अध्यात्म विराम १०३
प्रत्यक्ष महाभारत युद्धाच्या प्रसंगी, अठरा अक्षौहिणी सैन्या समोर, कर्मयोग, धर्मयोग, भक्तीयोग, वैराग्ययोग, विरक्तीयोग,सांख्ययोग याबद्दल प्रदीर्घ विवेचन करणाऱ्या भगवंतांनी, अर्जुनाला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी, संपूर्ण विश्वाला,सर्वकाळात तारक ठरणारं व कल्पांता पर्यंत प्रकाशित ठेवणारं ज्ञान, जगापुढे उघडं करून दाखवलं. भगवंत जणू काही, या विश्वाला प्रकाशित करणारं आणि युगानयुगे मार्गदर्शन करणारं प्रकाश ज्ञान देण्यासाठीच्या संधीची प्रतीक्षा करत होते. कदाचित हा महाभारत युद्धाचा घाट, हे नियातीच कटू वास्तव आहे, हे ज्ञात असल्याकारणाने, आपण फक्त त्याचे साक्षी होऊ शकतो, हे ते जाणत होते.
पण यात फक्त एका साक्षी दर्शकाची भूमिका न बजावता, या विनाशक संधीचा, आपल्याला सदुपयोग करून घेता येईल, हे फक्त भगवंत जाणत होते.त्यात ज्ञान,कर्म, भक्ती यांच्याविषयी अमूल्य ज्ञान देताना,त्याचं भगवंतांनी, त्यांना कर्म योगी, धर्म योगी,ज्ञान योगी व्यक्तीकडून काय अपेक्षा आहेत, त्याने काय करणं अपेक्षित आहे, त्यांची व्याख्या, अर्थ, मार्ग याचही स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात वर्णन करून सांगितलं आहे.खरंतर गीता ही सर्वसमावेशक कशी, याचं उत्तर देताना,भगवंतांनी सर्वसामान्य भक्तांसाठी वा भक्त नसलेल्या सामान्य जीवांसाठी सुद्धा मुक्ती, मोक्ष यांची व्याख्या, मार्ग सांगून अनंत उपकार केले आहेत
किंबहुना काहीही ज्ञान नसलेल्या आणि भक्ती, भगवंत यांबद्दल काहीही माहीत नसलेल्या संसारी, प्रापंचिक जीवांना सुद्धा कळेल, यासाठी अद्वैत भक्तीसिद्धांत सहज सोप्या शब्दात समजावून सांगितला. पण सरतेशेवटी, यात तेच भगवंत अतिसामान्य जीवांना, त्यांच्या पर्यंत येण्याच्या राजमार्गाचं गुह्य उलगडून सांगताना सांगतात की, फक्त अनन्य होऊन, माझं नित्य स्मरण करणाऱ्या आत्ममार्गी अज्ञानी साधकाला वचन देतात की तुझं क्षेम कुशल मी पाहीन. तू फक्त माझ्या स्मरणात तुझं निजकर्तव्य करत रहा.
मला वाटतं की, या अनन्याश्चिन्तयन्तो मां ...... याच श्लोकात भागवत धर्माची संपूर्ण व्याख्या भगवंतांनी उलगडून सांगितली आहे. पण हजारो वर्षांपूर्वी स्वतः सांगितलेलं तेच ज्ञान, फक्त मुखोदगत करण्यापुरतं मर्यादित वा संकुचित झाल्यानंतर,भगवंतांना पुन्हा एकदा या भागवत धर्माची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली रुपात पुन्हा जन्म घेऊन, स्व रूपात वैष्णव आणि ज्येष्ठ बंधू संत निवृत्ती रुपात शैव अश्या दोन्हींच्या संगमातून, भागवत धर्माची पताका स्वतःच्या खांद्यावर घेतली.
संकुचित जीवन जगत,फक्त आपला प्रपंच करत, किटका समान जगणाऱ्या लाखो सामान्यांना, ईश्वराच्या चरणात व ईश्वर स्मरणात राहण्याचं गुह्य,मार्ग, तो मार्ग अवलंबून जगण्याची सहजता, आपण जगून दाखवून दिली. अनेक गुह्य,गुपितं उघड करून,कृष्णरुपात आपण सांगितलेली गीता, स्वतः माऊली रुपात जगून दाखवली. भागवत धर्मा विषयीच हे चिंतन आपण उद्याच्या भागात पुढे नेऊया. तोपर्यंत त्याचं ईश्वराचं स्मरण, चिंतन करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment