कमी कमी होत जाईल, याची जाणीव असताना, हा मार्ग, द्रष्ट्या भगवंताने योजून ठेवला आहे. 

भागवत धर्म हा अनेक पथांना, अनेक भक्तीमार्गांना, अनेक विचारांना एकत्र आणून, भगवंताची श्रवण, कीर्तन इत्यादी भक्ती व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर घडवून आणून, कलियुगात कमी होत जाणारी धर्मावरील श्रद्धा वृध्दींगत करण्याचं अत्यंत मोलाचं काम करून, यायोगे, भगवंत आणि त्याचे अनेक प्रतिनिधी यांनी, एक मौल्यवान योगदान, गेल्या अनेक शतकात केलेलं आहे. किंबहुना गेल्या हजार बाराशे वर्षातील धर्मावरील, श्रद्धे वरील अनेक संकटात, अनेक हल्ल्यात परीक्षा बघणाऱ्या या काळात, सामान्य माणसाचा विश्वास बांधून ठेवण्याचं मोलाचं कार्य, या भागवत रूप नवविधा भक्तीच्या मार्गाने केलेलं आहे, हे नक्की. 

सर्वसामान्य भोळ्या भाबड्या माणसाला, भक्ती मार्गाकडे ओढून,त्याचा भोळा भाव, ईश्वराच्या चरणी लावून, त्याला भक्ती व त्याद्वारे, आत्मा परमात्मा यांच्या संयोगाचं महत्व पटवून देण्याचं आणि त्यांना जन्म जन्मंतरीच्या कर्मबंधना तून कायमचं बाहेर पडण्याचं तंत्र सहज साध्य स्वरूपात आत्मसात करवून देण्याचं महाकर्मकठीण कार्य, भागवत धर्माचे निर्माते, पालनकर्ते यांनी घडवून आणलं आहे. भक्तीच्या मार्गातील सर्वात महत्वाचा असलेला भोळा भाव जपण्याचं, अत्यंत अशक्यप्राय कार्य हा भागवत धर्माची, भक्ती मार्गाला मिळालेली सर्वात महत्वाची उपलब्धता आहे. 

भागवत धर्मावरील हे चिंतन उद्याच्या भागात पुढे पुन्हा सुरू ठेवूया. पण आज इथेच थांबुया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...