श्रीकृष्णनीती भाग २८
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
आज श्रीकृष्णाच्या चरित्राचा विशेषत्वाने महाभारत युद्धा संदर्भात अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते. जी अत्यंत चुकीच्या समजुतीत कायम वापरली गेली ती म्हणजे निष्ठा. अश्या भ्रामक कल्पनेत, आपल्याच धर्माची आपल्याच बांधवांनी किती हानी केली आहे, याची शेकड्यानी उदाहरणं इतिहासात सापडतील, महाभारता आधीसुद्धा आणि नन्तरदेखील. निष्ठेची चुकीची व्याख्या आणि त्याला धर्माचं अधिष्ठान असल्याच्या चुकीच्या कल्पना, यांना खरतर छेद देणारं तत्वज्ञान गीतेत मांडून आणि कर्माने ते घडवून वा दाखवून देखील, आम्ही हिंदू धर्मीय त्याबाबत कधीही जागरूकतेने विचार केलाच नाही वा ते तितकं गांभीर्याने घ्यावं,असं फार कोणाला वाटलं नाही.
कारण निष्ठेच्या संदर्भात वा ती योग्य जागी असण्यासंदर्भात फार भ्रामक कल्पनेत आपण वावरलो वा वावरत आहोत. हे खेदाने म्हणावं लागतं. जरी श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वी यावर योग्य तो प्रकाश टाकून, ते उदाहरणाने दाखवून दिलं असलं तरीहि, आपण काहीही बोध घेतला नाही. याचं कारण आपण कृष्ण राम यांचा फक्त अध्यात्मिक दृष्टीने विचार करतो, जे वास्तविक चूक आहे. कारण आधी स्वधर्म नंतर अध्यात्म, हा पाया श्रीकृष्णाने आपल्या जीवन दर्शनाने घालून दिलेला असूनही, आजसुद्धा आपण त्याचा फक्त अध्यात्मिक वारसा आणि त्याचे गुह्यार्थ शोधतो आणि त्यानेच सुखावतो.
यात अजून एक गोष्ट आपण अत्यंत चुकीची वा चुकीच्या संदर्भात वापरतो वा अवलंबतो ती म्हणजे उपकार आणि त्याच्या परतफेडीसाठी चुकीच्या पारड्यात आपली निष्ठा वाहून स्वनाश करवून घेणं. एक उदाहरण देतो. समजा एखाद्या खल प्रवृत्तीच्या व्यक्तीने तुम्हाला कधी मदत करून तुमचा कार्यभाग पुढे जाण्यास हातभार लावला असेल, म्हणून आयुष्यभर त्याच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणं हे आपलं कर्तव्य आहे या भ्रामक कल्पनेने आपण नकळत त्याच्या पापाचे वाटेकरी होतो.
यासंदर्भात गुरु द्रोणांचं उदाहरण देता येईल. त्यांना कौरव आणि पांडव यांना अस्त्र शस्त्र यांचं शिक्षण देण्यासाठी नेमलं,ज्याचा मेहनताना वा मोबदला त्यांना सुखसुविधायुक्त जीवन प्रदान करून, भीष्मांनी दिलं. वास्तविक अर्थाने ते मोबदला घेतलेले एक कर्मचारी होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पांचाल देशावर विजय मिळवून देण्याची गुरुदक्षिणा त्यांनी मागून घेतली, जी पांडवांनी पूर्ण केली. या इथे खरतर त्यांचं कार्य पूर्ण होत होतं. परंतु त्यांनी आपल्याला भीष्मांकडून, गुरुपदाच्या मोबदल्यात मिळालेल्या जीवनाचा, आयुष्यभराचे उपकार, हा अर्थ लावून आपली निष्ठा चुकीच्या पायावर वाहिली. त्याची उचित शिक्षा त्यांना मृत्युरूपात प्राप्त झाली.
अश्याच भ्रामक उपकार कल्पनेचे बळी ठरले ते मद्रनरेश शल्य, जे नात्याने पांडवांचे मामा होते. युद्धापूर्वी युधिष्ठिराच्या बाजूने सामील होण्यासाठी निघालेले महाराज शल्य, दुर्योधनाने टाकलेल्या जाळ्यात अडकले,असा समज प्रथमदर्शनी होतो. जो त्यांनी दुर्योधनाने केलेलं आतिथ्य स्वीकारलं, या कारणाने प्रत्यक्ष भाच्यांविरुद्ध युद्ध करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन, मृत्यूच्या फलरूपात स्वीकारलं.
या इथे एक गोष्ट जी वारंवार श्रीकृष्णाने आपल्या कृतीने , कथनाने कायम दाखवून दिली आहे, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, हे ओळखूनच त्याच्या एखाद्या कृतीचा, कार्याचा, अर्थ लावून, मगच त्यासंदर्भात आपली भूमिका निश्चित करावी. उदाहरणार्थ या घटनेत जर शल्याना माहीत होतं वा माहीत झालं कि, दुर्योधनाचा उद्देश हा आपल्याला फसवण्याचा आहे, तर त्याच्या कृतीला उपकार वा आतिथ्य न मानता युद्धनीतीतील एक चाल समजून, त्यांनी आपली मूळ भूमिका न बदलता ठाम राहून,दुर्योधनाच्या कृतीला तितकंच सुयोग्य उत्तर देणं गरजेचं होतं .
यासंदर्भात श्रीकृष्ण चरित्र ठामपणे एक गोष्ट सांगतं कि, जसा समोरच्याचा विचार तसाच तुमचा विचार आणि कृती असावी. मला असं वाटत हे पूर्णपणे आत्मसात केलेले एकच वीरपुरुष होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच ते आयुष्यभर यशस्वी होत गेले. महाराजांचं सर्वात बलस्थान हे कूटनीती हे होतं आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे समोरच्याच्या मनात काय आहे, ते ओळखणे. हेच सांगणारं अजून एक व्यक्तित्व म्हणजे आर्य चाणक्य. जे श्रेष्ठ कूटनीतीज्ञ म्हणून ओळखले जातात. महाभारत युद्धात याची प्रचिती श्रीकृष्णांनी अनेक वेळा करून दिली.
दोन ठळक उदाहरणं देतो एक म्हणजे अश्वत्थामा वधात, अश्वत्थामा नामक हत्तीला मारल्यानन्तर, प्रत्यक्ष धर्मराज युधिष्ठिर याला सुद्धा, अवतारी पुरुष श्रीकृष्ण यांनी प्रसंगानुरूप असत्य बोलण्याची शिकवण दिली. ज्यावर धर्मराजाने आपल्या तत्वात थोडी तडजोड, अर्धसत्य सांगून केली. महाभारतात उल्लेख केल्याप्रमाणे, हो अश्वत्थामा मारला गेला हे वाक्य उच्चारल्यानंतर धर्मराज पुढचं वाक्य नरो वा कुंजरो वा म्हणणार याची पूर्वकल्पना असल्याने, श्रीकृष्णांनी त्या वाक्याच्या सुरवातीलाच शंखनाद करून द्रोणाचार्यांना पुढील ऐकू येणार नाही, याची व्यवस्था केली. म्हणजेच निष्ठेच्या वा तत्वाच्या भ्रामक व चुकीच्या कल्पना बाळगू नका, हे सोदाहरण सिद्ध केलं.
अजून एक उदाहरण यासंदर्भात देता येईल. शेवटच्या गदायुद्धात भीमाने नीतिनियम भंग करून दुर्योधनाला मारलं. अर्थात हे देखील त्याने श्रीकृष्णाच्या चलाख निर्देशाने केलं. तरी तदनंतर क्रोधीत झालेल्या ज्येष्ठ भ्राता श्रीबलराम यांना देखील सुनवायला मागेपुढे पाहिलं नाही. म्हणजेच ज्येष्ठ बंधू जरी नीतिनियम निष्ठा अनिष्ठा यांच्या भ्रामक कल्पनेत असले, तरी त्यांनाही प्रसंगी त्यांची भूमिका किती अयोग्य आहे, हे दाखवून दिलं आणि भीमाचं रक्षण केलं. खरतर चुकीच्या निष्ठेची अशी कित्येक उदाहरणं पौराणिक आणि तदनंतरच्या इतिहासात सापडतात. तरीही एक पौराणिक आणि दोन नन्तरच्या इतिहासातील उदाहरणं घेऊ म्हणजे हा विषय अजून स्पष्ट होईल.
रामायणात सख्खा ज्येष्ठ बंधू रावण चुकीचं वागत आहे, धर्माविरुद्ध जाऊन माता सीतेला आणि प्रभुंना त्रास देत आहे. हे समजून त्यांला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर, शरणागत रक्षक प्रभुना शरण येऊन,आपली व्यथा, कनिष्ठ बंधू विभीषण यांनी, प्रभुंना सांगितली. प्रभुनी त्यांना विनाअट आपला मित्र म्हणून स्वीकारलं. खरतर आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या विरुद्ध जाऊन, शत्रूला मदत करणं हे त्यावेळच्या तत्वांच्या विरुद्ध होतं. परंतु या द्विधा मनःस्थितीत असलेल्या विभीषणाला यातील मर्म समजावून सांगितलं.
तेंव्हा प्रभुनी मुख्य हीच गोष्ट सांगितली कि, आपण एखादी भूमिका , वा मत , वा निर्णय घेताना, तो धर्माविरुद्ध आहे कि धर्माला पोषक आहे. यावर तो निर्णय वा मत ठरवावं. जर आपण धर्माविरुद्ध जात नसू तर आपली भूमिका योग्य आहे असे समजावे, जरी ती आप्त स्वकीय यांविरुद्ध जात असेल तरी ती योग्य आहे. यामधे स्वधर्म म्हणजे जनहित, हे जास्त महत्वाचं आहे.
आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात दोन उदाहरणं देता येतील. एक म्हणजे मिर्जा राजे जयसिंग ज्यावेळी महाराजांना परास्त करण्यास राज्यात आले, त्यावेळी त्यांना समजावून सांगताना महाराजांनी हेच उदाहरण दिलं कि, आपण एक धर्मीय त्यात आपण दोघेही महादेवाचेच भक्त. ज्याला आम्ही महादेव म्हणतो आणि त्यालाच आपण एकलिंग म्हणता. धर्माच्या रक्षणार्थ आपण एक होऊ शकतो आणि हे परकीय अराजक दूर करून धर्मरक्षण करू शकतो. आपण फक्त साथ द्या.
इथे वास्तविक मिर्जाराजे जयसिंग आणि महाराज दोघेही हिंदू. तरीही एक हिंदू, धर्म रक्षणार्थ प्राणपणाने कार्यरत असताना दुसरा हिंदू, परकीय पायांशी आपली चुकीची निष्ठा वाहतो. परिणाम दोघांनाही झालेला त्रास आणि महाराजांना घडलेला आग्र्यातील कारावास. मिर्जाराजे जयसिग यांनी एकलिंगाची शपथ घेऊन महाराजांच्या संरक्षणाची दिलेली हमी, पायदळी तुडवीत, परधर्म बुडवण्याची आपली भूमिका प्राणपणाने जपणारा औरंगजेब. म्हणजेच आपल्याच धर्मातील चुकीच्या निष्ठा या तत्वाचा, स्वधर्मासाठी वापर करून घेणारा पापी औरंग्या.
अजून एक उदाहरण देता येईल. ते म्हणजे कोंडाण्याच्या लढाईत तानाजी मालुसरे आणि उदेभान दोघेही हिंदू. पण एक धर्माप्रती वचनबद्ध आणि त्याकारणे धर्मरक्षणार्थ महाराजांच्या आदेशा नुसार युद्धात उतरलेला. तर दुसरा हिंदू चुकीच्या निष्ठेच्या व नीतिनियमांच्या कल्पनेत,आपल्याच धर्मबांधवाविरुद्ध त्याच्यावर शस्त्र चालवणं, हे आपलं कर्तव्य समजणारा. परिणाम दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले. पण एकाने धर्मरक्षणार्थ प्राण त्याग केला, तर दुसर्याने परधर्म रक्षणार्थ प्राणत्याग करून, आपल्याच धर्मबांधवाचा प्राण घेतला.
मला वाटतं श्रीकृष्णांनी दाखवून दिलेल्या, या चुकीच्या निष्ठा न पाळण्याच्या आदर्शाला आपणच इतिहासात अनेकवेळा पायदळी तुडवलं आहे.याची कित्येक उदाहरणं देता येतील. ज्यामुळे धर्मऱ्हास प्रचंड प्रमाणात झाला आहे. निदान यापुढे जरी काही शिकता आलं, तर श्रीकृष्ण जन्माचे काही पांग आपण फेडले, असं म्हणता येईल.
याच संदर्भात पुढे उद्या..........
श्रीकृष्णाबद्दल विस्ताराने पुढेही भागात. .....
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०३/०६/२०२०
भाग अठ्ठाविसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ
Comments
Post a Comment